– श्री रविदासजी महाराज शिरसाठ, आळंदी
कल्लोळकंचुक । न फेडिता उघडे उदक ।
तेवी जगेसी सम्यक् । स्वरूप जो ।।5।।
माऊली श्रीज्ञानोबाराय पूर्वोक्त सिद्धांताच्या स्पष्टीकरणार्थ आणखी एक उदाहरण देतात. येथे रूपक अलंकार साधून कल्लोळ हेच कंचुक म्हणजे वस्त्र आहे, असे म्हटले आहे. सामान्यतः वस्त्रांचा विनियोग शरीर आच्छादनासाठी केला जातो. शरीर आणि वस्त्र हे विजातीय संवर्गातील असून वस्त्रांची उपयोगिता शरीराधीन आहे.
परंतु माऊलींनी येथे कल्लोळ व उदक या सजातीय म्हणण्यापेक्षा परस्पर अभिन्न वस्तूचे उदाहरण देऊन जगत व परमात्म्यातील अभेद स्पष्ट केला आहे. जसे कपड्यांमुळे शरीर झाकले जाते, तसे कल्लोळांमुळे पाणी झाकले जात नाही. कल्लोळ निर्माण झाल्यावरही ते पाणीच आहे आणि कल्लोळ शांत झाल्यावरही केवळ पाणीच आहे.
कारण कल्लोळ पाण्याहून मुळातच भिन्न नाहीत. तद्वत परमात्मवस्तू आणि जगत हे परस्पराहून भिन्न नसून एकरूपच आहेत, हा येथे मुख्य सिद्धांत आहे. “हरिरेव जगद् जगदेव हरिः, हरितो जगतो न हि भिन्नवप्ुः।’ या तत्त्वाचीच येथे सिद्धी होते.
– चांगदेवपासष्टी तत्त्वचिंतन (भाग – 6)