सागरी सुरक्षेचा, महत्त्वाच्या आस्थापनांच्या संरक्षणाचा, बंदरे व त्यांच्या कर्मचाऱ्यांना धोक्यांपासून सुरक्षित राखण्याचा गाभा गुप्तवार्तांकन हाच आहे.
राजाने… दिवस व रात्रीचे प्रत्येकी आठ भाग करावेत… पाचव्या भागात पत्रव्यवहाराद्वारे मंत्रिपरिषदेसोबत सल्लामसलत करावी आणि गुप्तहेरांकडून मिळालेल्या गुप्तवार्ता अहवालांनी स्वतःस अद्ययावत ठेवावे… रात्रीच्या पहिल्या भागात त्याने गुप्तवार्तांकन अधिकाऱ्यांची भेट घ्यावी… सातव्या भागात, त्यांच्याशी सल्लामसलत करावी आणि त्यांना कार्यवाही करता रवाना करावे. -राजाची कर्तव्ये, कौटिलीय अर्थशास्त्र 26 नोव्हेंबर 2022 रोजी मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याला 14 वर्षे पूर्ण होत आहे. यामुळे सागरीसुरक्षेचे विश्लेषण करणे जरुरी आहे की आता आपली सागरीसुरक्षा सक्षम झाली का? आणि होणारे हल्ले थांबवण्यामध्ये आपल्याला यश मिळेल का? 2022 मध्ये समुद्राकडून येणाऱ्या हजारो कोटी रुपयांच्या नॉर्कोटिक्स म्हणजे अफू, गांजा, चरस जप्त करण्यात आले कारण कुठल्या बोटीमध्ये हे सामान येणार होते, याची नेमकी माहिती मिळाली होती आणि त्या बोटीला थांबवून तपास करण्यात आला आणि मोठ्या प्रमाणामध्ये अफू, गांजा, चरस जप्त करण्यात आला. यावरून गुप्तहेर माहिती अचूक असली तर किती यश मिळू शकते याची आपल्याला कल्पना येऊ शकते.
गुप्तवार्तांकनातील अपयश
पूर्वसूचित असणे म्हणजेच पूर्वशस्त्रसज्ज असणे होय. हे एक विश्व स्वीकृत सत्य आहे. वारंवार घडणाऱ्या दहशतवादी कृत्यांवरून आणि मोठ्या सुरक्षा अपयशांवरून, त्या सक्रिय असण्याऐवजी त्या प्रतिक्रियावादी होत आहेत. 26-11-2008 असो की कारगील, किंवा श्रीलंका (कार्यवाहीपवन), गुप्तवार्तांकन हाच देशाचा कच्चा दुवा ठरलेले आहे.
समुद्रमार्गे पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशामध्ये येणाऱ्या बांगलादेशी स्थलांतरितांचा ओघ सुरूच आहे. सुंदरबनच्या त्रिभुज प्रदेशात तस्करी हा आयुष्याचा एक भागच झालेला आहे. पश्चिम किनाऱ्यावर शस्त्रास्त्रे, दारूगोळा, खोटे चलन, सोन्याची, अंमलीपदार्थांची आणि इतर वस्तूंची तस्करी सुरूच आहे. पण हे सर्व थांबवण्याकरता आवश्यक असलेले कृती योग्य गुप्तवार्तांकन मिळवू शकलेलो नाही. तस्करी करणारे गुन्हेगार, देशद्रोही यांना आपण पकडू शकलो नाही.
एलटीटीईच्या सांकेतिक संदेशांची वेळेत उकल करण्याचे सामर्थ्य आपल्या गुप्तवार्तांकन संघटनांनी प्राप्त केले असते तर, कदाचित राजीव गांधी यांचा जीव वाचला असता. इंटेलिजन्स ब्युरो आणि रिसर्च अँड ऍनालिसिस विंग या दोघांपाशीही शक्तिशाली पहिल्या पिढीचे संगणकही नव्हते आणि शत्रूचे सांकेतिक संदेश उलगडण्यास आवश्यक त्या संगणक प्रणालीही नव्हत्या. आपल्याला सर्व भाषांचे तज्ज्ञ हवे आहेत. 26-11-2008च्या मुंबई हल्ल्यांपूर्वी दोन ते सहा महिने आधीच संशोधन व विश्लेषण शाखेने अनेक दूरध्वनी संवाद, संकेत गुप्तवार्तांकन हस्तक्षेपाद्वारे प्राप्त केलेले होते. ज्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून मुंबईतील हॉटेलांवर होऊ घातलेल्या हल्ल्यांकडे निर्देश होते. मात्र, समन्वयनात अपयश आल्याने त्यांचा पाठपुरावा होऊ शकला नव्हता.
हल्ल्यापूर्वी काही तास, संशोधन व विश्लेषण शाखेच्या एका तंत्रज्ञास, उपग्रह प्रक्षेपणांची देखरेख करत असताना, हल्लेखोर जलमार्गाने मुंबईत येत असताना, हल्लाकर्ते आणि त्यांना हाताळणारे यांच्यातील संवाद हाती आलेला होता. तंत्रज्ञाने त्या संवादास संशयास्पद म्हणून चिन्हांकित केले होते आणि वरिष्ठांकडे पाठवलेही होते. संशोधन व विश्लेषण शाखेने तो संवाद चिंताजनक असल्याचे जाणून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या कार्यालयास लगेचच सावध केले होते. मात्र, या गुप्तवार्तांकडे दुर्लक्ष करण्यात आले. नंतर दहशतवाद्यांनी मुंबईवर नुकताच हल्ला केलेला होता तेव्हाही, गुप्तहेर खात्याचा एका तंत्रज्ञ दहशतवादी सहा दूरध्वनी संचांवर चाललेले संभाषण टॅप करत होता.
सागरीसुरक्षेकरता असलेले गुप्तवार्तांकनाचे महत्त्व जाणून घेतल्यानंतर, एक ताजा दृष्टिक्षेप वर्तमान गुप्तवार्तांकन व्यवस्थेवरही टाकणे आवश्यक आहे. त्याचे तपशीलवार विश्लेषण करणे आवश्यक आहे. ज्यामुळे गुप्तवार्तांकन करणाऱ्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत? त्यांच्या सातत्याने होत असलेल्या निकृष्ट कामगिरीची कारणे काय आहेत आणि ईप्सित परिणाम प्राप्त करण्यासाठी सर्व गुप्तवार्तांकन दलांचे समन्वय करण्याची आवश्यकता आहे काय हे पैलू स्पष्ट होतील.
गुप्तवार्तांकनांची देशाला गरज
जगातील सर्वाधिक हिंसक भागात असलेले भारताचे भौगोलिक स्थान आणि जन्मत: भारतविरोधी असलेले पाकिस्तान व चीनसारखे त्याचे शेजारी, भारतातील गुप्तचर दलांचे काम अधिकच अवघड आणि अडचणीचे करतात. भारताच्या गुप्तवार्तांकन संस्थांचा इतिहास असे दर्शवतो की, दहशतवादी हल्ले थांबवता येतील अशी त्यांची आजवरची कामगिरी नाही. भावी आव्हानांच्या दृष्टिकोनातून त्यांचे नियोजन केले गेलेले नाही. प्रभावी सागरी सुरक्षा मिळण्यासाठी, कृतीपात्र गुप्तवार्तांकनांची आवश्यकता असते. गुप्तवार्तांचे संकलन, समन्वय आणि उपयुक्त माहितीबाबतचा अहवाल देणे हा, जगात ऐतिहासिकदृष्ट्या दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात पुरातन व्यवसाय आहे.
भारतातील वर्तमान जागतिक, प्रादेशिक आणि अंतर्गत सुरक्षा पर्यावरणात, सर्व हितसंबंधियांना धोक्याची पूर्वसूचना प्राप्त होण्याकरता, एक सक्षम गुप्तवार्तांकन आवश्यक आहे. “चतुर व हुशार गुप्तवार्तांकन’ (स्मार्ट इंटेलिजन्स) संकलन, विश्लेषण, समन्वय, नोंद, वाटप, वापर आणि त्यावर सागरीसुरक्षा हितसंबंधियांकडून प्रभावी कार्यवाही होणे अत्यंत गरजेचे आहे. एक सामायिक इंटर ऑपरेबल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला पाहिजे. जेणेकरून सुरक्षेत गुंतलेल्या प्रत्येक दलास त्याचे आधारे सुरक्षा प्रतिसाद निर्धारित करता येईल. देशाच्या फायद्यासाठी संघटनात्मक चौकटीत राहून एकत्रितरीत्या काम केले पाहिजे. ज्यामुळे गुप्तवार्तांकन माहिती वाटप जलद शक्य होईल.
गुप्तवार्तांकन प्रक्रिया, प्रचलित गुप्तवार्तांचा अहवाल तयार करून किंवा त्यावरून अनुमाने करून संपूर्ण होत नाही. प्रमुख समस्या तो अहवाल अजूनही कारवाई करण्यायोग्य आहे हे सुनिश्चित करणे असते. तो अहवाल योग्य वेळेत, योग्य सुरक्षा दलांच्या हाती पडावा आणि तो वापरेल यावर लक्ष ठेवावे. त्यामुळे गुप्तवार्ता अधिकारी आणि सागरी सुरक्षेत गुंतलेले नौदल वा तटरक्षक दलाचा कमांडिंग अधिकारी, सागरी पोलीस आणि बंदरे यांच्यात निकटचे संबंध प्रस्थापित झालेले असावे.
भारतीय गुप्तवार्ता दले
भारतापाशी अनेक गुप्तवार्ता दले आहेत. पण महत्त्वाचे हे आहे की, सगळ्या दलांना, नियोजनाच्या पायरीवरच, किनाऱ्यास असलेल्या सर्व धोक्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशिक्षित केले पाहिजे. नौदल/तटरक्षकदल/पोलीस दल यांच्या कार्यकारी आदेशकांनी त्यांची सामर्थ्ये आणि मर्यादा समजून घेतल्या पाहिजेत आणि मग दलांना कर्तव्य निर्धारित करून दिली पाहिजेत.