भारतीय राजकारणात वयोवृद्ध नेत्यांचा वरचष्मा आजही कायम आहे. त्यांच्या अनुभवांचा फायदा व्हावा या सकारात्मक विचारापेक्षा राजकीय फायदा कसा होईल याचाच मात्र विचार केला जातो.
महाभारत युद्धात दहाव्या दिवशी अर्जुनाने शिखंडीच्या आडून मारलेल्या बाणांनी जखमी झालेले पितामह भीष्म पुढे 58 दिवस शरीरातून आरपार गेलेल्या बाणांच्या शय्येवर उत्तरायण होण्याची वाट पाहात पडून होते. वडील शांतनू यांनी त्यांना दिलेल्या इच्छामरणाच्या वरदानाच्या भरवशावर!
आजच्या युगात आपल्या देशात जराजर्जर अवस्थेत असतानासुद्धा अनेक राजकारणी निवडणुकीच्या राजकारणात दिसत आहेत. तोंडात, नाकात नळ्या घालून प्रशासन सांभाळणारे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, तशाच अवस्थेत आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराला जाणारे पुण्याचे खासदार गिरीश बापट चांगलेच चर्चेत होते आणि हा प्रकार सर्वच पक्षात दिसत आहे.
भाजपाने क्रियाशील राजकारणातून निवृत्त होण्यासाठी 75 हे वयोमान ठरवून त्यावर केली जाणारी अंमलबजावणी योग्यच म्हणावी लागेल. कारण, अनेक नेते अगदी मरणासन्न अवस्थेत असूनही आपल्या पदावर कायम राहतात, निवडणुका लढतात आणि जिंकूनही येतात. अर्थात, आपल्या परिवाराच्या, पक्षाच्या लोकप्रियतेमुळे किंवा धार्मिक भावनेला हात घातल्यामुळे असेल; पण मृत्युशय्येवर असलेल्या अनेक व्यक्ती निवडून येतात.
1987 साली तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन आपली तब्येत खालावत असतानाही आपल्या पदावर कायम राहिले. आपल्या पदाचा कार्यभार त्यांनी कोणाकडेही सोपवला नाही.शेवटी कोमात गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. पण शेवटपर्यंत आपल्या पदावर राहिले. तीच परंपरा जयललिता यांनी कायम ठेवली. त्यांचाही मृत्यू कोमातच मुख्यमंत्री असताना झाला. अर्थात वयाचं आणि प्रकृतीचं बंधन कोणत्याच पक्षांत पाळल जात नाही. 1957 पासून सतत लोकप्रतिनिधी राहिलेल्या आणि पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या प्रकाशसिंग बादल यांनी गेल्या वर्षी पंजाब विधानसभेची निवडणूक लढवली, त्यावेळी त्यांचं वय होतं 94 वर्षे; पण त्यात त्यांचा पराभव झाला.
1957 पासून सतत आमदार असलेले आणि जवळपास दोन दशके तामिळनाडूचे मुख्यमंत्री राहिलेले करुणानिधी शेवटच्या पंधरा वर्षांच्या काळात ऑटोमॅटिक व्हीलचेअरवर बसून होते आणि तरीही ते 2006 ते 2011 या काळात मुख्यमंत्री होते. व्हीलचेअराधिन राजकारणी! एक प्रकारे शरपंजरीच! पण तरीही राजकारणात कायम!
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पंचाहत्तर वर्षांचे होते. त्यांना उद्देशून त्यांच्याच मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकारी जसवंतसिंग यांनी एका मुलाखतीत वाजपेयींबाबत टिप्पणी केली होती. वाजपेयींचं संथपणे चालणं, त्याहून संथपणे बोलणं बोलता बोलता आपल्या नातेवाईकांची नावे विसरणं याला उद्देशून त्यांनी टिप्पणी केली असावी. पण अशा अवस्थेत 2009 पर्यंत वाजपेयी भाजपचे भीष्माचार्य बनून राहिले. मनमोहन सिंग यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी ते चक्क व्हील चेअरवर बसून आले होते. व्हीलचेअराधिन भीष्माचार्य!
अनेकवेळा वार्धक्य, झालेले असाध्य रोग यामुळे पुढे काय होईल याची कल्पना असतानाही पक्ष आणि उमेदवार निवडून येण्याच्या आशेवर त्यांनाच उमेदवारी दिली जाते. चोवीस वर्षे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रिपद सांभाळणाऱ्या ज्योती बसूंना मात्र व्हीलचेअराधिन किंवा शरपंजरी राजकारणी म्हणता येणार नाही. वयाच्या सत्त्याऐंशीव्या वर्षी ते स्वत: मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले, तरीही पक्षाच्या आणि राष्ट्रीय राजकारणात ते शेवटपर्यंत कार्यरत होते. शरपंजरी न पडलेला कम्युनिस्ट भीष्माचार्य!
बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील शेवटची दोन भाषणे खुर्चीवर बसून किंवा मातोश्री या आपल्या निवासस्थानावरून केली होती. शिवसेनेचे नेते बाळासाहेबांचा उल्लेख निवडणुकीच्या आखाड्यातील आमचे ब्रह्मास्त्र असा करत असतं. पक्षाने त्यांच्या भाषणाचा वापर अगदी शेवटपर्यंत केला.
कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यासुद्धा गेली आठ वर्षे आजारी आहेत. मात्र सध्या त्यांनी राजकारणातून निवृत्तीचा संदेश दिला आहे. भाजपकडून शरद पवारांचा दाखला देऊन 2004 पासून या नेत्याचा वापर केला जात आहे, असे म्हटले आहे. 2004 मध्ये मोठ्या आजारातून सुखरूप बाहेर पडलेल्या पवारांवर शारीरिक किती मोठ्या प्रमाणात बदल घडला आहे, तरीही आज वयाच्या 82व्या वर्षी पवार उभे आहेत.
पाश्चिमात्य देशात प्रकृती अस्वास्थ्यामुळे किंवा वार्धक्यामुळे अनेक राजकारणी निवृत्त होतात. पण भारतातच नव्हे तर भारतीय उपखंडातही तसा प्रकार दिसत नाही. उलट शेवटपर्यंत सत्ता आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला जातो किंवा आपल्या वारसदाराला तरी देण्याचा प्रयत्न केला जातो. सत्ता आपल्या, आपल्या पक्षाच्या हातात ठेवण्याचा तो प्रयत्न असतो. त्यामुळेच जनतेच्या नशिबी येतात शरपंजरी राजकारणी!
युवकांनी राजकारणात यावे, असे ज्येष्ठ नेते नेहमीच म्हणताना दिसतात. पण ते त्यांच्याच कुटुंबातील युवकांना पुढे करतात. हाही एक विरोधाभासच म्हणावा लागेल. सृदृढ लोकशाहीसाठी ज्येष्ठ नेत्यांनी सर्वांनाच संधी मिळेल असे धोरण अवलंबले पाहिजे आणि जास्तीत जास्त युवकांना राजकारणात सक्रिय केले पाहिजे.