कोणतीही संघटना किंवा चळवळ ही कधीच संपत नसते. सध्या पंजाबमध्ये सुरू असलेली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती याच गोष्टींचा परिपाक आहे, असे म्हटले पाहिजे.
पंजाबचा प्रदेश हा संपन्न. येथे असलेली सुपीक जमीन आणि मुबलक पाणी संपूर्ण देशाची अन्नाची गरज भागवण्यासाठी सक्षम आहे. देशाच्या विकासात विशेषत: अन्नसुरक्षेत पंजाबचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. असे असताना स्वातंत्र्यानंतरच्या मागील 75 वर्षांच्या कालखंडात हा प्रदेश राजकीयदृष्टा अनेकदा अस्थिर राहिला आहे. 80 चे दशक हे स्वतंत्र भारताच्या इतिहासातील असे दशक आहे जेव्हा पंजाबची राजकीय परिस्थिती जम्मू-काश्मीरपेक्षा जास्त भयानक होती. परंतु, मागील काही वर्षांपासून पंजाबमध्ये शांतता असताना पुन्हा एकदा पंजाबला राजकीयदृष्ट्या अस्थिर करण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहेत.
ज्याप्रकारे दक्षिण भारतात 70च्या दशकांत द्रविडस्तानची चळवळ सुरू झाली. त्याचप्रमाणे 70 आणि 80 च्या दशकात पंजाबमध्ये खलिस्तानची चळवळ सुरू झाली होती. शिख समाजाचे स्वतंत्र राष्ट्र असावे या भावनेतून निर्माण झालेलं खलिस्तान (पवित्र भूमी)च्या मागणीने 80 च्या दशकात दहशतवादाचे स्वरूप धारण केले होते. जर्नेलसिंग भिंद्रानवाले यांच्या नेतृत्वात उभ्या राहिलेल्या या चळवळीने 1983-84 च्या काळात भारत सरकारशी अप्रत्यक्ष युद्ध पुकारले. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री बेअंत सिंग, लष्करप्रमुख जनरल अरुण कुमार वैद्य अशा महत्त्वाच्या व्यक्ती या काळात दहशतवादाच्या बळी पडल्या.
1986-87 च्या काळात पंजाब पोलिसांनी खलिस्तानी समर्थकांवर कठोर कारवाई केल्यामुळे आणि भिंद्रानवाले आणि मेजर साबेग सिंग अशा प्रमुख खलिस्तानी नेत्यांचा मृत्यू झाल्यामुळे खलिस्तान चळवळ हळूहळू थंड पडली. परंतु, भारतातून या चळवळीचा संपूर्ण नायनाट हा कधीच झाला नाही. कोणतीही संघटना किंवा चळवळ ही कधीच संपत नसते. ज्यावेळी चळवळीच्या मुख्य नेत्याचे निधन होते किंवा सरकारकडून ती दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केल्यानंतर संघटना नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा ती संघटना थंड पडते. पण ती संघटना अथवा चळवळ याबद्दल मनात प्रेमभाव बाळगून असलेले अनेकजण समाजात वावरत असतात. जेव्हा सरकारचे अशा प्रकारच्या संघटनांकडे संपूर्णपणे दुर्लक्ष होते तेव्हा त्या संघटनेला खतपाणी घालून ती पुन्हा एकदा जिवंत करण्याचा प्रयत्न हा संघटनेच्या समर्थकांकडून करण्यात येतो. सध्या पंजाबमध्ये सुरू असलेली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती याच गोष्टींचा परिपाक आहे, असे म्हटले पाहिजे.
पंजाबच्या अमृतसर येथे 17 जानेवारी 1993 रोजी जन्मलेले अमृतपाल सिंग कट्टर खलिस्तान चळवळीचे समर्थक आहे. तो उत्कृष्ट भाषण करतो. इंग्रजी आणि पंजाबी भाषांवर त्याचे प्रभुत्व असल्यामुळे त्याला संभाषणात कोणतीही अडचण येत नाही. आपल्या वक्तृत्वाने लोकांना विशेषत: तरुणांना मंत्रमुग्ध करून त्यांच्याकडून हवे ते काम करून घेण्याची कला अमृतपाल सिंग याला अवगत असल्यामुळे पंजाबमध्ये खासकरून अमृतसरमधील अनेक तरुणांवर त्याचा पगडा आहे. जर मुस्लिमांसाठी पाकिस्तान नावाचे राष्ट्र निर्माण होऊ शकते तर खलिस्तान नावांचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण का होऊ शकत नाही? हा त्याचा त्याच्या समर्थकांना प्रश्न आहे. अमृतपाल सिंग याच्या आक्रमक वृत्ती आणि भाषाशैलीमुळे त्याला लोक जर्नेलसिंग भिंद्रानवाले 2.0 असे संबोधतात.
फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अमृतसरमधील पोलीस ठाण्यात कैद केलेल्या आपल्या साथीदारांना सोडवण्यासाठी अमृतपाल सिंग याने आपल्या हत्यारबंद समर्थकांसह पोलीस ठाण्याला घेराव घालून अमृतसर पोलिसांना आपल्या साथीदारांना सोडवण्यासाठी भाग पाडले होते. तेव्हापासूनच अमृतपाल सिंग आणि त्याच्या वारीस पंजाब दे ही संघटना राष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनली होती. अमृतपाल सिंग आणि त्याच्या साथीदारांच्या बेधडक कृत्यामुळे पंजाबमध्ये पुन्हा एकदा 80चे दशक येते की काय अशी चर्चा सुरक्षाविषयक तज्ज्ञांमध्ये रंगली होती. काही तज्ज्ञांच्या मते अमृतसर पोलिसांनी अमृतपाल सिंग याच्यासमोर शरणागती पत्करुन त्याच्या साथीदारांना सोडून दिले. तर काही तज्ज्ञांच्या मते परिस्थितीचे भान राखत पोलिसांनी हा निर्णय घेतला होता. सध्याच्या परिस्थितीनुसार पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंग याच्याशी संबंधित अनेक लोकांना अटक केली असून स्वतः अमृतपाल सिंगला पकडण्यासाठी पंजाब पोलिसांनी पंजाबच्या सर्व सीमा या सुरक्षित केल्या आहेत. पंजाब पोलिसांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अमृतपाल सिंग याने पोलिसांसमोर समर्पणासाठी पुढील तीन अटी ठेवल्या आहेत. 1) पोलीस कोठडीत मारहाण करू नये. 2) फक्त पंजाबच्या तुरुंगात ठेवावे. 3) आत्मसमर्पणाला अटक दाखवू नये.
या ठिकाणी विशेष गोष्ट म्हणजे अशाच प्रकारच्या अटी जर्नेलसिंग भिंद्रानवाले यांनी पंजाब पोलिसांसमोर सुरुवातीच्या काळात ठेवल्या होत्या. सुरक्षा यंत्रणांकडे असलेल्या माहितीनुसार, अमृतपाल सिंग याला पाकिस्तानच्या आयएसआय आणि लष्कराचे समर्थन प्राप्त झाले आहे. अमृतपाल सिंग याला हाताशी धरून पंजाबमध्ये अशांतता निर्माण करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. फायनान्स ऍक्शन टास्क फोर्सच्या कारवाईतून बाहेर आल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा दहशतवादी कृत्ये करण्यास सुरुवात केली असून भारताने या गोष्टींची गंभीर दखल घेऊन पाकिस्तानला फायनान्स ऍक्शन टास्क फोर्सने ब्लॅक लिस्ट करावे यांसाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहेत.
पंजाब ही संतांची आणि वीरांची भूमी आहे. या भूमीतील अनेकांनी देशाच्या स्वातंत्र्य आणि एकतेसाठी प्राणांचे बलिदान दिले आहे. अमृतपाल सिंगच्या खांद्यावर बंदूक ठेवून पंजाबसारखा प्रदेश भारतापासून वेगळा करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न भारताने वेळीच ठेचून काढणे आवश्यक आहेत.