– ब्रिगे. हेमंत महाजन (निवृत्त)
विघटनकारी तंत्रज्ञानाच्या (Disruptive technology) नवीन क्षेत्राच्या उदयामुळे युद्ध लढण्यात आमूलाग्र बदल झाला आहे. आपण जेव्हा विघटनकारी तंत्रज्ञानाविषयी बोलतो, त्यामधले सर्वात महाभयानक आहे चिनी व्हायरस.
चीनने चालवलेले महायुद्ध आपण गेले वर्षभर लढत आहोत. चीनने बहुतेक देश, युनायटेड नेशन्सच्या सगळ्या संस्था विकत घेतल्यामुळे या व्हायरसला अजूनसुद्धा चिनी व्हायरस म्हटले जात नाही. मात्र, या चिनी व्हायरसच्या म्युटेशनमुळे भारतामध्ये जो नवीन व्हायरस संकरित होत आहे त्याला मात्र जगाने लगेच नाव दिले, “करोना व्हायरस इंडियन व्हेरीयंट’. जैविक विघटनकारी तंत्रज्ञान हा एक वेगळाच विषय होईल. या लेखामध्ये आपले लक्ष तांत्रिक विघटनकारी तंत्रज्ञानावर केंद्रित असेल. याची काही उदाहरणे.
नौदलातील महागड्या विमानवाहू नौकांना अतिशय कमी किमतीमध्ये असलेले हाइपरसोनिक मिसाइल उद्ध्वस्त करू शकते. हवाई दलातील महागड्या फायटर एयर क्राफ्टऐवजी अतिशय कमी किमतीमध्ये असलेले ड्रोन जास्त उत्तम काम करू शकतात.
विघटनकारी तंत्रज्ञानाच्या परिणामाच्या विविध पैलूंवर उपाययोजना करण्यासाठी महू येथील आर्मी वॉर कॉलेज येथे संरक्षण आणि रणनीती चर्चासत्र 2021 चा भाग म्हणून “आपल्या लढाई तत्त्वज्ञानावर विघटनकारी तंत्रज्ञानाचा प्रभाव’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते.
चर्चासत्राच्या पॅनेलिस्ट, लष्करी तज्ज्ञ, तंत्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि या विषयावरील वक्ते संबंधित विषयांवर चर्चा करून आणि कल्पना मांडून औपचारिक कागदपत्रे आणि सिद्धांत विकसित केले आहेत. स्वायत्त वाहने, क्लाउड कंप्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), ऑगमेंटेड रियल्टी/व्हर्च्युअल रिऍलिटी (एआर/व्हीआर), रोबोटिक्स, बिग डेटा अनॅलिटीक्स, सायबर, स्मॉल सॅटेलाइट, 5 जी/6 जी, क्वांटम कंप्युटिंग आणि सायबर वॉरफेअर सारख्या विघटनकारी तंत्रज्ञानावर चर्चा झाली. हे चर्चासत्र भारतीय लष्करासाठी राष्ट्रीय महत्त्व असलेल्या सैद्धांतिक आणि सामरिक मुद्द्यांकडे लक्ष वेधणारे होते.
विघटनकारी तंत्रज्ञान
विघटनकारी तंत्रज्ञान, व्यत्यय आणणारे तंत्रज्ञान (Disruptive technology) म्हणजे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान जे युद्ध करण्याच्या पद्धती पूर्णपणे बदलते, एक व्यत्यय आणणारे तंत्रज्ञान जुन्या प्रक्रियेस, मागे टाकते. विघटनकारी तंत्रज्ञानाचे अनेक चांगले फायदे आहेत. मात्र चीनसारखे देश या तंत्रज्ञानाचा वापर दुष्कृत्ये करण्यासाठी आणि लढाई करण्यासाठी करतात. चीन या तंत्रज्ञानाचा कसा गैरवापर करत आहे, हा एक वेगळाच विषय होईल. भारतामध्ये विघटनकारी तंत्रज्ञान या विषयाचे विश्लेषण करण्याकरता, आपल्याला आधीच्या काळामध्ये काय झाले, सध्या काय परिस्थिती आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काय होऊ शकते याचे विश्लेषण करावे लागेल.
चीन नंबर दोन स्थानावर
चीन गेल्या काही वर्षांपासून यामध्ये वेगाने प्रगती करत आहे आणि आता जगामध्ये या तंत्रज्ञानामध्ये त्यांना नंबर दोनचे स्थान आहे. गेल्या तीन दशकांमध्ये भारताने नेमके काय केले? या क्षेत्रामध्ये भारताची कामगिरी अतिशय निराशाजनक आहे. ज्या थोड्या संघटना या विषयावर काम करत आहे त्यांचा काम करण्याचा वेग धिमा आहे. गेल्या तीस वर्षांमध्ये अनेक सरकारी रिपोर्ट तयार करण्यात आले. या सगळ्यांनी अनेक सूचना केल्या; परंतु त्यावर फारशी अंमलबजावणी झाली नाही.
सध्याची परिस्थिती
निती आयोगाने या विषयावरती जास्त वेगाने काम करण्याकरता अनेक योजना बनवण्यात आल्या आहेत. यामध्ये चार तंत्रज्ञानावर खास लक्ष देण्यात आलेले आहे. पहिले तंत्रज्ञान आहे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स. दुसरे तंत्रज्ञान आहे हाइपरसोनिक शस्त्रे. तिसरे तंत्रज्ञान आहे क्वांटम टेक्नॉलॉजी.
यामध्ये भारतीय सैन्य, जागतिक दर्जाच्या शिक्षणसंस्था जशा आयआयटी, संशोधन करणारे शास्त्रज्ञ यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि याला आता मिशन मोडने पुढे नेण्यात येत आहे.
काय केले जात आहे
सायबर तंत्रज्ञानामध्ये शत्रूवर आक्रमक कारवाई करण्याकरता तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून सर्व्हेलन्स म्हणजे शत्रूवरती 24 तास जमिनीच्या वरती, आकाशात लक्ष ठेवणे शक्य होईल. सैनिकी हालचालीचे विश्लेषण करून देशाला किती धोका निर्माण होतो आहे, हे शोधता येईल. अँटी सॅटेलाइट शस्त्रे तयार केली जातील. 5जी तंत्रज्ञानाचा वापर करून आपण कुठल्याही देशाला तोडीस तोड असे उत्तर देऊ शकू. इलेक्ट्रॉनिक वॉर फेअरमध्ये शत्रूच्या तंत्रज्ञानावर प्रतिहल्ले करण्याची क्षमता निर्माण होईल. ऑटोनॉमस व्हेइकल म्हणजे ड्रोन्सचा वापर करून स्वार्म ड्रोन्स म्हणजे 75 ते 100 ड्रोन्स एकाच वेळेला शत्रूवरती हल्ला करण्याची क्षमता प्राप्त होईल. क्वांटम टेक्नॉलॉजीचा वापर करून शत्रूला आपल्या फायर वॉलच्या (रक्षात्मक भिंत) आत प्रवेश करणे अतिशय कठीण होईल. डायरेक्ट एनर्जी वेपन विकसित करून आपण चीनला मेसेज देऊ शकतो की तुम्ही जर अशा तंत्रज्ञानाचा वापर केला तर त्यामध्ये त्याला प्रत्युत्तर देण्याची आमची पण क्षमता आहे.
स्वावलंबनासाठी लक्षणीय सुधारणा
निती आयोगाने तयार केलेल्या एका रिपोर्टप्रमाणे या विषयात जर आपल्याला वेगाने प्रगती करायची असेल, तर अनेक बाबींकडे, अनेक पैलूंकडे लक्ष ठेवावे लागेल. यामध्ये देशाचा इनोव्हेटिव्ह इंडेक्स हा वाढवावा लागेल. देशाचा आरडी इंडेक्स वाढवावा लागेल आणि नवीन तंत्रज्ञान प्रयोगशाळेतून सैन्यात येण्याचा वेग वाढवावा लागेल.
अर्थात हे सगळे तेव्हाच शक्य होईल ज्या वेळेला या सगळ्या कार्यक्रमांना लागणारे बजेट विनाअडथळा पुरवले जाईल. शास्त्रज्ञ एका टीमप्रमाणे काम करून लवकरात लवकर असे तंत्रज्ञान विकसित करतील. सेनादल, शास्त्रज्ञ, उच्च शिक्षण संस्था यांचा मिलाप वाढून वेगवेगळ्या विघटनकारी तंत्रज्ञानामध्ये अजून जास्त वेगाने प्रगती करता येईल. तरच पुढच्या तीन ते चार वर्षांमध्ये आपण चीनबरोबर हायब्रीड लढाई किंवा मल्टी डोमेन लढाई लढण्यासाठी तयार होऊ.