आंतरराष्ट्रीय राजकारण असो वा खासगी जीवन, प्रत्यक्ष मैत्री निभावणारे काहीजण असतात, तर मैत्रीचे नाटक करून मैत्रीचा आव आणणारे काही असतात. फ्रान्स हे त्यापैकी पहिल्या गटात येणारे राष्ट्र आहे.
आंतरराष्ट्रीय राजकारणात कायमस्वरूपी असे काही नसते. परंतु, जेव्हा दोन राष्ट्रांमध्ये समान उद्दिष्टे, समान गरजा, समान विचारधारा असते; तेव्हा त्यांच्यामध्ये जी मैत्री बनते; ती अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय राजकारणाला आकार देणारी ठरते. भारत आणि फ्रान्स हे या घनिष्ठ मैत्रीची अशी उदाहरणे आहेत ज्यामुळे दोन्ही राष्ट्रांचा अंतर्गत विकास तर होईलच; परंतु आशिया आणि युरोपच्या राजकारणावर यामुळे भविष्यात सकारात्मक परिणाम दिसून येतील. प्रवासी विमान निर्मितीच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या एअरबस बरोबर भारताच्या टाटा उद्योग समूहाचा नुकताच 250 विमान खरेदी संदर्भात करार झाला असून पुढील काळात टाटांच्या माध्यमातून एअरबसचे उत्पादन भारतात करण्यात येणार आहे. सदर करारामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना तर मिळणारच आहे; पण याच बरोबर भारतात व्यावसायिक आणि प्रवासी विमानांची निर्मितीसुद्धा होणार आहे. येणाऱ्या काळात हा करार भारताच्या विकासात मैलाचा दगड ठरणार आहे.
भारत-फ्रान्स मैत्री संबंधांचा इतिहास
भारताच्या स्वातंत्र्यापासून सुरू झालेली भारत-फ्रान्स मैत्री आज जशी घनिष्ठ आहे; तशी ती पूर्वी नव्हती. इंग्लंडमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीतून युरोपमध्ये निर्माण झालेल्या वसाहतवादाच्या स्पर्धेत फ्रान्स इंग्लंडचा प्रमुख स्पर्धक होता. त्यामुळे जगातील वेगवेगळ्या वसाहतींवर ताबा मिळवण्यासाठी ब्रिटिशांनी जे हातखंडे वापरले तेच आफ्रिकेत फ्रेंचांनी वापरले. भारतावर ताबा मिळवण्यासाठी इंग्लंड आणि फ्रान्स दोन्ही राष्ट्रांमध्ये अनेकदा संघर्ष झाला. पण 1757 ते 1763 या काळात झालेल्या तिसऱ्या कर्नाटक युद्धात ब्रिटिशांनी फ्रेंच सैन्याचा पराभव केल्यानंतर मात्र फ्रान्सने भारताकडे पुन्हा वळून पाहिले नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात भारताचा काही ठराविक भाग वगळता भारत आणि फ्रान्स असा संबंध कधी आला नाही. ब्रिटिश आणि फ्रेंच एकमेकांचे कट्टर विरोधक असल्याने होणारा संघर्ष टाळण्यासाठी दोन्ही राष्ट्रांनी एकमेकांच्या वसाहतींपासून दूर राहणेच पसंत केले. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत-फ्रान्स द्विपक्षीय संबंधांची बोलणी खऱ्या अर्थाने सुरू झाली. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुढाकाराने 1950 मध्ये भारत-फ्रान्स मैत्रीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. भारत-फ्रान्स मैत्रीचे 1950 पासून सुरू झालेले पर्व हे आजही सुरू आहे. भारताच्या हक्काचा आणि भरवशाच्या मित्रांपैकी एक अशी फ्रान्सची आजची ओळख आहे.
वाईट काळात भारताला साथ
1947च्या स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत स्वतंत्र भारताच्या इतिहासात अनेक चढउताराचे प्रसंग आले आहेत. “संकटात उपयोगी पडतो, तोच खरा मित्र’ या उक्तीचा तंतोतंत प्रत्यय हा या काळात भारत-फ्रान्स मैत्रीच्या माध्यमातून दिसून आला. 1947 च्या पहिल्या काश्मीर युद्धापासून ते 1999च्या कारगिल युद्धापर्यंत पाकिस्तानच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा परदेशी शक्तींनी भारताला त्रास देण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा फ्रान्स भारताच्या मदतीला धावून आला. पाकिस्तान आणि समविचारी राष्ट्रांचे वाढते आव्हान लक्षात घेऊन भारताच्या सुरक्षेसाठी अण्वस्त्र चाचण्या करणे गरजेचे आहे या विचारातून भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पोखरण येथे मे 1998 मध्ये अण्वस्त्र चाचण्या घेतल्या तेव्हा अमेरिकेसह संपूर्ण जगाने भारतावर तोंडसूख घेतले होते. भारताचा बहिष्कार करण्याबरोबरच भारतावर कडक आर्थिक निर्बंध त्या काळात लावण्यात आले होते. परंतु, भारताच्या या कठीण प्रसंगात फ्रान्सने भारताला समर्थन दिले. तसेच भारताच्या अण्वस्त्र चाचण्या या पाकिस्तानचा वाढता धोका लक्षात घेऊन किती आवश्यक होत्या हे जगाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. भारताच्या अण्वस्त्र चाचण्यांना खुलेपणाने पाठिंबा देणारे फ्रान्स हे पहिले राष्ट्र ठरले.
आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर सहकार्य
फ्रान्स हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यांपैकी एक राष्ट्र आहे. उलटपक्षी भारत, जर्मनी, जपान आणि दक्षिण आफ्रिका (जी-4) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बदल करण्याची मागणी करीत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्य होणे म्हणजे एक प्रकारचे ब्रह्मास्त्र आपल्या हातात येण्यासारखे आहे; त्यामुळे सहजासहजी कोणतेही राष्ट्र सुरक्षा परिषदेत इतरांना सहभागी करून घेण्यास तयार होत नाही. फ्रान्स हा या ठिकाणी सुरक्षा परिषदेत अपवाद असून भारताच्या स्थायी सदस्यात्वाचा पाठीराखा आहे.
एनएसजी अर्थात न्यूक्लिअर सप्लायर ग्रुपमध्ये भारताचा प्रवेश गेल्या अनेक वर्षांपासून चीनच्या विरोधामुळे अडलेला आहे. भारत हे जबाबदार अण्वस्त्रधारी राष्ट्र असल्यामुळे भारताचा सहभाग हा एनएसजीमध्ये असला पाहिजे यासाठी फ्रान्स प्रयत्नशील आहे.
ऊर्जा क्षेत्रातील भारत-फ्रान्स सहकार्य दिसून येते. 2015 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने भारत आणि फ्रान्स यांनी इंटरनॅशनल सोलर अलायन्स (आंतरराष्ट्रीय सौर गट)ची स्थापना केली असून ऊर्जेची वाढती गरज लक्षात घेऊन सौरऊर्जेच्या माध्यमातून जगाची ऊर्जेची गरज मोठ्या प्रमाणात पूर्ण करणे हा त्या मागचा उद्देश आहे. इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय भारतातील गुरुग्राम येथे असून कोणत्याही आंतरराष्ट्रीय संघटनेचे भारतात असलेले हे एकमेव मुख्यालय आहे.
संरक्षण क्षेत्रात वाढती भागीदारी
भारत हे जगातील तुरळक असलेल्या राष्ट्रांपैकी एक आहे ज्याच्या मुख्य सीमा या शत्रू राष्ट्रांनी घेरलेल्या आहेत. अशा परिस्थितीत भारताचे संरक्षण हे भारतासाठी महत्त्वाचे आहे. संरक्षण क्षेत्रात भारताची फ्रान्स बरोबर असलेली भागीदारी भारताला लष्करी क्षेत्रात महासत्ता बनविण्यासाठी मदत करते. भारताने फ्रान्सकडून अनेक युद्धनौका, पाणबुड्या, लष्करी विमाने यांची खरेदी केली आहे. भारताच्या सुरक्षेत फ्रान्सकडून आयात करण्यात आलेली सामग्री आज महत्त्वाची भूमिका पार पाडते आहे. नुकतीच फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेली राफेल विमाने जगातील सर्वात उत्तम लढाऊ विमानांपैकी एक आहेत. तसेच पी-75 प्रकल्पाअंतर्गत आधुनिक सहा लढाऊ पाणबुड्या बनवण्याचा प्रकल्प सदर राष्ट्रांमध्ये सुरू आहे. भारताचे स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान असलेल्या तेजसचे इंजिन फ्रान्सच्या मदतीने बनविण्यात आले आहे. तसेच इतर संरक्षण विषयक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण वेळोवेळी फ्रान्सकडून भारताला होत असते.
समान आंतरराष्ट्रीय आव्हाने
भारत आणि फ्रान्स यांच्यासमोर सध्याच्या काळात आंतरराष्ट्रीय आव्हानेही समान आहेत. हिंदी महासागरातील चीनचा वाढता हस्तक्षेप आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरील चीनची दादागिरी अनेक राष्ट्रांना नको आहे. अशावेळी चीनच्या संकटाचा सामना करण्यासाठी दोन्ही राष्ट्रे समविचारी राष्ट्रांना बरोबर घेऊन एकत्रित प्रयत्न करताना दिसून येतात. स्वतंत्र भारताच्या इतिहासात भारताला ज्या काही ठराविक राष्ट्रांनी मनापासून साथ दिली फ्रान्स हे त्यांपैकी एक आहे.