नवी दिल्ली – उरवडे (ता. मुळशी) येथ सॅनिटायझर बनवणाऱ्या एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस कंपनीला सोमवारी (दि. 7) दुपारी भीषण आग लागली. यात अंदाजे 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. 18 कामगारांचे मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत. त्यात 15 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश होता. रात्री उशीरा सापडलेला मृतदेह महिलेचा की पुरुषाचा याची ओळख पटलेली नाही.
या भीषण आगीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या कामगारांसाठी पंतप्रधान मोदी यांनी, पंतप्रधान सहाय्यता निधीतून प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना ५० हजारांची मदत घोषित करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
राज्य सरकारने देखील या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचीही माहिती दिली.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेबाबत देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील या दुर्घटनेबाबत सहवेदना व्यक्त केल्या आहेत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिलेल्या संदेशामध्ये, “पुण्यातील एका कंपनीला लागलेल्या भीषण आगीमध्ये येथील कामगार मृत्युमुखी पडल्याची घटना दुर्दैवी आहे. मृतांमध्ये बहुतांश महिला आहेत. मृतांच्या कुटुंबीयांप्रती व सहवेदना व्यक्त करतो तसेच आगीमध्ये जखमी झालेले लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो.” असं म्हंटल आहे.