देशाचा कायाकल्प करण्यासाठी घटनादुरुस्ती
नवी दिल्ली, दि. 8 – राष्ट्राचा कायाकल्प करणे हाच या घटनादुरुस्ती विधेयकाचा हेतू आहे, असे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राज्यसभेत सांगितले. त्यांनी 40 मिनिटे भाषण केले. त्या म्हणाल्या, न्यायसंस्था, विविधमंडळ व प्रशासनात आम्ही एकसूत्रता प्रस्थापित करीत आहोत.
सीमा भागातील विकासास प्राधान्य देण्यात येणार
सांगली – सीमा भागात राहणाऱ्यांना फक्त सहानुभूती मिळणार नाही तर त्या भागातील विकासाच्या कामांना प्राधान्य देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी आज केली.
प्रदूषणाविरुद्ध लढा
नवी दिल्ली – उपराष्ट्रपती बी. डी. जत्ती यांनी हवा आणि पाणी या प्रदूषणाविरुद्ध लढा पुकारण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः नागरी भागातील सार्वजनिक आरोग्यास या प्रदूषणामुळे धोका निर्माण झाला आहे, असे ते म्हणाले. वातावरण शुद्ध ठेवण्यास प्राधान्य देण्याची त्यांनी गरज प्रतिपादन केली.
मालमत्तेचा हक्क काढावा
नवी दिल्ली – आज राज्यसभेत घटनादुरुस्तीवरील चर्चेदरम्यान बी. एन. सिंग यांनी असे सुचविले की, घटनेतील मूलभूत हक्कांच्या प्रकरणातून खासगी मालमत्ता बाळगण्याचा हक्क काढून टाकावा. तर कॉंग्रेसचे जनार्दन रेड्डी म्हणाले की, न्यायसंस्थेची त्वरित पुनर्रचना करणे आवश्यक आहे.