त्याकाळी जनतेचा मुख्यमंत्री म्हणजे वसंतदादा असे समीकरणच तयार झाले होते. सत्ता म्हणजे जनता आणि जनताच मायबाप मानणारे वसंतदादा पाटील यांची आज पुण्यतिथी. (जन्म ः 13 नोव्हेंबर 1917, निधन ः 1 मार्च 1989).
सांगली जिल्हातील एका खेडेगावातील एक म्हातारी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना भेटायला गेली. सकाळी सकाळी सांगलीतल्या दादांच्या घरी गेलेल्या त्या आजीची दादांनी आस्थेवाईकपणे विचारपूस करत तिला तिच्या भेटीचे कारण विचारले. तेव्हा तिने आपल्या मुलाजवळ कैफियत मांडावी असे सांगितले, “वसंता गावाकडं दुष्काळ पडलाय. त्यात रेशन दुकानदार आम्हाला धान्य देईना.’ दादांनी तिची कैफियत ऐकून थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला. आणि जिल्ह्यातील अन्न वितरण व्यवस्थेकडे लक्ष द्यायला आणि गावोगावचा आढावा घ्यायला सांगितले.
आजची राजकारणाची पद्धत बघता हा प्रसंग लोकांना पटू शकणार नाही, कारण मुख्यमंत्री असलेल्या दादांना ती आजी भेटली म्हणजे तिला भेट मिळाली हेच आजच्या राजकीय काळातील अशक्य वाटणारी गोष्ट आहे. सामान्य माणूस आपल्या छोट्या असलेल्या कामासाठी मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो का? हा प्रश्न आपल्याला पडू शकतो; पण लोकांच्यातून आलेले लोकनेते वसंतदादा यांच्याबाबतीत असे अनेक किस्से आहेत. सामान्य माणसाला दादा आपला माणूस वाटतं होता. त्यामुळे दादांची आणि दादांच्याकडे असलेल्या पदाची माणसाला कधी भीती वाटली नाही. लोकांना दादांचा आधार वाटायचा. दादा हे नेते कमी आणि कुटुंबप्रमुख जास्त होते, हे असे लोकनेते होते की प्रत्येक माणसाला दादा आपले वाटत असत. या आपलेपणामुळे लोक दादांना वाटेल ती काम सांगत. ती अगदी साधी असत; पण लोकांनी सांगितलेले ऐकायचं आणि लोकांना मदत करायची हा दादांचा स्थायीभाव होता.
स्वातंत्र्य चळवळीत जीवावर उदार होऊन लढलेला क्रांतिकारक ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, राजस्थानचे राज्यपाल, कॉंग्रेसचे देशपातळीवरचे नेते असा दादांचा जीवनपट होता. दादांनी त्याकाळात ज्या ज्या वेळी मुलाखती दिल्या तेव्हा तेव्हा त्यांनी सामान्य माणूस, शेतकरी, कष्टकरी, कामगार, उपेक्षित, वंचित माणसाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची त्यांची भूमिका होती हे स्पष्ट दिसून येते. अगदी आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी त्यांची भूमिका मांडली. या लोकांचे जेवढे भले करता येईल तेवढं त्यांनी भलं केलं.
दादांना एक दिवस एक माणूस त्याच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका द्यायला आला. दादांना त्याने लग्नाला येण्याचा आग्रह केला. दादांनी त्याला मुलगा काय करतो असे विचारले. तेव्हा त्याने काहीही करत नाही असे सांगितले. दादांनी त्या मुलाला घेऊन यायला सांगितले आणि त्याला कारखान्यात नोकरीला लावून नोकरीचा आहेर दिला. दादांच्या आयुष्यात लोकांचे भले करण्याच्या अनेक घटना घडल्या. शक्य तिथं दादांनी सामान्य माणसाचे भले केले.
आज दादांना जाऊन एवढी वर्षे झाली तरी त्यांचे नाव काढताच लोक आदराने बोलतात. गहिवरून जातात. सत्ता जाताच राजकारणी लोकांकडे पाठ फिरवतात आणि जनतेसोबत असलेले नेते सत्ता मिळताच गरीब लोकांकडे आणि जनतेकडे पाठ फिरवतात. मात्र सत्तेत गेल्यावर जनता हेच सर्वस्व मानून काम करणारे दादा आणि दादांच्या नंतरही त्यांनी मदत केल्याची आठवण ठेवणारी जनता हे चित्र दुर्मिळ आहे. अनेक घरात दादांचे फोटो देव्हाऱ्यात आहे. तिसरी पिढी आली तरी त्या त्या घरातील लोक दादांच्या प्रेमात आहेत, हीच दादांच्या लोकाभिमुख कारभाराची पोहोच आहे.