ठाणे – बीसीसीआयच्या प्रचंड यशस्वी ठरलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेचे सामने मुंबई व नवी मुंबईसह आता ठाण्यातही होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. येथील दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलातील मैदानावर आयपीएलचे सामने घेण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती ती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली असून याबाबत लवकरच बीसीसीआयशी चर्चा करणार असल्याचेही सांगितले आहे.
बीसीसीआयच्या नियमानुसारच येथील खेळपट्टी तयार करण्यात आली असल्यामुळे येत्या काळात आयपीएलचे सामने होतील. ठाण्यात पंचतारांकित हॉटेलही आता उपलब्ध झाल्याने भविष्यात आयपीएल सामने ठाण्यात होतील. यापूर्वी या मैदानात बीसीसीआयच्या नियमानुसार खेळपट्टी उपलब्ध नव्हती. त्यामुळे येथे रणजी तसेच इतर क्रिकेट सामने होत नव्हते. ही उणीव भरून काढण्यासाठी पालिका प्रशासनाकडून गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू होते.
आता महापालिकेने आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी तयार केली आहे. येथे तयार करण्यात आलेल्या नव्या खेळपट्टीमुळे तब्बल दोन दशकांनंतर विजय हजारे तसेच रणजी करंडक स्पर्धेचे सामने येथे यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आले होते.
राज्यातील प्रकल्पांना आशियाई विकास बँकेने सहाय्य करावे – मुख्यमंत्री शिंदे
आंतरराष्ट्रीय तसेच आयपीएलचे सामने खेळविण्याकरिता मैदानात अत्याधुनिक दिव्यांची व्यवस्था असणे गरजेचे असल्यामुळे पालिकेने मैदानात तशी विद्युत व्यवस्था उभारणीचे काम सुरू केले आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.