-हेमंत देसाई
भाजप मुस्लिमांना क्वचितच निवडणुकीची तिकिटे देतो. भाजपने मुस्लिमांना तिकिटे दिली असती, तर राजस्थान, दिल्ली, कर्नाटक वा मध्य प्रदेशात त्यांच्या अधिक जागा निवडून आल्या असत्या. मुस्लिमांना डावलण्याची भूमिका तर यात स्पष्ट दिसतेच, पण त्यांच्यावाचून आमचं काही अडणार नाही. त्यांच्याविनाही आम्ही निवडून येणारच. मग त्यांनाच आम्हाला शरण यावं लागेल, असा पवित्रा यात दिसतो.
यूएलपीए किंवा अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट, या कायद्याचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप करत, एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. यूएलपीएचा वापर केवळ निर्दोष, दलित आणि मुस्लिमांविरुद्धच केला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच भाजपची नेते मंडळी गोरक्षेच्या नावाखाली झुंडबळी घेणाऱ्यांच्या गळ्यात हार घालतात, असा आरोपदेखील ओवैसी यांनी केला आहे. त्याचवेळी दहशतवादाच्या संदर्भातील आरोपी असलेले भाजपचे खासदार हे महात्मा गांधींच्या खुन्यांबद्दल आदर व्यक्त करत असताना दिसले आहेत, असे प्रतिपादन ओवैसींनी ट्विटमधून केले.
बिहारमध्ये एमआयएमला विधानसभेच्या पाच जागा जिंकता आल्या. 2015 मध्ये बिहारमध्ये प्रवेश केलेल्या एमआयएमचे हे यश नेत्रदीपक आहे. परंतु त्यांच्यामुळे महागठबंधनचे नुकसान होऊन, जदयू-भाजप आघाडीचा फायदा झाला. म्हणूनच एमआयएम ही भाजपची बी टीम आहे, असा आरोप केला जात आहे. आपली ही प्रतिमा पुसण्यासाठीच ओवैसी अधूनमधून भाजपवर तोंडसुख घेत असतात. उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांत सध्या “लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी कायदा करण्याची तयारी सुरू झाली आहे. परंतु विशेष विवाह कायदा रद्द केल्यास, घटनेतील कलम 14 व 21चे उल्लंघन होणार आहे. पण बेरोजगार तरुणांचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप असली नाटके करत आहे, असा तुफानी हल्ला ओवैसींनी केला आहे.
बाबरी मशिदीसाठी जी जमीन देण्यात आली आहे, तिथे काही कार्यक्रम होता तेव्हा, आपण त्यास उपस्थित राहणार का, असे विचारले असता, “मी कशाला जाऊ? तसंच मला ते कशाला बोलावतील?’ असे उत्तर पत्रकारांना योगीजींनी दिले होते. वास्तविक त्यांना आमंत्रण देणार असल्याचे संबंधितांनी जाहीर केले होते. पण मुस्लिमांकडे संपूर्ण दुर्लक्ष करायचे, हीच भूमिका असल्यावर हेच होणार. भाजप पुन: पुन्हा निवडणुका जिंकत असताना, या पक्षाच्या बाजूने उभे राहावे असे मुस्लिमांना वाटणार नाही. परंतु भाजपची विचारसरणी अशी आहे, की तीच मुस्लिमांच्या आकांक्षांना प्रतिसाद न देणारी आहे.
मुस्लीम समाजाचा माणूस आमदार, खासदार, मंत्री वा नेता व्हावा, असे या पक्षास मनापासून वाटत नाही. तोंडी लावण्यापुरती एखाद दुसऱ्या व्यक्तीला मंत्रिपदे दिली जातात. भाजपला ओवैसी हवे आहेत. कारण त्यामुळे मतविभाजन होते, अशी एक सर्वसाधारण समजूत आहे. परंतु हिंदूचे ध्रुवीकरण केल्यास, भाजपला एमआयएम व कोणत्याही पक्षाची गरजच भासणार नाही. काही ठिकाणी त्यांना एमआयएमसारख्या पक्षांचा अप्रत्यक्ष फायदा होत असेल. परंतु त्यासाठी भाजपतर्फे विशेष प्रयत्न होत आहेत, असे वाटत नाही. बिहारच्या इतिहासात यावेळी प्रथमच सत्तारूढ पक्षाच्या बाजूने एकही मुस्लीम आमदार नाही.
बिहारमध्ये 17 टक्के मुस्लीम आहेत, पण भाजपने एकाही मुस्लिमास विधानसभेचे तिकीट दिले नाही. मुस्लिमांना वगळण्याचा पद्धतशीर प्रयत्न करणाऱ्या भाजपला एमआयएमचे बिहारमधील पाच आमदार कशाला रुचतील? हिंदूंनी भाजपला मत द्यावे आणि मुस्लिमांनी “त्यांच्या पक्षास’ मत द्यावे, हाच भाजपचा अजेंडा आहे काय? जर एमआयएम हा आपला पक्ष आहे, असे मुस्लिमांना वाटत असेल, तर ते भाजपच्या फायद्याचे नाही. कारण मुस्लीम समाजास भारतीय राजकारणात व समाजजीवनात आवाजच मिळू नये, हा या मंडळींचा हेतू आहे. आसाममध्ये एनआरसीच्या माध्यमातून अनेकांचा मतदानहक्क हिरावून घेण्याचा कट रचला गेला होता, अशी टीका झाली हे आठवते का? भाजपला मतांच्या ध्रुवीकरणासाठी ओवैसींची गरज नाही. त्याऐवजी, तबलिगी जमातचा दिल्लीतील मेळावा, पालघरमधील साधूंची हत्या, गोरक्षा, लव्ह जिहाद हे विषय तापवून ध्रुवीकरण साध्य करता येते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, केवळ धर्माच्या आधारे हिंदू मते मिळतात असे नाही. तसे असते, तर “आत्मनिर्भर भारत’सारख्या घोषणा द्याव्या लागल्या नसत्या. केवळ ओवैसींचा चेहरा पाहूनदेखील ज्या लोकांना राग तो, ते भाजपला मते देणारच आहेत.
ओवैसींचे अस्तित्व असण्या वा नसण्यामुळे हिंदुत्ववादी लोकांना काही फरक पडत नाही. मते कोणाला द्यायची ते त्यांचे ठरलेलेच आहे. उलट हा विचार केला पाहिजे की, महाराष्ट्रात वा बिहारमध्ये ओवैसींना समर्थन का मिळते आहे व ते का वाढते आहे? ओवैसी वा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी अनेकदा भडकावू भाषणे केली आहेत, त्यांचे कोणीही समर्थन करणार नाही. परंतु त्याचवेळी हेदेखील खरे की, ओवैसी सतत घटनात्मक राष्ट्रवादाचा (कॉन्स्टिट्यूशनल नॅशनॅलिझम) उल्लेख करतात. त्यामुळे मुस्लीम हे हिंदुविरोधी आणि पाकिस्तानवादी असल्याची जी विकृत प्रतिमा उभी केली जाते, त्यास छेद दिला जातो. त्यांचा युक्तिवाद मुद्देसूद आणि तर्कशुद्ध असतो. शिवाय दुसरीकडे कॉंग्रेस, समाजवादी पार्टी वा बहुजन समाज पार्टी हे पक्ष आपल्यासाठी काहीच करत नाहीत, अशी भावना मुस्लिमांमध्ये दृढावत आहे. अशावेळी ओवैसींच्या एमआयएमचा पर्याय त्यांना आकर्षक वाटणार असेल, तर त्यात अस्वाभाविक असे काहीच नाही.