पुणें, ता. 24 – “”इंग्रजी भाषा आणि वाङ्मय यांचे देशातील शैक्षणिक अभ्यासक्रमातून सध्या उच्चाटन करण्याचे जे प्रयत्न चालले आहेत, ते निषेधार्ह आहे; इंग्रजी भाषेचे उच्चाटन इतक्या तातडीने होता कामा नये,” असे उद्गार अनमलाई विद्यापीठाचे उपकुलगुरू सर सी. सी. रामस्वामी अय्यर यांनी आज पुणे विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभानिमित्त भाषण करताना काढले. ते पुढे म्हणाले, “”हिंदुस्थानला राजकीय स्वातंत्र्य आणि मानसिक स्वराज्य मिळाले असल्याने आता इंग्रजी भाषेच्या भयाने आपल्या मनात न्यूनगंड होण्याचे कारण नाही. त्याचप्रमाणे इंग्रजी भाषेचे चुकीचे उच्चार आणि चुकीची वाक्यरचना करून आपल्याला उत्तम इंग्रजी भाषा येते हा अहंकारही आपण मिरवता कामा नये.
देशाच्या राज्यकारभाराच्या सोयीसाठी आणि इंग्रजी भाषेने जनताजनार्दन आणि विद्वज्जन यांत पाडलेले अंतर नष्ट करण्यासाठी राष्ट्रभाषेचा विकास करणे जरूर आहे. पण रोज नवनव्या लागणाऱ्या शोधांनी आणि दळणवळणाच्या साधनांनी जग आकुंचन पावू लागले आहे. खेरीज हिंदुस्थानला आज आंतरराष्ट्रीय महत्त्व पावले आहे. केवळ व्यापार आणि देवघेव यासाठीच नव्हे, तर ज्ञानाची सर्व दालने हिंदुस्थानला मोकळी व्हावी, यासाठी इंग्रजी भाषा आणि वाङ्मय यांचा आपण अभ्यास केला पाहिजे.
आपापल्या क्षेत्रांत हिंदी स्त्री-पुरुषांना समाधानकारकरीतीने प्रगती करता यावी म्हणून इंग्रजीसारख्या आंतरराष्ट्रीय भाषेचे महत्त्व विसरता कामा नये.
इंग्रजीने स्पॅनिश, फ्रेंच आणि जर्मन यासारख्या मी, मी म्हणविणाऱ्या आंतरराष्ट्रीय भाषांना मागे हटविले आहे. आपल्यावर परदेशी लोकांनी एक परकी भाषा लादली आहे, अशा गैरसमजुतीने इंग्रजीचा एवढा तिटकारा केला जात आहे की, विद्यार्थी आणि शिक्षक यांची जणू काय अहमहमिका लागली आहे. इंग्रजी भाषेतील काही पुस्तकांचे भाषांतर केले म्हणजे आपले भागले, अशी काही लोकांची गैरसमजूत झाली आहे. पण इंग्रजी वाङ्मय सागरातील साहित्य, कला, विज्ञानशास्त्रे या एकेका दालनांतील एकसहस्रांश पुस्तके भाषांतर करावयाची म्हटली तरी आपली सारी हयात निघून जाईल. एवढ्या विशाल वाङ्मय सागराकडे पाठ फिरवायची आणि डोळेझाक करावयाची म्हणजे आपणच आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे.