– अरुण गोखले
सूर्यास्त झाला की हळूहळू संध्याछाया पसरू लागते. दिवसाची डोळ्यांना सुखावणारी सृष्टी ही अंधाराच्या काळोखात गुडूप व्हायला लागते. दिशा काळोखल्या की रात्र होते. मध्यरात्रीचा काळोख हा तर अधिकच दाट असतो. त्या दाट काळोखातून मग हळूहळू एक प्रकाशाची ज्योत उदयास येत असते.
जसजशी पहाट फुटत जाते तशी ती प्रकाशाची ज्योत त्या विशाल अशा देदीप्यमान सूर्यनारायणात रूपांतरित होते. तो प्राचीवर उदयास आलेला सूर्यनारायण हा सर्व सृष्टीस त्या घोर काळोखातून बाहेर काढतो. प्रकाशाच्या वाटा दाखवितो.
हे आणि असं जसं निसर्गात घडत असतं तसंच ते मानवी जीवनातही घडत असते. जेव्हा अवघा मानवी समाज हा अज्ञानाच्या घोर अंधकारात स्वत:चं अस्तित्व हरवून बसण्याची वेळ येते, जेव्हा अधर्म, अनीती, अत्याचार यांचा घोर अंधकार हा मानवी जीवनास झाकाळू लागतो, समाज दिशाहिन होतो, समाजाला आपले हित आणि अहित हे अज्ञानाने कळेनासे होते, तेव्हाच त्या घोर अज्ञान, निराशा, याच्या गडद काळोखातून मानवी जीवनास ज्ञानाची वाट दाखविणाऱ्या तेजस्वी ज्ञानसूर्यांचा उदय होतो.
हे असं घडत आलेलं आहे. कारण तो या निसर्गाचाच एक भाग आहे. अज्ञानाच्या अंधकारातच चाचपडत असणाऱ्या जीवांना त्याच्या कल्याणाचा मार्ग दाखविण्यासाठीच थोर विभूती ह्या त्या गडद काळोखातूनच ज्ञानज्योतीच्या रूपाने प्रगट होत असतात.
अवघ्या मानवजातीला महान तत्त्वाचा बोध करून देणाऱ्या भगवान श्री कृष्णाचा जन्म हा कंसाच्या काळात कोठडीतच झालेला आहे. पण असे असले तरी ह्या सर्वांनी आपापल्या परीने अवघ्या मानवजातीच्या कल्याणाचा त्यांच्या हिताचा त्यांच्या आत्मोद्धाराचा मार्गच त्यांना दाखवून दिला आहे.
झाकोळणारी लोकांची जीवने ही ज्ञानाच्या प्रकाशाने उजळली आहेत. त्यांनीच लोकांना खरे सुखसौख्याचे, समाधानाचे, शांतीचे आणि सुखाचे मार्ग दाखविले आहेत. अशा थोर विभूती याच मानवी जीवनातल्या भवसागरामधले महान मार्गदर्शक, दीपस्तंभ आहेत. त्यांचे ज्ञान, त्यांची शिकवण, त्यांचा बोध हा चिरंतर आहे.