आळंदी देवाची (पुणे) – येथील आपुलकी या वृद्धाश्रमातील आजी आजोबांसाठी दिव्यांगांनी दुसऱ्या मजल्यावर जाऊन सामाजिक बांधिलकी जपत अनोख्या पद्धतीने संक्रात साजरी करुन समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे. वास्तविक दिव्यांगांकडे समाजाकडून केवळ लाभार्थी म्हणून पाहिले जाते परंतू काही दिव्यांग मित्र तसेच सामाजिक जाणीव असणाऱ्या लोकांनी निराधार, दिव्यांग तसेच वृद्ध व्यक्तींच्या सेवेसाठी “बांधिलकी फाउंडेशन” या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत कर्णबधिर तसेच अंध दिव्यांगांच्या निवासी संस्थांना संक्रातीनिमित्त भेटी देऊन तेथील लोकांसोबत कौटुंबिक नातेसंबंध प्रस्थापित केले आहेत.
आपुलकी वृद्धाश्रमातील आजींना संक्रातीनिमित्त बांधिलकी फाउंडेशनच्या वतीने बांगडया, साड्या, आजोबांना कपडे, आश्रमासाठी आवश्यक किराणा साहित्य तसेच सर्वांना तिळगुळ वाटप कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी आपुलकी वृद्धाश्रमाचे प्रमुख भागवत महाराज बोराडे, बांधिलकी फाउंडेशनचे अध्यक्ष हरिदास शिंदे, सचिव विजय पगडे, सदस्य शिवशंकर मुंडे, दयानंद विश्वकर्मा, संगीता शिंदे, अंगणवाडी कर्मचारी सभेच्या शैलेजा चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पवार यांचेसह आश्रमातील आजी,आजोबा, सेवक वर्ग उपस्थित होते.
याप्रसंगी भागवत महाराज बोराडे म्हणाले की, दिव्यांगदेखील समाजाचा घटक असून आज दिव्यांगांनी समाजभान जपून आश्रमातील आजी आजोबांप्रती जो जिव्हाळा निर्माण केला आहे, त्यामुळे ते कधीच खचून जाणार नाहीत.
हरिदास शिंदे म्हणाले की, आयुष्यात प्रत्येकालाच वृद्धापकाळातून जायचे आहे त्यामुळे घरातील वयोवृद्ध व्यक्तींना जीवनात एकटेपणा वाटू नये यासाठी त्यांना सर्व कार्यक्रमात आदराने सहभागी केले पाहिजे. या जगात जो आत्मिक समाधानी आहे तोच खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे. त्यामुळे केवळ संपत्तीच्या हव्यासापोटी मानवता विसरता कामा नये.
“एक वर्षांपासून आपुलकी आश्रमात राहतेय, सणासुदीला जेवणात गोडधोड मिळतं पण मुलं, नातवंड दिसत नाहीत. आमच्यासोबत दिव्यांग बांधव सहपरिवार संक्रातीनिमित्त भेटल्यावर आम्ही स्वतःच्या घरी असल्याचा आनंद मिळाला.”
-आश्रमातील एक आजी