चला, आपण नवा इतिहास घडवूया. कुणीतरी एकाने इतिहासाची मोडतोड करायची आणि दुसऱ्याने थिएटरची मोडतोड करायची. इतिहासात काय घडलं आणि काय नाही घडलं, याची माहिती ना तुम्ही घेणं आवश्यक आहे ना आम्ही घेणं आवश्यक आहे. एकाला कलात्मक स्वातंत्र्य आहे आणि दुसऱ्याला वाट्टेल त्या मार्गानं आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य आहे. इतिहास घडला तेव्हा तुम्हीही नव्हता आणि आम्हीही नव्हतो. काही करण्याची संधी त्यावेळी ना तुम्हाला मिळाली ना आम्हाला मिळाली. त्यामुळे आता इतिहास घडवायची संधी तुम्हीही सोडू नका आणि आम्हीही सोडणार नाही.
टीव्ही चॅनेलवर एकमेकांशी एकेरीत बोलू. एकमेकांवर इतक्या जोरजोरात खेकसू, की इतिहासात नक्की काय घडलं होतं, याची चर्चा बंद होऊन आपलीच चर्चा सुरू झाली पाहिजे. इतिहास ज्यांनी घडवला, त्यांना असे इलेक्ट्रॉनिक पुरावे मागे ठेवण्याची संधीच मिळाली नव्हती. त्यामुळे त्यावेळी नक्की काय घडलं याविषयी मतं-मतांतरं असू शकतात. शिवाय एकसंध इतिहास कुणालाच नकोय. तो “असा’ किंवा “तसा’ असावा, असाच आग्रह आहे. आपण याचाच फायदा घ्यायचा. त्या काळात आपल्याला काही करण्याची संधी मिळाली नाही, याची खंत विसरूया. रिकामा अर्धा पेला बघण्यापेक्षा तो अर्धा भरलेला आहे, हे पाहूया आणि आपल्या “कर्तृत्वा’चे इलेक्ट्रॉनिक पुरावे पुढील पिढ्यांसाठी निर्माण करूया.
भाषेचे निर्बंध ना तुम्हाला आहेत ना आम्हाला आहेत. मागितली तर सिक्युरिटी तुम्हालाही मिळणार आहे आणि आम्हालाही. शिवाय, आपल्या आदेशावरून स्वतःची आणि दुसऱ्यांची डोकी फोडणारी माणसं कमी नाहीत. आपला फार तर पुतळा लागेल त्यांच्या हाती. त्याला जोडे मारूदे, काळं फासू दे किंवा तो जाळू दे. इतिहास घडवायचा म्हटल्यावर आपली कातडी एवढी निबर असायलाच हवी. सोशल मीडियावरचे “ट्रोल’ तुम्हीही एन्जॉय करा; आम्हीही करू! पण आपल्याला हवी तीच भाषा वापरू एकमेकांविरुद्ध. खरं तर भाषेचासुद्धा नवा इतिहास लिहिला जातोय सध्या.
आपला “काल’ काय होता आणि “उद्या’ काय असेल, याचीही तमा न बाळगता शब्द फेकले जातायंत. आज ज्यांना उलटपालट बोलताय, त्यांच्यासोबत आपण काल होतो किंवा उद्या असू शकतो, हा विचार बोलणाऱ्यानं करायचा नसतो. तसं केलं तर भाषेचा इतिहास कसा लिहिला जाणार? भाषा मूलतः “टीआरपीजन्य’ असायला हवी. शब्दार्थ, अन्वयार्थ, ध्वन्यर्थ, मथितार्थ, भावार्थ, गर्भितार्थ काढणारे लोक पावलापावलावर बसलेत. शब्द असे हवेत की झटकन “टीआरपी’ मिळेल. वाढलंच प्रकरण तर “आमच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला,’ असं म्हणायला आपण मोकळे असतो, हे लक्षात ठेवा!
कल्पना करा… शे-दोनशे वर्षांनंतर पोरं इतिहासाचा अभ्यास करतायत. सनावळ्या पाठ करतायत आणि 2022 च्या घटनांमध्ये आपला उल्लेख येतोय. आपल्या तोंडचे शब्द इतिहासाच्या पुस्तकात छापले गेलेत. त्यावरूनही वातावरण पेटलंय. “आमच्या आदर्श व्यक्तीचे शब्द तोडूनमोडून इतिहासात घातले,’ असं म्हणून लोक निदर्शनं करताहेत… कसलं भारी ना? म्हणूनच म्हणतो… “शब्द-शब्द जपून ठेव’ वगैरे “बकुळीच्या फुलापरी’ शब्द आपल्याच भाषेत लिहिले गेले, हा इतिहास पुसण्याची जबाबदारी इतिहासानेच आपल्यावर टाकलीये.