देव कुठे राहतो? हा प्रश्न विचारल्यावर तुम्हा-आम्हासारख्या बहुतेकांचे हात आकाशाकडे जातात. ज्यांना अध्यात्मात गती आहे, असे लोक म्हणतात, देव चराचरात व्यापून राहिलाय. या विश्वाच्या कणाकणात देव वास करतो. या दोन्ही उत्तरांचा मंदिराशी अजिबात संबंध नाही; मात्र तरीही बहुतांश लोक देवाला मंदिरातच का शोधतात?
“ओ माय गॉड’ या 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातल्या नायकाला हाच प्रश्न पडला होता. त्याला भेटलेल्या देवाला त्याने तो प्रश्न विचारला होता आणि देवाने उत्तर दिलं होतं, “”मला माझं स्वतःचं घर आहे. हे संपूर्ण विश्वच माझं घर आहे. मला छोट्याशा मंदिरात स्वतःला बंदिस्त करून घ्यायचं नाही.” नैसर्गिक आपत्ती म्हणजे “ऍक्ट ऑफ गॉड’ असून, त्यामुळे झालेलं नुकसान विमा कंपनी भरून देणार नाही, हे समजल्यावर थेट देवालाच नोटीस पाठवून कोर्टात बोलावणारा नायक या चित्रपटात दिसतो.
मध्य प्रदेशात खरोखरच अशी एक नोटीस थेट देवाला बजावण्यात आली आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. अतिक्रमित जागेवरचं मंदिर हटवावं, यासाठी ही नोटीस चक्क मारुतीरायांना बजावली गेली. वास्तविक, देवासाठी मंदिर बांधतो तो माणूसच; परंतु हे माहीत असूनसुद्धा मंदिर हेच देवाचं “घर’ आहे, असंच प्रोग्रामिंग आपल्या डोक्यात इतकं फिट्ट बसलंय, की या नोटिशीत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी हनुमंताला उद्देशून “आप का मकान’ असाच शब्द वापरलाय.
ग्वाल्हेरजवळ रेल्वे ब्रॉडगेज करण्याचं काम सुरू आहे आणि या मार्गात येणारी अतिक्रमणं हटवण्यासाठी रेल्वेनं नोटिसा काढल्या. मुरैना जिल्ह्यातल्या सबलगढ गावाजवळची काही घरं आणि एक मंदिर या मार्गात उभारल्याचं रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आलं. आपापलं घर सात दिवसांत हटवण्याच्या नोटिसा सगळ्यांना बजावण्यात आल्या. पण मंदिर हटवण्याची नोटीस थेट देवाच्या नावावर पाठवली गेली. ही “चूक’ आहे असं नंतर सांगितलं गेलं; पण ज्यांना नोटीस बजावायची, त्याच्या नावाच्या जागी “बजरंगबली’ असा शब्द “चुकून’ लिहिला गेला असेल, हे कुणाला पटेल? छापील नोटिशीत मोजकेच शब्द पेनानं लिहिलेले आहेत आणि “मकान’ याही शब्दाचा त्यात समावेश आहे.
मंदिराऐवजी “मकान’ लिहिणं आणि बजरंगबलीचं नाव टाकणं या दोन्ही चुका एकाच कागदावर होतील, असं वाटत नाही. मंदिर बांधणाऱ्यांना शोधून नोटीस बजावण्याचा कंटाळा किंवा भीती या दोन्हीपैकी एक कारण या नोटिशीमागं असणार, हे उघड आहे. कारण नोटीस कुणाच्या हातात न देता मंदिराच्या दारावर चिकटवण्यात आलीये. सात दिवसांत अतिक्रमण हटवलं नाही, तर रेल्वेला ते हटवावं लागेल आणि त्याचा संपूर्ण खर्च तुम्हाला द्यावा लागेल, असं बजरंगबलींना उद्देशून म्हटलंय.
अतिक्रमणाच्या श्रेणीत येणाऱ्या या मंदिराच्या बाबतीत आता रेल्वेनं “सुधारित’ नोटीस मंदिराच्या पुजाऱ्याच्या नावानं बजावलीय. ही चराचर सृष्टी ज्याचं घर आहे, त्या देवाच्या घरात आपण काही वर्षांचे भाडेकरू! पण ही सगळी भूमीच ज्याने तयार केली, त्याचं जन्मस्थळ नेमकं कोणतं यावरून झालेले वादही काही दिवसांपूर्वी बजरंगबलींना पाहावे लागले होते. आपण त्याच्याच जागेत त्याचं “घर’ बांधतो आणि त्याच्याच जागेतून ते काढण्यासाठी नोटीस बजावतो, हे सगळंच किती हास्यास्पद आहे!