बांगलादेश भारताचा सदैव ऋणी राहील
नवी दिल्ली, ता. 7 – “बांगलादेशातील काही विरोधी पक्ष भारताची निंदा करीत आहेत. त्यामुळे बांगलादेशावर राजकीय दडपण आणण्यात येत आहे, असे मत बांगलादेशचे पंतप्रधान शेख मुजीबूर रहमान यांनी एका वार्ताहराला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. ते पुढे असेही म्हणाले, “बांगलादेश भारताचा सदैव ऋणीच राहील.’
सिमला करारामध्ये नमूद केलेल्या तत्त्वामुळे बांगलादेशाचे नुकसान होत आहे, तसेच पाकिस्तानमधील बंगालींना परत आणण्यात अडचणी वाढत आहेत. या विधानाचा त्यांनी इन्कार केला. सिमला कराराचे बांगलादेश स्वागत करीत आहे. त्याबरोबर भारताने पाकिस्तानसंबंधीचे काही प्रश्न सोडविले आहेत, असेही मुजीबूर यांनी सांगितले. भारतीय उपखंडात शांतता नांदावी, असे बांगलादेशाला वाटते. भारत-पाक प्रश्नांमध्ये बांगलादेश नाक खुपसू इच्छित नाही.
भडकते भाव, अपुरा पुरवठा, खाद्य पेय विक्रेत्यांची कुचंबणा
पुणे- खाद्य पेयांना आवश्यक असलेल्या जिनसांचा अपुरा पुरवठा आणि त्यांचे सतत भडकत चाललेले भाव यामुळे खाद्य पेय विक्रेत्यांची अत्यंत कुचंबणा होत आहे, असे पुणे खाद्य पेय विक्रेता संघाकडून सांगण्यात आले. त्यांच्यानुसार, सरकारकडून आटा, मैदा, तांदूळ इत्यादी आवश्यक जिनसांचा पुरवठा अत्यंत अनियमितपणे व अपुरा होतो. तर विविध जिनसांचे भाव सतत वाढत आहेत.
1980 साली जगभर इंधनाची टंचाई भासेल
इंग्लंड – तेलापासून मिळणाऱ्या शक्तीच्या व्यतिरिक्त नवीन शक्ती उत्पादनाचे मार्ग न शोधल्यास तसेच वाया जाणारे जळण कमी केले नाही तर 1980 सालापर्यंत सर्व जगास जळण तुटवड्याच्या प्रश्नास तोंड द्यावे लागेल,’ असे मत येथील पेट्रोलियम इन्स्टिट्यूटने व्यक्त केले आहे.