कलकत्ता, ता. 30 – ऐक्य, शांतता, सामर्थ्य आणि उत्कर्षाची वाटचाल करताना महात्मा गांधी यांच्या तत्त्वांचा आणि शिकवणुकीचा दीपगृहासारखा मार्गदर्शक म्हणून उपयोग होईल, असे पंतप्रधान प. नेहरू यांनी येथे भाषण करताना सांगितले. येथील पार्क स्ट्रीटवरील चौरंगी चौकात महात्माजींच्या पुतळ्याचे अनावरण करताना पंडितजी बोलत होते.
पंडितजी म्हणाले, काळ जसा बदलतो तसे नवे प्रश्न निर्माण होतात. तथापि कोणतीही नवी समस्या असो, महात्मा गांधींच्या जवळ त्याचे उत्तर आहे. सर्व देशभर महात्माजींच्या स्मृत्यर्थ पुतळे, सभागृहे किंवा आणखी कसली स्मारके उभारायला हरकत नाही; पण राष्ट्रपिता गांधी यांची शिकवण व तत्त्वांचे आचरण करणे महत्त्वाचे आहे, हे ध्यानी बाळगले पाहिजे. केवळ त्यांच्या जयंती दिवशी सूत काढून किंवा “महात्मा गांधी की जय’ अशी घोषणा करून भागणार नाही.
पंडितजी पुढे म्हणाले, मी महान भारतीय शास्त्रज्ञ आचार्य जगदीशचंद्र बोस यांचे शताब्दी समारंभासाठी आलो आहे. त्यांनी भूतकाळाची वर्तमानकालीन तांत्रिक ज्ञानाची सांगड घातली; इकडे मी जनतेचे लक्ष वेधतो. सध्याचे युग तांत्रिक विकासाचे आहे. विज्ञानाचे आहे. अणुशक्तीचा योग्य वापर कसा करायचा हा सध्याचा मोठा प्रश्न आहे. अणुशक्तीने जसा विश्वसंहार करता येईल तशी नव्या जगाची उभारणीही करता येईल.
जगदीशचंद्र बोस यांनी विज्ञानाला अध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त करून दिले. सध्याचे विज्ञान प्रागतिक आहे खरे पण त्याने जगाला दोन महायुद्धाच्या खाईत लोटले आणि तिसऱ्या महायुद्धाचे टोकाशी आणून ठेवले. म्हणून आपण विज्ञानाला शेती-उद्योगधंदे, दळणवळण इत्यादींचे प्रगतीसाठी राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. विध्वंसक नव्हे विधायक कारणासाठी विज्ञानाचा उपयोग करून घेतला पाहिजे. रशिया-चीन-पाककडून हल्ला होण्याची भीती वाटत नाही काय, असे प्रश्न पश्चिमी मित्र नेहमी विचारतात. हे लोक भीतीगंडाने पछाडलेले आहेत. मला कोणत्याही राष्ट्राची अशी भीती वाटत नाही. रशिया-चीन-पाकशी आमचे स्नेहाचे संबंध आहेत. ते वाढतीलच, असाही विश्वास पंडितजींनी व्यक्त केला.
खासगी क्षेत्राच्या तथाकथित संरक्षकाकडून करण्यात येणाऱ्या टीकेचा परामर्श घेताना पंडितजी म्हणाले, मी समाजवादी समाजरचनेचा पुरस्कर्ता आहे. सरकारी क्षेत्राच्या प्रगतीत अडथळे उत्पन्न करायला नको. खासगी व सरकारी दोन्ही क्षेत्राची प्रगती ध्येयसिद्धीस पुरक झाली पाहिजे.