– माधव विद्वांस
“जा सांग लक्ष्मणा, रामराजाला’ हे गीत गीता दत्त यांनी गायले आहे, ही गोष्ट फार थोड्या लोकांना माहिती आहे. सुंदर व्यक्तिमत्त्व, गोड गळा, भावस्पर्शी अभिनय असा त्रिवेणी संगम असलेल्या गीता दत्त यांचे आज पुण्यस्मरण.
त्यांचा जन्म सध्याच्या बांगला देशमधील फरीदपूर जिल्ह्यातील ईदिलपूर येथे 23 नोव्हेंबर, 1930 रोजी झाला. त्यांचे माहेरचे नाव गीता घोष रायचौधरी असे होते. त्या 12 वर्षांच्या असतानाच त्यांचे संपूर्ण कुटुंब मुंबईत आले. गीता यांना बालपणापासून संगीताची आवड होती. त्यांनी संगीतकार हनुमान प्रसाद यांच्याकडे संगीताचे प्रारंभिक शिक्षण प्राप्त केले. वर्ष 1946 मध्ये त्या 16 वर्षांच्या असतानाच लीला चिटणीस यांची भूमिका असलेल्या, धीरूभाई देसाई दिग्दर्शित “भक्त प्रल्हाद’ या चित्रपटात पहिले गीत गायले, याचे संगीत दिग्दर्शन हनुमान प्रसाद यांनीच केले होते.
एस. डी बर्मन त्यांच्या या गाण्यावर खूप प्रभावित झाले. एसडी बर्मन यांना त्यांच्यातील उगवता तारा दिसला व “दो भाई’ चित्रपटासाठी त्यांची गायिका म्हणून निवड केली. त्यांनी एसडी बर्मन यांची संगीतबद्ध केलेली 72 गाणी गायली.
वर्ष 1951 मध्ये मुंबईच्या महालक्ष्मी स्टुडिओमध्ये गीता यांचे गुरूदत्तच्या “बाजी’ या चित्रपटासाठी “तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले’ या गाण्याचे ध्वनिमुद्रण चालू होते. त्यावेळी गुरूदत्त यांची तिची ओळख झाली. ओळखीचे प्रेमात रूपांतर होऊन त्यांनी वर्ष 1953 मध्ये विवाह केला. गीता व गुरू दत्त यांना तरुण, अरुण आणि नीना अशी तीन मुले झाली. वर्ष 1957 मध्ये आपल्या पतीच्या “गौरी’ या चित्रपटामध्ये अभिनय केला होता; परंतु हा चित्रपट पूर्ण झाला नाही.
याच वेळी सर्वसाधारणपणे चित्रपट उद्योगात असणाऱ्या कलावंतांच्या जीवनात होणारा त्रिकोणी संशयकल्लोळ सुरू झाला. त्यांचे पर्यावसान दोघे वेगळे होण्यात झाले. वर्ष 1947 ते 1959 या 12 वर्षांच्या सुवर्णकाळात त्यांनी गायिका आणि अभिनेत्री असा दुहेरी ठसा उमटविला. त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये प्रेमगीते, भक्तिगीत अशी सर्व प्रकारची गीते गायली. त्यांनी 1200 च्या वर हिंदी गाणी गायली तसेच बंगालीबरोबर त्यांनी पाच मराठी गाणीही गायली. ती गाणी आजही लोकप्रिय आहेत. “बाबूजी धीरे चलना’, “मेरा नाम चिन-चिन चू’, “जा जा बेवफा’, “हूँ अभी मैं जवॉं’, “ये लो मैं हारी पिया’ अशी अनेक गीते त्यांनी गायली.
“गुरूदत्तची छोटी बहीण गीताची नणंद ललिता लाजमी म्हणायची, गीताची सुंदरता आश्चर्यचकित करणारी होती. ती अजिंठाच्या गुंफामधील चित्रासारखी होती, तर तिची मुलगी नीना म्हणते, “माझी आई मुलांप्रमाणे खोडकर होती तसेच बरेचदा हिंदी आणि बंगाली गाणी हार्मोनियम वाजवीत म्हणत असायची. प्यासा, सुजाता, साहिब बीबी और गुलाम, बाजी, आरपार, सीआयडी, हावडा ब्रिज, कागज के फूल हे त्यांचे गाजलेले चित्रपट.
आकर्षक चेहरा, मोठे बोलके डोळे, स्वभावातील खोडकरपणा यामुळे त्या अल्पावधीतच प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाल्या होत्या. त्यांच्या आयुष्याच्या अखेरीस वर्ष 1972 मध्ये सबीर सेन यांच्या “मिडनाइट’ या चित्रपटासाठी अखेरचे गीत गायल्या.
गुरूदत्त वयाच्या 39व्या वर्षी, तर गीता वयाच्या 41 व्या वर्षी निधन पावले. दोघेही अल्पायुषी ठरले. दोघांचाही मृत्यू मानसिक ताणतणावातूनच झाला. गीता दत्त यांचे 20 जुलै 1972 रोजी निधन झाले.