भारताच्या भूत-भविष्याविषयी अझरबैजानी कलावंतांची चित्रे
मॉस्को, ता. 10 – मिहाइल अब्दुल्लायेव्ह या अझरबैजानी कलावंताने भारताच्या भूत-वर्तमान व भविष्यकाळासंबंधी आपल्या चित्रांची एक मालिका पूर्ण केली आहे. त्यात भारतावरील ब्रिटीश राजवटीचे गंभीर परिणाम प्रतीकात्मकदृष्ट्या व्यक्त करणाऱ्या एका चित्रात एक ब्रिटीश सैनिक आपली संगीन जमिनीत खुपसून खडा आहे असे दृश्य आहे.
“कामावरून परत’ “राजस्थानची मुलगी’ “दूरवरच्या जयपूरमध्ये’ ही त्यांनी भारतात असताना काढलेली चित्रं होत. मॉस्कोतील प्रदर्शनात त्यांच्या चित्रांची वाहवा झाली होती. भारतासंबंधी दुसरी चित्रमालिका अब्दुल्लायेव्ह तयार करीत आहेत; तिचे नाव “भारताचा अरुण्योदय’ असे आहे.
लोकशाहीच्या यशासाठी जनतेने कर्तव्याची जाणीव जिवंत ठेवावी
जाकर्ता – “”संसदीय लोकशाही असलेल्या राष्ट्रांतील लोकांनी आपल्या सरकार विषयीच्या कर्तव्याबाबत “जिवंत जाणीव व जागृती’ दाखविली पाहिजे” असे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी इंडोनेशियाच्या संसदेपुढे भाषण करताना सांगितले. ते पुढे म्हणाले, की वर्धिष्णू आणि नव्या लोकशाहीच्या बाबतीत तर हे अधिकच खरे आहे. अशी कर्तव्य जागरूकता नसेल तर त्याचा परिणाम गटाची राजवट येण्यात किंवा अन्यप्रकारे भ्रष्टाचाराचा सुळसुळाट होण्यात होईल.
पाकिस्तानात झालेले परिवर्तन राष्ट्रकुटुंबाच्या संबंधाशी विसंगत
नवी दिल्ली – “”संसदीय लोकशाही राजवट जाऊन पाकिस्तानात दुसरी राजवट आली, राष्ट्रकुटुंबापुरता पाहता हा अशा प्रकारचा बदल म्हणजे महत्त्वाचा व मोठाच बदल आहे असे मानले पाहिजे,” असे पंतप्रधान नेहरू यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, राष्ट्र कुटुंबातील राष्ट्रांमध्ये लोकशाही व संसदीय स्वरूपाची सरकारे होती हाच त्या राष्ट्रांमधील भावनात्मक दुवा वा बंध होता. तेव्हा संसदीय सरकार नाहीसे होण्याने हा भावबंध तुटून पडतो. लोकशाहीवर श्रद्धा असणाऱ्यांना अशा बदलाने अस्वस्थ करायला हवे परंतु त्याने अस्वस्थ न होता उलट काही लोक या लोकशाही विन्मुखतेचे स्वागतच करीत आहेत.