-अरुण गोखले
कुणाच्याही ऋणात राहू नका, ही शिकवण आपल्याला चांगलीच माहीत आहे. त्यामुळेच आपणही जीवनात अनेक वेगवेगळ्या ऋणातून मुक्त होण्याचा, ती फेडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. असे करताना आपली काही लौकिक जीवनातली ऋणही फेडता येतातही, उदा., कर्जाऊ घेतलेले पैसे, घेतलेली वस्तू परत करणे इत्यादी.
पण माणसाच्या जन्माबरोबर तो अशा एका ऋणात जन्मभर बद्ध असतो की, ते ऋण काही केल्या फिटत नाही, ते म्हणजे जन्मदात्या माता पित्याचं ऋण.
आपली संस्कृती तर आपल्याला हेच शिकविते की, बाबांनो! तुम्ही आस्तिक असा वा नास्तिक, तुम्ही देव माना अथवा मानू नका; पण हे विसरू नका की तुमच्या मनात, आचरणात जन्मदात्या मातापित्याबद्दल आदर, प्रेम आणि कृतज्ञता असायलाच हवी.
आई-बाप हे दैवत माझे, असता माझ्या घरी। कशाला जाऊ मी पंढरपुरी? ही अनुभूती आई-वडिलांची सेवा, त्यांचा आदर, त्यांचा सन्मान करायला हवा हे सांगायला आणि शिकवायला पुरेशी आहे. आपली संस्कृती तर त्यांना देवाचे स्थान देते. त्या पंढरीच्या पुंडलिकानेही जेव्हा आपल्या मातापित्याची त्यांना देव मानून सेवा केली तेव्हाच ते पंढरीचं सावळं परब्रह्म हे त्याच्यासाठी त्याच्या दारी येऊन उभे राहिले. त्यानेच आदराने पुढे केलेल्या विटेवर ते गेली अठ्ठावीस युगे उभे आहे. आपले माय-बाप ज्यांना कळले त्यांनाच तो विटेवरचा मायबाप कळेल, असं जे संत म्हणतात ते ह्यासाठीच.
ज्या आई-वडिलांनी आपल्याला जन्म दिला, त्यांचा आदर, त्यांची सेवा, त्यांचा सन्मान करणे म्हणजे त्या न फिटणाऱ्या ऋणातून काही अंशाने मुक्त होण्यासारखे आहे. आपण आपल्या कतृत्वाने त्यांचा मुलगा किंवा मुलगी असे गौरवाने, कौतुकाने म्हणवून घेत त्यांच्या मोठेपणात भर घालणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.
पण सभोवतालची परिस्थिती पाहिली तर असे लक्षात येते की, पाश्चात्य संस्कृतीचा पगडा यामुळे आपल्याला या दैवतांची अडचण वाटू लागली आहे. उपकाराची परतफेड अपकारानी करून आपण त्यांची करीत असलेली आबाळ, त्यांना दाखवीत असलेला वृद्धाश्रमाचा रस्ता, त्यांच्याबद्दलची अनास्था ह्या गोष्टी योग्य नाहीत. आपण आज जे पेरू तेच उद्या उगवणार आहे, हे विसरून चालणार नाही.