महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुख्यालयात बाहेर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठमोठी पोस्टर्स लागली असून त्यामध्ये अजितदादांचा उल्लेख राज्याचे भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या विषयाची चर्चा सुरू झाली आहे. गेल्याच आठवड्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपला 61 वा वाढदिवस साजरा केला तेव्हा सांगली जिल्ह्यात आणि इतरत्रही अनेक ठिकाणी जयंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या पोस्टरवरसुद्धा त्यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता.
सध्या महाराष्ट्रात एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदावर विराजमान आहेत तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा यापूर्वी मुख्यमंत्रिपद भूषविले आहे. ज्यांच्याकडून मुख्यमंत्रिपद हिसकावून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले ते उद्धव ठाकरेसुद्धा माजी मुख्यमंत्री आहेत. याव्यतिरिक्त जर कॉंग्रेस या पक्षापुरते बोलायचे झाल्यास या पक्षामध्ये अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे हे माजी मुख्यमंत्री आहेत याशिवाय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीसुद्धा आपली महत्त्वाकांक्षा कधी दडवून ठेवलेली नाही. विविध राजकीय पक्षातील नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांवर नजर टाकली तर भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे उल्लेख का केले जात आहेत याचाही शोध आपोआप लागतो.
अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या पोस्टरनंतर पक्षातर्फे अधिकृतपणे खुलासा करण्यात आला असून अद्याप निवडणुका जाहीर झाल्या नाहीत त्यामुळे ही चर्चा व्यर्थ आहे आणि याबाबतचा अंतिम निर्णय आमचे सर्वोच्च नेते शरद पवार घेतील, असा खुलासाही करण्यात आला आहे. राज्यातील सत्तांतरानंतर खरे तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विरोधी पक्षनेते होण्याची इच्छा होती पण पक्षाने पुन्हा एकदा ही संधी अजित पवार यांनाच दिल्यामुळे जयंत पाटील नाराज आहेत ही बाबही लपून राहिलेली नव्हती. याच नाराजीतून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि त्यापूर्वी सुद्धा अनेक वेळा जयंत पाटील यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला होता. दुसरीकडे अजित पवार यांनी अनेक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री पद भूषवले असल्याने आपोआपच राष्ट्रवादी पक्षाच्या दृष्टिकोनातून ते विधिमंडळातील सर्वोच्च नेते ठरतात.
साहजिकच जर आगामी कालावधीमध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद भूषवण्याची संधी आली तर अजित पवार यांचेच नाव प्राधान्याने घेतले जाईल हेच सूचित करण्याचा हा प्रयत्न आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी जेव्हा महाविकास आघाडीचा प्रयोग झाला तेव्हा ज्या प्रकारे शरद पवार यांनी पुढाकार घेऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री होण्याची गळ घातली ते पाहता जर आगामी निवडणूक महाविकास आघाडी एकत्रपणे लढणार असेल तर या आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे असतील का अजित पवार असतील का अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यापैकी कोणीतरी असेल याचा खुलासाही आता नजीकच्या काळात होण्याची गरज आहे. महाराष्ट्रासारख्या राजकीयदृष्ट्या सक्रिय आणि जागरूक राज्यातच एकाच वेळी अनेक सक्षम नेते मुख्यमंत्री पदाचे दावेदार असू शकतात आणि हे पद सांभाळण्याची क्षमताही त्यांच्याकडे आहे हेही नाकारून चालणार नाही.
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री कोण, या विषयाची चर्चा सुरू असतानाच विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीचाही स्वतंत्रपणे विचार करावा लागणार आहे. कारण सहा सात महिन्यापूर्वी जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा उभारला होता तेव्हा भाजपला ते पाठिंबा देतील आणि देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री होतील अशी शक्यता असतानाच भाजपने मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली होती आणि फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले होते. भाजपची आजवर्षी एकंदर रणनीती बघता आगामी निवडणुकीनंतर पुन्हा एकदा जर भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाचे प्रोजेक्शन झाले तर आश्चर्य वाटायला नको. यावेळी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाची भूमिका काय असेल हे पाहावे लागेल.
कोणत्याही राज्याची निवडणूक जेव्हा काही महिने दूर असते तेव्हाच त्याची रणनीती आखली जाते आणि कोणाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवायची किंवा मुख्यमंत्री म्हणून कोणाचे नाव प्रोजेक्ट करायचे याबाबतही विचारविनिमय होत असतो. साधारणपणे सत्ताधारी पक्ष आपल्या विद्यमान मुख्यमंत्र्याला प्रोजेक्ट करून रणनीतीची आखणी करत असतात. विरोधी आघाडीसुद्धा विरोधी पक्षनेत्याला पुढे करून किंवा अन्य एखाद्या सक्षम नेत्याचा विचार करून प्रोजेक्शन करत असतात. राज्यातील सध्याची विद्यमान राजकीय परिस्थिती एवढी विचित्र आहे की सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी आघाडी असो मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून कोणाला प्रोजेक्ट करणार याबाबत मोठ्या प्रमाणावर संभ्रमाची अवस्था आहे. सत्ताधारी आघाडीने नैसर्गिक राजकीय न्यायाने एकनाथ शिंदे यांच्याच नावाचे प्रोजेक्शन करणे अपेक्षित आहे; पण भाजपची महत्त्वाकांक्षा बघता देवेंद्र फडणवीस यांचेच नाव प्रोजेक्ट होण्याची शक्यता दिसत आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी जरी कारभार बघितला असला तरी आगामी निवडणुकीमध्ये आघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव जाहीर केले जाईल अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही. ज्या प्रकारे अजित पवार आणि जयंत पाटील स्वतःला प्रोजेक्ट करत आहेत ते पाहता कोणत्याही एका नेत्याच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी निवडणूक लढवेल असे वाटत नाही. निवडणुकीच्या निकालानंतरच नेता कोण असेल हे ठरवले जाईल असे सध्या तरी दिसते. आजपर्यंतचे आघाडीचे आणि युतीचे राजकारण पाहता कॉंग्रेसच्या नेत्यांना अनेक वेळा मुख्यमंत्रिपद मिळाले आहे तर महाविकास आघाडीच्या प्रयोगामध्ये शिवसेनेलाही मुख्यमंत्रिपद मिळाले आहे. पण राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याला आतापर्यंत मुख्यमंत्रिपदावर बसता आलेले नाही हे वास्तवही या ठिकाणी नाकारून चालणार नाही.
साहजिकच नैसर्गिक राजकीय न्यायाचा विचार करता भावी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांचा दावा जास्त प्रबळ असला तरी निवडणुकीच्या निकालानंतर काय परिस्थिती निर्माण होते त्यावरच सर्व काही ठरणार आहे. लोकशाही राजकारणात कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा नेत्याने मुख्यमंत्रिपद मिळवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणे चुकीचे नाही. महाराष्ट्राच्या विद्यमान राजकीय पटलावर जर आगामी मुख्यमंत्री कोण याविषयी चर्चा रंगत असेल तर त्या चुकीचे काहीच नाही पण ही महत्त्वाकांक्षा प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना आगामी कालावधीमध्ये कसून परिश्रम करावे लागणार आहेत हेही नाकारून चालणार नाही.