माणूस आणि माती यांचा फार जवळचा संबंध आहे. माणसाचे त्याच्या मातेसारखेच मातीशीही अतूट असे नाते आहे. म्हणूनच जी जन्म देते तिला जननी असे म्हणतात तर जी आपले संगोपन संवर्धन करते तिला भू माता, धरणी माता असं म्हणतात.
जीव हा मातेच्या दुधावर पोसला जातो. तर पुढे तो वाढत्या वयाबरोबर या मातीतच खेळत खेळत वाढत असतो. मानवी स्थूल शरीरालाही आध्यात्मात मातीचीच उपमा दिलेली आहे. माणसाच्या जीवनाशी जवळीक साधणारी ही माती तरी कुठकुठली आणि किती प्रकारची. कारण काळी माती, लाल माती, मुरमाड माती, रेताड माती हे तिच्या गुण धर्मावरून आणि रंग-रूपावरून पडलेले प्रकार. यातले काही माणसाच्या फायद्याचे तर काही तोट्याचे.
काळी आणि सुपीक माती ही माणसाला हवं असणारं अन्नपाणी फळफळावळ त्यास देते. लाल मातीतली मेहनत त्यास शक्ती, सामर्थ्य देते. मुरमाड आणि रेताड माती हीसुद्धा काही अंशाने मानवास इतर कामांसाठी उपयुक्त ठरत असते. मातीपासून माणूस त्याच्या अंगीच्या गुण कौशल्यावर जसा विविध व्यवसाय करून आपले उदरभरण करतो. तसेच या मातीचीच खेळणी, गाडगी, मडकी, मातीच्या विविध वस्तू तयार करून तो आपल्या कलागुणांनाही वाव देत असतो.
अनेक खेळाडू, हे आपल्या देशाच्या मातीची शान राखण्यासाठी आपल्या कौशल्याची बाजी लावतात. तिला मानसन्मान मिळवून देतात. तर या मातीचेच काही सुपुत्र तिच्या रक्षणासाठी प्रसंगी आपल्या प्राणांचेही बलिदान द्यायला मागे-पुढे पाहात नाहीत. ते मातीत जन्मतात, मातीत वाढतात आणि मातीच्या रक्षणासाठीच प्राणार्पणही करतात. सीमेवरचे जवान या आपल्या देशाच्या मातीसाठीच रात्रीचा दिवस करून डोळ्यात तेल घालून तिच्या रक्षणाची धुरा सांभाळत असतात.
शेतकरी आणि त्याची शेतातली काळी माती ही तो मातेसमानच मानत असतो. मातेचं आणि मातीचं ऋण हे एक न फिटणार आहे. मात्र, त्याची काही अंशाने करता येणारी परतफेड ही प्रत्येकानेच करायला हवी आणि मातीचे गुण घेऊन आपल्या जीवनाचे मोल वाढवायला हवे.