-अॅड. ऋषीकेश काशिद
1947 ला भारत स्वतंत्र झाला, पण गोवा पोर्तुगीजांच्या अमलाखाली तब्बल चौदा वर्षे राहिला. गोवा मुक्तीसंग्रामाचे हीरकमहोत्सवी वर्षात पदार्पण होत असताना घेतलेला गोव्याच्या इतिहासाचा वेध.
ऐतिहासिक गोव्याचे वर्णन करताना सुमारे इसवीसनपूर्व तिसऱ्या व दुसऱ्या शतकांत गोव्यावर मौर्यांचा अंमल होता. अर्बेली (साखळी महाल) येथील गुहेत सापडलेल्या शिलालेखांवरून इसवीसन पहिल्या शतकात गोवा हे मोठे शहर व व्यापारी केंद्र असावे. या शतकातच गोव्यात बनवासी येथे कदंबांची सत्ता सुरू झाली. पाचव्या शतकात कदंब बादामीच्या चालुक्यांचे मांडलिक बनले; मात्र त्यांची गोमंतकावरील सत्ता नष्ट झाली नाही. चालुक्यांशी विवाहसंबंध जोडून जयकेशी कदंबाने आपली सत्ता वाढवली.
कदंबांच्या सत्तेचा काळ हा गोव्याच्या भरभराटीचा काळ. 12व्या शतकात आपले प्रभुत्व टिकविण्यासाठी कदंबांना होयसळांशी संघर्ष करावा लागला.
तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांनी कदंबांना मांडलिक बनवून गोवा आपल्या सत्तेखाली आणला. गोव्यात यादवांची सत्ता 101 वर्षे होती. त्यानंतर चौदाव्या शतकाच्या प्रारंभी दक्षिणेवर स्वारी करणाऱ्या मलिक काफूरने गोव्यावर हल्ला केला, गोपकपट्टणचा नाश करून मंदिरे पाडली. 1325 मध्ये मोहम्मद तुघलकाने त्याची पुनरावृत्ती केली. पंधराव्या शतकाच्या अखेरीस बहमनी राज्यातून फुटून विजापूर येथे स्वतंत्र राज्य स्थापन करणाऱ्या युसूफ आदिलशहाने गोवा आपल्या राज्याला जोडला. त्यानंतर विजापूरच्या आदिलशहाचा गोव्यावर अंमल होता. आदिलशहाची सत्ता उलटवून टाकून पोर्तुगीजांनी गोव्यावर आपली सत्ता स्थापन केली.
इ.स. 25 फेब्रुवारी 1510 रोजी पोर्तुगीज गव्हर्नर अल्फोन्सो द अल्बुकर्कने गोवा ताब्यात घेतला व त्यानंतर सुमारे 451 वर्षे गोवा पारतंत्र्यात होता. अल्बुकर्क हा भारतातील पोर्तुगीज सत्तेचा पहिला गव्हर्नर जनरल. गोव्यावर ताबा मिळाल्यावर कुडाळपासून चित्ताकूलपर्यंतचा प्रदेश पोर्तुगीजांच्या अंमलाखाली गेला. 1520 मध्ये पोर्तुगीजांनी साष्टी, बारदेश व गोवा भागातील इतर प्रदेश जिंकले. 1521 पासून गोवा ही पोर्तुगीजांची पूर्वेकडील प्रमुख वसाहत झाली. 1531 मध्ये नू द कून्या याने गुजरातच्या सुलतानाबरोबर लढाई करून व दीव घेऊन 1534 मध्ये वसई प्रांत जिंकला. गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी डॉ. टी. बी. कुन्हा यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांना गोव्याच्या राष्ट्रवादी चळवळीचे जनक म्हटले जाते. कुन्हा यांनी एप्रिल 1928 मध्ये “गोवा कॉंग्रेस कमिटी’ ही पहिली राजकीय संघटना मुंबई येथे स्थापन केली व पोर्तुगीज सरकारला विरोध करण्याचे धोरण स्वीकारले.
“चले जाव’ चळवळीत अटक झालेले डॉ. राममनोहर लोहिया यांची 1946 मध्ये सुटका झाली. गोवा, दीव व दमन या प्रदेशांच्या मुक्ततेसाठी डॉ. राममनोहर लोहिया यांनी 1946 मध्ये सत्याग्रह करून चळवळ चालू केली. सांगलीचे मोहन रानडे हे गोवामुक्ती आंदोलनातील एक धडाडीचे नेते होते. याच सुमारास त्यांनी गुजरातमधील दादरा आणि नगर हवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी “आझाद गोमंतक’ दलाची उभारणी केली. 2 ऑगस्ट 1954 रोजी या दलाच्या तरुणांनी सशस्त्र हल्ला करून दादरा आणि नगर हवेलीचा प्रदेश पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त केला. या हल्ल्यात विश्वनाथ लवंदे, राजाभाऊ वाकणकर, सुधीर फडके, नानासाहेब काजरेकर इत्यादींनी भाग घेतला होता.
1954 मध्ये गोवामुक्ती समिती स्थापन करण्यात आली. या समितीने महाराष्ट्रातून सत्याग्रहींच्या अनेक तुकड्या गोव्यात पाठवल्या. त्यात ना. ग. गोरे, सेनापती बापट, पीटर अल्वारिस, महादेवशास्त्री जोशी, केशवराव जेधे, मधु दंडवते, जयंतराव टिळक, वसंतराव तुळपुळे, चिटणीस यांच्याबरोबरीने सुधा जोशी, कॉ. मालिनीबाई तुळपुळे, कमलाबाई भागवत, मंदा याळगी, प्रभा साठे, कमला उपासनी आदी अनेक स्त्रिया या सत्याग्रही लढ्यात उतरल्या. सत्याग्रहींवर पोर्तुगीज सत्तेने अमर्याद जुलूम-अत्याचार केले. यामुळे भारतातील जनमत अधिकच प्रक्षुब्ध झाले. गोव्यातील स्वातंत्र्यलढ्याने उग्र स्वरूप धारण केले. भारत सरकार पोर्तुगीज सरकारशी सामोपचाराने वाटाघाटी करत होते, मात्र त्याला दाद मिळत नव्हती. देशातील वाढत्या दबावामुळे भारताने पोर्तुगालशी राजकीय संबंध पूर्णत: तोडले; मात्र या कालावधीत पाकिस्तान पोर्तुगीजांच्या मदतीला धावला. त्यामुळे भारताच्या बहिष्काराचा पोर्तुगालवर फारसा परिणाम होऊ शकला नाही. 1956-57 मध्ये जनमत चाचणी घेण्याचा पर्याय पुढे आला; मात्र तो पोर्तुगालने धुडकावून लावला.
अखेरीस 18 डिसेंबर 1961 रोजी भारत सरकारने लष्कराला कारवाई करण्याचे आदेश दिले. भारतीय लष्कराने “ऑपरेशन विजय’ सुरू करून 36 तासांच्या आत गोव्याच्या सर्व सीमा ताब्यात घेतल्या. यामध्ये त्यांना नौदल व हवाई दलांची मदत झाली. पोर्तुगालने ब्रिटन, अमेरिका यासारख्या मित्र देशांकडे मदतीचा हात मागितला होता. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतानेसुद्धा योग्य मोर्चेबांधणी केल्यामुळे या मित्र देशांनी पोर्तुगीजांना मदत करणं नाकारलं. भारतीय सैन्याने गोव्यात प्रवेश केला. अल्पावधीतच पोर्तुगीज लष्कराने शरणागती पत्करली. पोर्तुगीज गव्हर्नर वासाल द सिल्वा यांनी शरणागतीच्या दस्तावेजावर सही करून ते भारतीय लष्कर प्रमुखांना दिले.
19 डिसेंबर 1961 रोजी गोवा पोर्तुगिजांच्या वर्चस्वातून मुक्त झाला. भारताच्या भूमीवरून साम्राज्यवादाचे पूर्णपणे उच्चाटन झाले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची खऱ्या अर्थाने परिपूर्ती झाली.गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतलेल्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आता वयाची ऐंशी-नव्वदी पार केली आहे. या स्वातंत्र्य सैनिकांच्या रूपाने इतिहासात गोव्याचा मुक्ती संग्राम जिवंत आहे.