100 वर्षांनी सहा अब्ज पोटे पोसली पाहिजे
वॉशिंग्टन, ता. 25 – आणखी 100 वर्षांनी म्हणजे 2058 साली 6 अब्ज लोकांच्या अन्नाची तरतूद जगाला करावी लागेल. असा अंदाज युरोपचे जमीन तज्ज्ञ जी. व्ही. जॅक्स यांनी केला आहे.
त्यांचे म्हणणे असे आहे की, उद्योगधंदे असलेली गावे वसली की शेतकऱ्यांना मिळते त्याहून अधिक रक्कम जमिनीत गुंतवून जमिनीचा सुपीकपणा वाढविता येतो. तेव्हा 2058 साली 6 अब्ज लोकांना पोसणे शक्य होईल का? होय शक्य आहे. मात्र या लोकसंख्येतील बरेचसे लोक शहरांत राहतील तरच हे होऊ शकेल. शहरातील लोक आपल्या अन्नासाठी अधिक किंमत देतील तरच अन्नाचे उत्पादन अधिक होईल.
101 तास चालविली सायकल
कोल्हापूर – आनंद होनावरकर या कारवारच्या तरुणाने अखंड 101 तास सायकल चालविण्याचा विक्रम करून दाखविला आहे. रविवारी सकाळी दहा वाजता सायकल चालविण्यास त्याने सुरुवात केली होती. आज दोन प्रहरी तीन वाजता त्याने 101 तास पुरे केले.
भाजी आळीतील मासळीची दोन गुदामे हलविण्यात आली
पुणे – रविवार पेठेतील भाजी आळी येथे अनधिकृतरीत्या असलेली दोन गुदामे, त्या ठिकाणाहून हलविण्यात पुणे महानगरपालिकेच्या आरोग्यखात्यास यश आले आहे. या प्रकरणाची हकीकत अशी आहे की, रविवार पेठ, भाजी आळी या ठिकाणी 1955-56 सालापासून, सुकी मासळी ठेवलेली दोन गुदामे आहेत. परंतु, या भागात अशा तऱ्हेचा धंदा करू द्यायचा नाही असे महापालिकेने ठरविले.
मुलींना मोफत शिक्षण शिवाय कपडे व जेवण
नवी दिल्ली – 6 ते 14 या वयोमर्यादेतील सुमारे 2 कोटी 70 लक्ष मुली शाळेचे तोंड बघत नाहीत. या मुलींनी शाळेत जावे या दृष्टीने सरकारने घटक राज्यांना अधिक आर्थिक मदत देण्याचे ठरविले आहे. प्राथमिक शाळेतील मुलींना फी द्यावी लागणार नाही. काही मुलींना कपडे, दुपारचे जेवण व पुस्तकेही दिली जातील. मुलींच्या शिक्षणासाठी या वर्षी मुंबई राज्याला 354250 रु. मिळतील. यामुळे मुलींचे शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढेल.