T20 World Cup 2024 : दुसऱ्या ‘Semi-final’साठी राखीव दिवस नाही; पावसाने सामना रद्द झाला तर जाणून घ्या, कोणाला मिळेल Final मध्ये प्रवेश…

T20 World Cup 2024 Semi-final : आयसीसी T20 विश्वचषक 2024 संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे. यावेळी, टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. मात्र, त्यासाठीची मुदत निश्चितच वाढवण्यात आली आहे. जर दुसरा उपांत्य सामना पावसामुळे प्रभावित झाला तर सामन्याची वेळी 250 मिनिटांनी म्हणजे सुमारे 4 तासांनी वाढवली जाऊ शकते. यासोबतच इतर नवीन नियमही करण्यात आले आहेत.
टी20 विश्वचषक 2024 यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये आयोजित केला जाईल. 1 जूनपासून T20 विश्वचषक 2024 चे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना 26 जून रोजी होणार आहे. दुसरा उपांत्य सामना 27 जून रोजी गयाना येथे होणार आहे. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. जर हा सामना पावसामुळे थांबला तर तो 4 तास 10 मिनिटांनी वाढवला जाऊ शकतो.
पावसाने सामना रद्द झाला तर कोणाला होणार फायदा ?
पावसामुळे सामना रद्द झाला तर त्याचा फायदा गुणतालिकेत अव्वल असलेल्या संघाला मिळेल. सुपर एटमध्ये अव्वल स्थान मिळवणाऱ्या संघाला थेट अंतिम फेरीत स्थान मिळेल. मात्र, पावसामुळे अजिबात खेळण्याची शक्यता नसतानाच हा सामना रद्द होईल. यावर फक्त पंचच निर्णय घेतील. गयानाची खेळाची परिस्थिती लक्षात घेऊनच निर्णय घेतला जाईल. दुसरा उपांत्य सामना 27 जून रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरू होईल.
पहिल्या उपांत्य फेरीसाठी असेल राखीव दिवस….
टी 20 विश्वचषक 2024 चा पहिला उपांत्य सामना 26 जून रोजी त्रिनिदाद येथे खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजल्यापासून हा सामना खेळवला जाईल. या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पावसामुळे हा सामना रद्द झाल्यास 27 जूनला खेळवला जाऊ शकतो. या स्पर्धेचा अंतिम सामना बार्बाडोस येथे 29 जून रोजी होणार आहे.





