“प्रभात’ म्हणजे रात्रीचा शेवट आणि दिवसाचा प्रारंभ होण्याचा काळ. त्यालाच “प्रभात’ किंवा “पहाट’ असे म्हणतात.
अशी पहाट ही सारी सृष्टी कशी जागवत येते, त्यावेळी पूर्व दिशेला तांबडे कसे फुटते, ती दिशा कशी उजळते, कोंबडा बांग देऊन गावाला कसे जागे करतो, कोणीही हाका न मारता झाडावरचे पक्षी, गोठ्यातली गायी गुरं, अंगणातील वेलींच्या कळ्या कशा फुलतात, त्याच्या त्या फुलण्याची खबरं आपल्याला त्या सुगंधित वाऱ्याच्या झुळुकेतून कशी मिळते हे सारे खरं तर आपण पहायला आणि अनुभवायला हवं. कारण, त्यात एक विलक्षण असा आनंद भरलेला आहे.
दिवसाची नवी सुरुवात करताना आपण उठल्यावर एकमेकांना शुभ सकाळ, मंगल प्रभात, गुडमॉर्निग, हॅव ए गुड डे… असे अभीष्टचिंतन करतो. ते यासाठीच की आपण आपल्या जीवनात उगवलेला हा आजचा दिवस सार्थकी लावायचा असतो. या नव्या दिवशी कालची राहिलेली कामे पूर्ण करायची असतात. शाळेचा गृहपाठ पूर्ण करायचा असतो. नव्या कामाची सुरुवात करायची असते. त्याची आखणी, जुळवाजुळव करायची असते. गाठीभेटीची दिलेली वेळ पाळायची असते.
या नव्या दिवसाच्या नव्या सुरुवातीला आपल्याला बऱ्याच गोष्टी या विचारात घ्याव्या लागतात. त्यात कालच्या कामात काही चुकलं असेल तर ते सुधारावे लागते. नव्या कामासाठी नव्या उत्साहाने, तयारीने प्रेरित व्हावे लागते. त्यासाठी सर्व प्रकारची पूर्वतयारी करावी लागते. आपल्या कामातल्या कार्यक्षमतेतल्या गुणवत्तेच्या त्रुटी या काय आहेत? आपण कशावर जोर द्यायला हवा, कशावर लक्ष केंद्रित करायला हवे, हे ठरवून त्यासाठी मुद्दाम वेळ द्यावा लागतो. काही गोष्टी तर अशा असतात की त्या त्या दिवशीच आणि दिलेल्या, ठरलेल्या नि त्याच्या ठराविक वेळेलाच पूर्ण कराव्या लागतात.
इथे जाता जाता आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते की हे करत असताना आपल्याला आपल्याबरोबरच घरातली, ऑफिसातील, कार्यालयातील, सभोवतीच्या समाजातील अशा अनेक लोकांचा विचारही करावा लागतो. आपल्या सारखाच त्याचाही दिवस गोड व्हावा यासाठी सहकार्याचा, आपलेपणाचा, मायेचा, मदतीचा हात पुढे करावा लागतो. या सर्वांची आपली मानसिक, शारीरिक आणि वैचारिक कृतिशील सुरुवात करायची असते, ती प्रत्येक दिवसाच्या नव्या प्रभातीच्या प्रेरणेतून.