– माधव विद्वांस
मराठी समीक्षक व विचारवंत दिनकर केशव बेडेकर, यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 8 जून 1910 रोजी सातारा येथे झाला. त्यांचे आरंभीचे शिक्षण सातारा येथे, नंतर इंटर सायन्सपर्यंत पुण्याच्या फर्गसन कॉलेजमधून शिक्षण घेतले. त्यानंतर अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी ते कराचीस गेले. वर्ष 1929 मध्ये हे शिक्षण अर्धवटच सोडून चित्रकलेच्या अभ्यासासाठी त्यांनी शांतिनिकेतनमध्ये प्रवेश घेतला, परंतु प्रकृती बिघडल्यामुळे हा शिक्षणक्रमही ते पूर्ण करू शकले नाहीत. त्यानंतर ते बनारसला आले आणि तेथील विद्यापीठात तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्र ह्या विषयांतील पदवी त्यांनी प्राप्त केली.
तेथे शिकत असतानाच, 1930 मध्ये महाराष्ट्रात येऊन मुळशी सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. पुढे मुंबईत येऊन ते कामगार चळवळीत सहभागी झाले. वर्ष 1933 मध्ये बोल्शेव्हिक कम्युनिस्ट गटात सामील झाले. हा बोल्शेव्हिक गट पुढे कम्युनिस्ट पक्षात विलीन झाला. वर्ष 1940 मध्ये त्यांना अटक होऊन दोन वर्षे तुरूंगवास भोगावा लागला. पुढे वर्ष 1950 मध्ये कम्युनिस्ट पक्षाशी मतभेद झाल्यामुळे त्या पक्षाचा राजीनामा देऊन त्यांनी राजकारणाशी फारकत घेतली व पुन्हा ते शिक्षणाकडे वळले. 1954 साली तत्त्वज्ञान हा विषय घेऊन एम.ए. झाल्यानंतर पुणे येथील गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या अर्थविज्ञान ह्या त्रैमासिकाचे त्यांनी संपादन केले. वर्ष 1962 ते 1964 ह्या काळात मराठी विश्वकोशाच्या कार्यालयात विभाग संपादक होते. 1968-69 मध्ये गोखले अर्थशास्त्र संस्थेत मराठी ग्रंथसंपादनाचे कार्य त्यांनी केले. त्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठात ते तत्त्वज्ञानाचे अध्यापन करीत असत.
बेडेकरांनी वर्ष 1936 च्या आसपास कथा तसेच राजकीय वाङ्मयीन स्वरूपाचे लेखन करावयास सुरुवात केली होती. मात्र, त्यांचे सर्व महत्त्वाचे लेखन 1950 नंतरच्या कालखंडातच झाले. या काळात नवकाव्य, नवकथा, नवे साहित्यविचार, सौंदर्यशास्त्रीय मीमांसा, अस्तित्ववादासारख्या विचारप्रणाली यांचा उदय झाला होता. या काळाची आव्हाने व आवाहने साक्षेपाने स्वीकारून समीक्षेच्या क्षेत्रात लेखन करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांनी “साहित्यनिर्मिती व समीक्षा’, “साहित्यविचार’, “केशवसुतांची काव्यदृष्टी’, “आधुनिक मराठी काव्य : उदय, विकास आणि भवितव्य’ यांसारखे ग्रंथ लिहिले. प्राचीन भारतीयांच्या सौंदर्यशास्त्राच्या विविध रूपांची ओळख त्यांनी आपल्या लेखनातून करून दिली आहे. “मराठी वाङ्मयाची सामाजिक पार्श्वभूमी’ या लेखातून साहित्याचा इतिहास व संशोधन करण्याची गरज त्यांनी विशद केली.
तत्कालीन समाजव्यवस्थेवर प्रकाश टाकणारे “हिंदी उद्योगधंद्यात राबणाऱ्या स्त्रिया व मुले’, “संयुक्त महाराष्ट्र’, “सुमित्रानंदन पंत’, “अणुयुगातील मानवधर्म’, टूवर्डस अंडरस्टॅंडिग गांधी,’ “धर्मचिंतन आणि धर्मश्रद्धा’, “एक पुनर्विचार’ ही विविध विषयावर त्यांनी महत्त्वाची अन्य पुस्तके आहेत. मार्क्सच्या द्वंद्वात्मक जडवादाचा प्रभाव बेडेकरांच्या साहित्यविचारांवर पडलेला दिसतो. सौंदर्य या कल्पनेवर ज्याची निष्ठा आहे, तो साहित्याचा किंवा कलेचा समीक्षक होऊ शकतो अशी त्यांची धारणा होती. त्यांचे 2 मे 1973 रोजी निधन झाले.