मुंबई – नेहरूंना कश्मीर प्रश्न सोडविता आला नाही हे मान्य, पण मोदी सरकारने त्याच प्रश्नावर मते मागितली. सत्ता मिळविली, मग गेल्या आठ वर्षांत नेहरूंची कश्मीरबाबतची चूक सुधारण्यासाठी तुम्ही काय केलेत? नेहरूंची चूक सुधारण्यासाठीच लोकांनी मोदी यांना पंतप्रधान केले. मोदी हे का विसरत आहेत? मोदी हे जगाचे नेते झाले, पण देशाचे पंतप्रधान कधी होणार? असा सवाल शिवसेनेच्या मुखपत्रातून करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी हे जगातील एक महान नेते आहेत याविषयी कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही. मात्र त्यांना जगातील घडामोडींविषयी जितकी इत्यंभूत माहिती आहे, तेवढी आपल्या देशातील घडामोडींविषयी आहे काय, असा प्रश्न अनेकदा पडतो. रशिया-युक्रेन युद्धावर आपले पंतप्रधान बोलतात. ही युद्धाची वेळ नाही असे त्यांनी पुतीन यांना मैत्रीच्या नात्याने बजावले. त्याचा चांगलाच आंतरराष्ट्रीय गवगवा झाला, पण कश्मीरात जे सुरू आहे त्याचे खापर नेहरूंवर फोडून पंतप्रधान मोदी मोकळे झाले, अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.
तसेच गुजरातला सगळ्यात जास्त धोका अमली पदार्थांच्या तस्करीपासून आहे. गेल्या काही महिन्यांत हजारो कोटी रुपयांचे ड्रग्ज गुजरातच्या विमानतळांवर आणि बंदरांवर सापडले आहे. ही गुजरातसह देशासाठी चिंतेची बाब आहे. हे सर्व रॅकेट सुरळीत सुरू आहे. दहा हजार कोटींचा अवैध दारूचा व्यापार गुजरातेत सुरू असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. हा आरोप नसून सत्यच आहे. याबाबतची सत्य माहिती पंतप्रधानांपर्यंत पोहोचविण्यात गुप्तचर खाते कमी पडले, की पंतप्रधानांपासून गुजरातबाबतचे सत्य लपवले जात आहे? असा सवालही या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
“मोदी’ निवडणूक जिंकून देणारे यंत्रमानव
भाजपाने मोदी यांना निवडणुका जिंकून देणारा यंत्रमानव बनवले आहे. पंतप्रधान मोदी गुजरात दौऱ्यावर आहेत. तेथील विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्या दौऱ्याचे आयोजन व नियोजन भाजपने केले आहे. ऐन निवडणुकीत मोदी यांना आपल्या जातीची आठवण का व्हावी? पंतप्रधानांच्या मनात स्वतःची जात असावी, हे बरे नाही. जात विसरायला हवी. जात नाही ती जात या सावटातून बाहेर पडले पाहिजे. मोदी यांना देशभरातून मतदान झाले. तेथे जातीचा प्रश्न येतोच कोठे? त्यामुळे गुजरातच्या भूमीवर अशा प्रकारे जातपंचायत लावण्याची गरज नव्हती, असेही खडेबोल सुनावण्यात आले.