सध्या राज्यात अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकीचे वारे घुमत आहे. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) ( Uddhav Thackeray ) म्हणजे ठाकरे गट आणि बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदे गट या निवडणुकीत आपापली ताकद आजमावताना दिसणार आहेत. दरम्यान अंधेरी जागेसाठी ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली जाणार आहे. मात्र त्याअगोदर त्यांच्या मुंबई महापालिकेतील राजीनाम्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. लटके यांच्या राजीनामा स्वीकारण्यास उशीर होत असल्याने शिंदे आणि ठाकरे गटांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी याबाबत बोलताना उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
ऋतुजा लटके यांचा महापालिकेतील पदाचा राजीनामा मंजूर न करण्यासाठी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यावर राज्य सरकारचा दबाव असल्याचा आरोप ठाकरे ( Uddhav Thackeray ) गटाच्या नेत्यांकडून केला जात आहे. लटके या मुंबई महापालिकेत लिपिक पदावर कार्यरत आहेत. त्याचबरोबर त्या तृतीय श्रेणीतील कर्मचारी असल्याने त्यांचा राजीनामा विभागीय पातळीवर मंजूर व्हायला हवा, तो आयुक्तांपर्यंत जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. मात्र सरकारच्या दबावामुळे लटके यांचा राजीनामा स्वीकारला जात नसल्याचे ठाकरे गटाकडून म्हटले जात आहे.
ठाकरे ( Uddhav Thackeray ) गटाच्या याच आरोपांवर शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पावसकर म्हणाले की, “प्रत्येक वेळी हे फक्त लोकांची सहानुभूती मिळवण्याच्या प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी नेहमी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या जात आहेत. काहीही संबंध नसताना कारणे द्यायची आणि आपले घाणेरडे राजकारण साधायचे. ऋतुजा लटके यांचे पती रमेश लटके यांनी शिवसेना पक्षासाठी एव्हढे काम केल, त्यांच्याच पत्नीला तुम्ही शिंदेंची भेट घेतली आहे का ? असे प्रश्न विचारता. त्यांची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोणतीही भेट झालेली नाही.” असेही पावसकर यांनी म्हटले.
“आमदार पतीच्या पश्चात पत्नी निवडणुकीला उभी राहणार असेल तर त्या महिलेला आमच्या पक्षात या असं एकनाथ शिंदे हे कधीच म्हणणार नाहीत. एकनाथ शिंदे हे मर्द असून त्यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन हे सरकार निर्माण केले आहे. शिंदेंना नव्हे तर उद्धव ठाकरेंना ( Uddhav Thackeray ) असले बायकी धंदे शोभतात. अंधेरी विधासभा पोटनिवडणूक आम्ही आणि भाजप पक्ष सोबत मिळून लढणार आहोत. आमच्या बाजूने कोणता उमेदवार द्यायचा याबाबातच निर्णय मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. गुरुवारपर्यंत त्या उमेदवाराचे नाव जाहीर केले जाईल. असेही पावसकर यांनी म्हटले आहे.