-माधव विद्वांस
मराठी रंगभूमी गाजविलेले नटश्रेष्ठ पद्मश्री दाजी भाटवडेकर यांचा आज स्मृतिदिन. त्यांचे नाव केशवचंद्र मोरेश्वर भाटवडेकर. त्यांचा जन्म मुंबई येथे 15 सप्टेंबर 1921 रोजी झाला. त्यांचे जन्मशताब्दी वर्ष चालू आहे. ते संस्कृत विषय घेऊन एमए झाले होते. त्यांचे आजोबा मुंबईचे महापौर व प्रसिद्ध डॉक्टर होते. घरातील वातावरण धार्मिक होते.
घरात होणाऱ्या कीर्तनाचे ते निरीक्षण करीत व कीर्तनकारांच्या हुबेहूब नकला करीत असत. एकदा वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी गिरगावातल्या ब्राह्मणसभेत तासभर कीर्तन करून “बालकीर्तनकार’ अशी उपाधी मिळवली. आर्यन हायस्कूलमध्ये अनेक वर्षे कृष्ण जयंतीला ते कीर्तन करीत असत. भारदस्त आवाज व कीर्तनातील खड्या आवाजात पदे/अभंग म्हणायचा सराव यामुळे त्यांनी संगीत नाटकांत भूमिका करायला सुरुवात केली.
संस्कृतमध्ये त्यांनी केवळ पारंपरिक संस्कृतातील नाटकांच्या बरोबरीने गाजलेल्या मराठी नाटकांचे संस्कृतमध्ये रूपांतर करून त्याचे प्रयोगही केले.त्यांनी 1950 ते 1980 या काळात अनेक संस्कृत नाटके रंगभूमीवर आणली. कालिदास महोत्सवामध्ये “अभिज्ञानशाकुंतल’ या संस्कृत नाटकाचा प्रयोग भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि अन्य सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीत सादर केला. गंभीर स्वरूपाच्या आजारातून बाहेर पडल्यावर त्यांचे मन अध्यात्मामध्ये अधिकच रमले. त्याच वेळी त्यांनी “तोचि एक समर्थ’ या चित्रपटात स्वामींची भूमिका साकारली. आपल्या सुमारे 65 वर्षांहूनही अधिक काळातील अभिनय कारकिर्दीत त्यांनी 70 हुन अधिक भूमिका केल्या.
“संगीत संशयकल्लोळ’मधील “फाल्गुनराव’, “सौंभद्रा’तील “बलराम’, “एकच प्याला’तील “सुधाकर’, “मानापमाना’तील “लक्ष्मीधर’, “भाऊबंदकी’तील “राघोबा’ यांबरोबरच “बेबंदशाही’मधील “कलुषा कब्जी’ अशा विविधरंगी भूमिका त्यांनी केल्या.
अनेक मान-सन्मान, प्रसिद्धी मिळाली, पण त्यांची विनयशील वागणूक बदलली नाही. आपल्या यशाचे श्रेय ते ज्येष्ठ कलावंतांना देत असत.नटवर्य गणपतराव बोडस, नटश्रेष्ठ केशवराव दाते, के. नारायण काळे, मा. दत्ताराम, नानासाहेब फाटक, विश्राम बेडेकर, मामा पेंडसे, मो. ग. रांगणेकर, पार्श्वनाथ आळतेकर, दुर्गा खोटे यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले असे ते आवर्जून सांगत असत. पु. ल. देशपांडे यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच “काकाजी’ची अजरामर भूमिका आपण वठवू शकलो असे ते विनयाने सांगतात.
भारतरत्न महामहोपाध्याय डॉ. पां. वा. काणे यांनी दाजींच्या संस्कृत रंगभूमीवरील योगदानाबद्दल त्यांच्या एका ग्रंथात खास उल्लेख केला आहे. ते संगीत व संस्कृत नाटकांचे पुरस्कर्ते असले तरी लोकांची बदलणारी आवड ते ओळखून होते. त्यांच्या आयुष्यात त्यांनी रंगभूमीवरील बदलांचा मनापासून स्वीकार केला. धकाधकीच्या जीवनात विनोदाची गरज आहे, हे प्रांजळपणाने दाजी कबूल करीत असत. जुन्या भाषेतील मराठी आता राहिली नाही, पैसा हीच भाषा झाली आहे आणि तीच काळाची गरज आहे, हे जीवनाचे तत्त्व दाजींनी खुल्या दिलाने कबूल केले.
वयाच्या सत्तराव्या वर्षी संस्कृत रंगभूमी समोरील अडचणींचा संशोधनपर ग्रंथ त्यांनी तयार केला, त्यासाठी वर्ष 1993 मध्ये मुंबई विद्यापीठाची “डॉक्टरेट’ पदवी त्यांनी मिळवली. 26 डिसेंबर 2006 रोजी या रंगकर्मीच्या जीवनावर अखेरचा पडदा पडला.