-वंदना बर्वे
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत एका महिलेला पराभूत करण्यासाठी भाजपाची जंगी फौज मैदानात उतरली असली तरी ममता बॅनर्जी यांना रोखून धरण्यात भाजपाच्या तोंडाला फेस आला आहे.
नंदीग्राम येथे झालेला अपघात खरा की खोटा, अशी चर्चा सुरू असतानाच ममता बॅनर्जी प्लॅस्टर लावलेल्या पायानेच निवडणुकीच्या प्रचारात उतरल्या. व्हीलचेअरवर बसून त्या अख्खा बंगाल पिंजून काढतील. यामुळे बंगालवासीयांच्या मनात सहानुभूतीची जी लाट निर्माण झाली आहे ती भाजपच्या जिव्हारी लागली आहे. सहानुभूतीच्या या लाटेवर विरजण कसं सोडायचं? हा प्रश्न भाजपला पडला आहे आणि त्यावर सध्या कोणताही उतारा सापडलेला नाही.
ममता बॅनर्जी यांच एक वैशिष्ट्य आहे, त्या शत्रूला कधीही विसरत नाहीत. प. बंगालमधील डाव्या पक्षाचा तख्तापालट करण्यासाठी रस्त्यावर केलेल्या संघर्षाने त्यांना खूप आत्मविश्वास दिला आहे, बळकट केले आहे आणि जिद्दी बनविले आहे. त्यामुळे अपघाताची ही घटना त्या सहज विसरून जातील? असं समजणे भाबडेपणाचे ठरेल. डाव्यांची 35 वर्षांची सत्ता त्यांनी उलथवून टाकली. अशा दीदींसोबत भाजपचा सामना आहे. दीदी व्हीलचेअरवर आल्यामुळे भाजपचे धाबे दणाणले आहे. व्हीलचेअरवर बसलेल्या एका महिलेवर शाब्दिक हल्ला करायचा तरी कसा, असा प्रश्न भाजपला पडला आहे. थोडक्यात, भाजप सध्यातरी बॅकफूटवर आहे. पायाला प्लॅस्टर असलेल्या महिलेवर आकसापोटी उलटसुलट बोलणे आता भाजपला महाग पडू शकते.
भाजप सुरुवातीपासूनच ममता बॅनर्जी यांच्या सरकारचा समाचार घेत आहे. शिवाय, त्यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून तृणमूलच्या किल्ल्याला भगदाड पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपला कसे आवरायचे, हा यक्षप्रश्न दीदींच्या रणनीतीकारांना पडला होता. नंदीग्रामच्या अपघाताने तृणमूलची ही समस्या सोडविली, असं म्हणायला हरकत नाही. पायाला प्लॅस्टर आणि व्हीलचेअरवर बसून भाजपला गप्प कसे करायचे, याची रणनीती मुख्य सल्लागार प्रशांत किशोर यांनी आखली असावी. आता, याचा राजकीय लाभ कसा घ्यायचा हे दीदींना सांगण्याची गरज नाही. तिकडे, तृणमूल कॉंग्रेसच्या एक-एक किल्लेदारांना फोडून भाजपात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
भाजपने दीदींच्या विरोधात नंदीग्राममधून दीदींच्याच माणसाला उभं केलं आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि तृकॉंचे माजी खासदार दिनेश त्रिवेदी यांनी अलीकडेच भाजपचा झेंडा हातात घेतला. मुळात, त्रिवेदी हे काही लोकनेते नाही. किंबहुना, ते कधीच लोकनेते नव्हते. त्रिवेदी यांचे जे काही राजकीय अस्तित्व लोकांना जाणवतं आहे ते ममता यांनी दिलेल्या बळामुळेच. मनमोहन सिंग यांच्या पहिल्या मंत्रमंडळात त्रिवेदी यांना रेल्वे मंत्री बनविले होते. मात्र, 2012 मध्ये त्यांची उचलबांगडीसुद्धा त्यांनीच केली. कारण, त्यांनी प्रवाशांना दिलासा दिला नव्हता. अशात, भाजपची ही रणनीती ममता यांना खरंच काही नुकसान पोहचविणार की नाही, याबाबत अधिकारवाणीने आताच काही सांगता येणार नाही.
रावत यांचे सिंहासन का गेले?
शेवटी भारतीय जनता पक्षाने त्रिवेंद्रसिंग रावत यांना उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा का द्यायला लावला? या प्रश्नाचं गूढ समोर येणं खूप गरजेचं आहे. जेव्हा हाच प्रश्न रावत यांना विचारण्यात आल्यावर त्यांचं उत्तर खूप बोलकं होतं. ते म्हणाले, “यासाठी तुम्हाला दिल्लीला जावं लागेल’. महत्त्वाचा मुद्दा असा की, त्रिवेंद्रसिंग रावत चार वर्षांपासून उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत. पुढच्या वर्षी विधानसभेची निवडणूक होणे आहे. अशात, लोकांच्या मनात नाराजी निर्माण झाल्यामुळे ते निवडणूक जिंकण्यात अपयशी ठरतील अशी भीती भाजपच्या मनात निर्माण झाली. आणि म्हणून पक्षाने रावत यांना तडकाफडकी राजीनामा द्यायला सांगितला. मात्र, ही नाराजी एवढ्यातच निर्माण झाली काय, हा खरा प्रश्न आहे.
त्रिवेंद्रसिंग रावत यांनी सरकार स्थापन केल्यापासून महत्त्वाची सर्व खाती आपल्याजवळच ठेवली होती. यात आरोग्य आणि पीडब्ल्यूडीसह 45 मंत्रालयाचा समावेश आहे. यामुळे अख्खी यंत्रणा रावत यांच्या अवतीभावेती केंद्रित झाली. एवढा मोठा गाडा हाकण्यासाठी मुख्यमंत्र्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांवर अवलंबून राहावे लागले. कोणताही मंत्री, आमदार किंवा खासदार एखाद्या कामासाठी दबाव टाकत असेल तर आपल्याला तात्काळ कळविण्यात यावे, असे रावत यांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश होते, असं म्हणतात. यामुळे आमदारांमध्ये नाराजी निर्माण होणे स्वाभाविक आहे. निवडून दिलेल्या लोकांची कामे होत नसतील तर जनता आणि लोकप्रतिनिधींचे नाराज होणे स्वाभाविक आहे. मुख्यमंत्री म्हणून रावत हे मनमिळावू वृत्तीचे नव्हते, असंही म्हटलं जातं.
सरकारच्या कामकाजावर जनता खूश आहे की नाराज? लोकांना सरकारकडून काय अपेक्षा आहे? हे जाणून घेण्यासाठी जी सतर्कता मुख्यमंत्र्यांच्या अंगात असायला हवी ती रावत यांच्यात कधीच दिसून आली नाही. माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल किंवा हरिश रावत हे लोकांकडून अभिप्राय घेत असत. रावत यांच्याकडे या प्रकारचा अभिप्राय घेण्यासाठी कोणतीही यंत्रणा नव्हती. जनतेकडून मिळालेला अभिप्राय त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला नाही आणि यामुळे काय घडले आहे याचा अंदाज त्यांना येऊ शकला नाही. त्रिवेन्द्रसिंग रावत यांना लोकांमध्ये मिसळणे आवडत नव्हतं, असं म्हणतात. काही मोजक्याच लोकांना भेटायचं हा त्यांचा स्वभाव होता. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी जनता दरबार घ्यायला सुरुवात केली होती. मात्र, नंतर त्यांनी ही परंपरा बंद केली.