भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (पहिला उपांत्य सामना)
ठिकाण – न्युलॅंड्स, केपटाऊन
वेळ – संध्याकाळी 6ः30 पासून
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्टस
केपटाऊन – हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारताच्या महिला क्रिकेट संघाची आज बलाढ्य ऑस्ट्रेलिया महिला संघाशी उपांत्य लढत होत आहे. महिलांच्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत भारतीय संघाने दमदार वाटचाल केली असली तरीही ऑस्ट्रेलियाविरुद्धचा आजवरचा इतिहास पाहता बारतीय संघाला कामगिरी उंचावावी लागणार आहे.
भारतीय संघाने या स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करत थाटात सुरुवात केली होती. त्यानंतर भारतीय संघाने वेस्ट इंडिजलाही नमवताना आपली विजयी घोडदौड कायम राखली. मात्र, त्यानंतरच्या लढतीत भारतीय संघाला इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर अखेरच्या साखळी लढतीत पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात भारतीय संघाला विजेता घोषित करण्यात आले.
या सामन्यात स्मृती मानधनाने आपण भरात आल्याचे सिद्ध केले होते. मात्र, आता लढत ऑस्ट्रेलियाविरुद्ध असून ते अद्याप या स्पर्धेत अजिंक्य आहेत. त्यांनाच या स्पर्धेचे संभाव्य विजेतेही मानले जात आहे. मात्र, आज भारतीय संघाला हा दावा खोडून काढण्याची संधी आहे. त्यासाठी कर्णधार हरमनसह शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, रिचा घोष, जेमिमा रॉड्रीक्ससह सर्वच खेळाडूंना आफली कामगिरी उंचवाली लागेल.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंगसह एलिस पेरी, बेथ मुनी, ऍश्ले गार्डनर व ताहिला मॅकग्रा या प्रचंट भरात आहेत. तसेच त्यांची गोलंदाजीही मेगन शल्ट, डार्सी ब्राऊन, पेरी, गार्डनर व ऍनाबेल सदरलॅंड यांच्यामुळे भेदक आहे. याच गोलंदाजीसमोर विविध स्पर्धांमध्ये भारतीय फलंदाजांना अपयशाचा सामना करावा लागलेला आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय महिला संघाला गाफिल राहून चालणार नाही. ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेतील सर्वच्यासर्व साखळी सामने जिंकत थाटात उपांत्य फेरी गाठली आहे.
KL Rahul : वारंवार अपयशी ठरूनही राहुलला संधी, व्यंकटेश प्रसाद संतापले, म्हणाले “गुणवान खेळाडूंवर…”
भारतीय संघाची ताकद फिरकी गोलंदाजी असली तरीही रेणुका सिंगवर वेगवान गोलंदाजीची मदार राहणार आहे. तिचे स्विंग चेंडू कसे खेळायचे याचे आव्हान ऑस्ट्रेलियासमोर निर्माण होण्याची शक्यता आहे. या सामन्यासाठी देविका वैद्य, शिखा पांडे व पूजा वस्त्रकार यांना बाहेर ठेवले जाण्याची शक्यता आहे. तर, हरलिन देओल, यस्तिका भाटिया व राधा यादव यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
शफाली वर्मावर मदार
या सामन्यात सातत्याने धावा करत असलेल्या शफाली वर्मा हिच्यावर जास्त मदार राहणार आहे. स्मृती मानधना भरात असली तरीही शफालीलाच सुरुवातीला वेगाने धावा करण्याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. मानधनावरचे दडपण दूर करण्यात तिला यश आले तर भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारूही शकतो तसेच मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलागही करू शकतो.