त्रिसूर ( केरळ) : हे हृदय म्हणू की लेणे, प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे लेणे… या जगदिश खेबुडकरांच्या काव्यपंक्तीचा अनुभव येथील एका दाम्पत्याने घेतला. एकमेकावर असणाऱ्या अतुट विश्वासाच्या जोरावर अनाथ बनलेल्या एकाकी असणाऱ्या आयुष्यात त्यांनी प्रेमाचे रंग भरले.
यातील हे आजोबा आहेत 67 वर्षांचे तर या आजी आहेत 65 वर्षांच्या विधवा. त्यताही गंमत म्हणजे आजोबा कधी काळी या आजींच्या पहिल्या पतीचे मदतनीस होते. आयुष्याच्या एकाकी वळणावर ते एका वृध्दाश्रमात भेटले. तेथे त्यांना त्यांच्यात निर्माण झालेल्या प्रेमबंधाची जाणीव झाली. त्यातून आपण लगीनगाठ मारत उर्वरीत काळ एकमेकांसोबत व्यतीत करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर जे घडलं तो खरं तर चमत्कार होता. फक्त संस्थेसाठी नव्हे तर जगासाठीही. कारण जगाचे स्वत:चे नीतीनियम असतात. ते संकटात सापडलेल्या वृध्दांसाठी तर अधिकच जाचक असतात.
लक्ष्मी अम्मल यांची कोचनियन मेनन यांच्याश त्रिसूर रामवर्मपुरम वृध्दाश्रमात झालेली भेट अविस्मरणीयच होती. अम्मल यांनी आपला पती गमावला होता. तर कोचनियन यांना कुटुंबियांनी अव्हेरले होते. या वयात आलेले असहाय्य जीवघेणं एकाकीपण सोसत होते. त्यावेळी त्यांचं एकमेकांकडे ओढले जाणे साहजिक होते. त्यातून त्यांच्यात मैत्रीचं गोत्र निर्माण होत गेलं त्याला प्रेमाचे अंकूर फुटले. आणि आयुष्याचे साथिदार होण्याचे त्यांनी निश्चित केले.
या वृध्दाश्रमानेही त्यांच्या विवाहाचे यजमानपद स्वीकारले. हेन्ना, संगित आणि अन्य धार्मिक विधी या संस्थेच्या आवारात पार पडले. सोबत राहणाऱ्या एकांती मित्रांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. केरळचे कृषीमंत्री व्हीएस शिवकुमार आणि जिल्हाधिकारी एस शानवास यावेळी आवर्जून उपस्थित होते…