गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकांबरोबरच देशात ठिकठिकाणी सहा विधानसभा आणि उत्तर प्रदेशातील एका लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांचा निकाल संमिश्र लागला. मात्र, बिहारमधील कुऱ्हाणी विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपने राष्ट्रीय जनता दलाकडून (राजद) हिसकावून घेतली आहे.
भाजपशी संबंध तोडून राजदशी महाआघाडी करणाऱ्या संयुक्त जनता दलाच्या (जदयू) नितीशकुमार यांना हा मोठाच धक्का असल्याचे मानले जात आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी बिहारचे मुख्यमंत्री असलेले नितीशकुमार आणि राजद नेते व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी संयुक्त सभा घेतली होती. चार महिन्यांपूर्वीच जदयूने भाजपशी काडीमोड घेतला आणि राजद व कॉंग्रेससमवेत सरकार स्थापन केले. यावेळी बोलताना तेजस्वी यांनी जनतेला भावनिक आवाहन केले होते. लालूप्रसाद यादव यांच्यावर सिंगापूरमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होत असून, पोटनिवडणुकीत महागठबंधनचा विजय होईल, असे आश्वासन आपण त्यांना दिले असल्याचे उद्गार त्यांनी काढले. तर बिहार राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी मोदी सरकारने मान्य केली नाही, असे या सभेत नितीशकुमार यांनी सांगितले होते. मात्र, कुऱ्हाणी येथील निवडणुकीत जदयू व राजदचा भाजपकडून पराभव झाला.
आता 2024च्या लोकसभा निवडणुकांसाठी नितीशकुमार हे भाजपविरोधी आघाडी बांधण्याचा प्रयत्न करत असून, त्या दृष्टीने त्यांनी विविध पक्षांच्या नेत्यांशी बातचीतही सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर, जदयू आणि राजद या दोन पक्षांच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली असून, जदयू नेते उपेंद्र कुशवाह यांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावली आहे; परंतु माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत मी बिहारचा पुरेसा विकास केला असून, यापुढे हे काम तेजस्वीच करतील, असे उद्गार नितीशकुमार यांनी नुकतेच काढले. त्याचप्रमाणे गेल्या ऑक्टोबरमध्ये नवी दिल्लीत राजदच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची एक बैठक झाली. त्यावेळी पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह बदलण्याचे सर्वाधिकार अध्यक्ष लालू प्रसाद आणि त्यांचे चिरंजीव तेजस्वी यांना देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव ज्यांनी मांडला, ते लालू यांचे निकटवर्तीय सहकारी भोला यादव यांनीही जदयू व राजदच्या विलीनीकरणाचे संकेत दिले होते. तर हे दोन पक्ष एकत्र येतील, असे भाकित मागच्याच महिन्यात भाजप नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी केले होते.
महाराष्ट्रात कॉंग्रेसमधून बाहेर पडून शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली, त्याच कॉंग्रेससमवेत पवारांनी लोकशाही आघाडी सरकार स्थापन केले. त्यानंतर काही वर्षांनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी तसेच त्यांचे मित्र आणि ज्येष्ठ कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंग यांनी, राष्ट्रवादीने कॉंग्रेसमध्ये विलीन व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली होती; परंतु पवारांनी या सूचनेकडे आजतागायत लक्षही दिलेले नाही. मात्र, तरीही या दोन धर्मनिरपेक्षतावादी पक्षांनी परस्परांत विलीन व्हावे, अशी इच्छा अनेक पुरोगामी व्यक्ती व्यक्त करत असतात. बिहारमध्ये 2005 साली लालू यांची 15 वर्षांची सत्ता समाप्त झाली. लालूंबरोबरची मैत्री तोडून, नितीशकुमार भाजप आघाडीत गेले आणि मुख्यमंत्री बनले. परंतु 2013 मध्ये नितीशकुमार यांनी भाजपला वाटेला लावले आणि राजदशी संग केला. 2017 मध्ये नितीशकुमार परत भाजपच्या तंबूत परतले आणि पाच वर्षांतच भाजपशी दगाबाजी करून, त्यांनी महागठबंधन सरकार स्थापन केले.
आता लालूंची प्रकृती ठीक नाही आणि ते राजकारणातही तेवढे सक्रिय नाहीत. जदयूचा उतरणीचा काळ सुरू झाला असून, नितीशकुमार यांचा पूर्वीचा करिश्मा राहिलेला नाही. याउलट, तेजस्वी यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नाकी चांगलाच दम आणला होता. लालू आणि नितीशकुमार हे दोघेही लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून पुढे आलेले. दोघेही समाजवादी विचारांचे आणि उभयतांच्या पक्षांत समाजवाद्यांचीच भाऊगर्दी झाली आहे. कॉंग्रेसविरोधी राजकारणातून जन्म झालेल्या जनता दलामधूनच जदयू व राजदची निर्मिती झाली. लालू-तेजस्वी हे कट्टर भाजपविरोधक. तर नितीशकुमार यांनी भाजपच्या राहुटीत शिरल्यानंतरही, आपण धर्मवादी राजकारण करत नसल्याचे वारंवार अधोरेखित केले आहे. तेव्हा, विलीनीकरण झाल्यास, ते तर्कसंगतच ठरेल. 1997 साली लालू यांनी राजदची स्थापना केली. तर जदयूची स्थापना 2003 मध्ये झाली. त्यावेळी जनता दलातील शरद यादव गट आणि जॉर्ज फर्नांडिस यांची समता पार्टी हे एकत्र आले होते. नितीशकुमार हे तेव्हा समता पार्टीतच होते.
आता जदयू-राजद यांचे विलीनीकरण झाले, तर तेजस्वी हे बिहारचे मुख्यमंत्री होऊ शकतील आणि नितीशकुमार हे लोकसभा निवडणुकांसाठी विरोधी पक्षांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे येऊ शकतील. मला पंतप्रधानपदात रस नाही, असे नितीशकुमार म्हणत असले, तरी मुख्यमंत्रिपदाचा दीर्घ अनुभव असल्यामुळे त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. मोदीही अगोदर गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि गुजरातच्या विकासाचा पॅटर्न जनतेसमोर ठेवूनच त्यांनी देशव्यापी लोकप्रियता मिळवली. नितीशकुमार यांनी दोन महिन्यांपूर्वी माजी उपपंतप्रधान देवीलाल यांच्या 109व्या जन्मदिनानिमित्त आयएनएलडी पक्षाचे नेते ओमप्रकाश चौटाला यांनी आयोजित केलेल्या सभेत हजेरी लावली होती.
समाजवादी पार्टी, देवेगौडांचा जेडीएस, शिरोमणी अकाली दल, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्याबरोबर चर्चा करून, लोकसभेत भाजपच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्याची नितीशकुमार यांची योजना आहे. यापूर्वी जेव्हा नितीशकुमार यांनी भाजपला टाटा करून राजदशी दोस्ती केली, तेव्हादेखील जनता दलातून फुटून बाहेर निघालेल्या सर्व गटांनी एकत्र यावे, अशी हाक त्यांनी दिली होती. नितीशकुमार आणि तेजस्वी एकत्र आल्यास, बिहारमधील व देशातील राजकीय चित्र बदलेल; परंतु एकत्र येऊन पुन्हा फुटून निघण्याची समाजवाद्यांची मूळ प्रवृत्ती उफाळून बाहेर येण्याची भीती मात्र कायम आहेच!