लोक पुन्हा निवडून देतील अशी इंदिराजींना आशा
डायमंड हार्बर, दि. 20 – कॉंग्रेसचा लोकांवर विश्वास आहे आणि लोक आम्हाला पुन्हा निवडून देतील अशी आशा वाटते, असे पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणाल्या.
पश्चिम बंगालमधील निवडणूक दौऱ्यात जाहीर सभेत बोलताना गांधी म्हणाल्या, निवडणुकीत लोक जो कौल देतील तो आम्ही मानू. मार्क्सवादी कम्युनिस्ट, जनसंघ, भालोद या पक्षांचा उल्लेख करून गांधी म्हणाल्या, या देशाच्या विकासासाठी या पक्षांना काही करावयाचे नाही, ते निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. केंद्र सरकार स्थिर असणे गरजेचे. स्थिर सरकार केवळ कॉंग्रेसच देईल.
ग्रामसुधारणेखेरीज पर्याय नाही
मुंबई – ग्रामसुधारणा व शेतीला प्राधान्य, हा गांधीजीप्रणित मार्ग जर स्वीकारला नाही, तर देशाला भविष्य नाही, असे प्रतिपादन जनता पक्षाचे अध्यक्ष मोरारजी देसाई यांनी केले. या गांधीजीप्रणित मार्गाने सत्ताधारी पक्ष जात नाही, एवढेच नव्हे तर त्यांच्या जाहीरनाम्यातदेखील याचा उल्लेख नाही.
आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे!
नवी दिल्ली – निवडणूक कमिशनने ठरविलेल्या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा, असा आदेश केंद्र सरकारने राज्यांना दिला आहे. गृहराज्यमंत्री ओम मेहता यांनी तसे राज्यांना कळविले आहे.