लंडन – महंमद शमीने फटकावलेले अर्धशतक व त्याला जसप्रीत बुमराहने दिलेली योग्य साथ तर गोलंदाजीत मोहम्मद सिराज आणि बुमराहने केलेली भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने लॉर्ड्सवरील इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात 151 धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या डावात भारताकडून सिराजने 4 तर बुमराहने 3 विकेट घेतल्या. तर इंग्लंडकडून जो रुटने सर्वाधिक ३३ धावा केल्या.
भारताच्या शेपटाने यजमान इंग्लंडला तडाखा दिला व दुसऱ्या कसोटी सामन्यात विजयाची संधी निर्माण केली. कर्णधार विराट कोहलीने 8 बाद 298 धावांवर दुसरा डाव घोषित केला व इंग्लंडसमोर विजयासाठी 272 धावा करण्याचे आव्हान ठेवले.
रविवारी इंग्लंडचा पहिला डाव 391 धावांवर रोखत भारताने आपला दुसरा डाव सुरू केला. पहिल्या डावातील 36 धावांची आघाडी पूर्ण करत इंग्लंडसमोर आव्हान ठेवण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताच्या सलामीवीरांनी निराशा केली.
पहिल्या डावातील शतकवीर लोकेश राहुल, रोहित शर्मा व कर्णधार कोहली हे लवकर बाद झाले व संघाची 3 बाद 55 अशी बिकट स्थिती झाली. त्याचवेळी चेतेश्वर पुजाराने अजिंक्य रहाणेला साथीला घेत संघाचा डाव सावरताना चौथ्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली व संघाला दीडशतकी मजल मारून दिली. पुजारा अर्धशतक मात्र पूर्ण करू शकला नाही.
रहाणेने आपले या मालिकेतील पहिलेच अर्धशतक पूर्ण करताना 61 धावांची खेळी केली. त्यानंतर तोदेखील बाद झाला; तसेच रवींद्र जडेजाही परतला. ऋषभ पंत व इशांत शर्मा यांनी थोडीफार चमक दाखवली. मात्र, हे दोघेही बाद झाले तेव्हा संघाच्या 8 बाद 209 धावा झाल्या होत्या व केवळ 173 धावांची आघाडी हाती होती.
त्याचवेळी महंमद शमी व जसप्रीत बुमराह यांची जोडी जमली व त्यांनी 9 व्या गड्यासाठी 90 धावांची अत्यंत महत्त्वपूर्ण भागीदारी केली व संघाला बळकटी प्राप्त करून दिली. शमीने इंग्लंडच्या गोलंदाजीवर आक्रमण करताना दमदार अर्धशतकी खेळी केली.
त्याला सुरेख साथ देताना बुमराहने 34 धावांची खेळी केली. शमीने आपल्या 56 धावांच्या खेळीत 70 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार व 1 षटकार अशी फटकेबाजी केली. त्यावेळी कोहलीने दुसरा डाव घोषित केला व यजमानांसमोर विजयासाठी 272 धावा करण्याचे आव्हान ठेवले. इंग्लंडकडून मार्क वुडने 3, तर ओली रॉबिन्सन आणि मोईन अलीने प्रत्येकी 2 गडी बाद केले.