– महंत विष्णू म. केंद्रे
जे प्राणिया कामी भरू । देहाचि वरी आदरू । म्हणोनि झाला विसरू । आत्म बोधाचा ।।
संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जीवप्राणी हा कामनेने, वासनेने भरलेला आहे. देह आणि देहसंबंधी पसाऱ्यावर हा आसक्त झालेला आहे. देहाचा आदर करू लागला आहे म्हणजे याच्या पालन पोषणाची काळजी करू लागला आहे. देहाचे संरक्षण करू लागला आहे.
देहसंबंधी पसाऱ्यात वाढ करू लागला आहे. मनुष्य हे सर्व करत आहे ते केवळ सुखासाठी. जेथे सुखच नाही अशा ठिकाणीच तो सुखाचा शोध घेतोय. मात्र, कितीही प्रयत्न केले तरी त्याला त्या ठिकाणी सुख मिळणार नाही. त्यामुळेच त्याला आत्म बोधाचा विसर पडला आहे. मग सुख कशात आहे ते संत
ज्ञानेश्वर महाराज सांगतात,
रूप पाहता लोचनी। सुख झाले वो साजणी।।
माऊली येथे आपल्या बुद्धीला साजणी म्हणतात, मी या डोळ्यांनी ते भगवंताचे रूप पाहिले आणि पाहताक्षणीच मला अमर्याद सुख झाले.
सर्व सुखाचे आगर। बाप रखुमादेविवर ।।