पुणे सायबर पोलिसांनी एक मोठी चोरी रोखली. दोन-तीन वर्षांपूर्वी एक चोरी पुण्यात झाली होती. त्यात एका बॅंकेला शंभर कोटींच्या घरात गंडा घातला गेला. या चोरीतील दहा जणांना पकडले. मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे. अन्य चोर पकडले गेले. मात्र पैसे काही परत मिळाले नाहीत. जी काही रक्क्म मिळाली ती अगदीच थोडकी आहे. त्यामुळे पुण्याच्या सायबर पोलिसांनी आता जे काही केले ते अभिनंदनीय आहे. कारण दुर्घटना घडल्यावरच पोलीस पोहोचतात अशी ख्याती आहे. येथे तर दुर्घटना अशी घडणार होती की ती कदाचित पुढचे काही तास समजलीच नसती. मात्र पोलिसांची कमाल एवढी की त्यांना केवळ असे होणार आहे हे समजलेच नाही, तर ते रोखण्यातही यश आले.
अडीचशे कोटींच्या आसपासची ही चोरी होती. ती रोखली गेली. गुन्हेगार पकडले गेले. त्यांचा खटला वगैरे चालेल. न्यायालये त्यांचे काय करायचे ते ठरवतील. मात्र या गुन्ह्यातून जी माहिती मिळाली आहे ती चक्रावणारी आहे. गुन्हेगार कोणी अल्पशिक्षित अथवा तत्सम पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबातील नाहीत. ते सगळे स्वत: शिकले सवरलेले आहेत. यातील काही जणांची नावे पाहिली आणि ऐकली तर त्यांच्या घराण्यांत शिक्षणाचा दुष्काळ कधी असावा असे वाटत नाही. बहुतांश नावे मराठी मुलांचीच आहेत. अन् आपण काय करतोय याची त्यांना पूर्ण कल्पना होती. एक वय असते, ज्यावेळी काही गोष्टी कळत असतात मात्र वळत नसतात. या आरोपींचे वय पाहता ते त्या वयोगटातील नाहीत. आपण पकडले गेलो तर त्याचे काय परिणाम होतील याची त्यांना पूर्ण कल्पना असणार. शिवाय हा काही तीन तासांचा एखादा थरारपट अथवा क्राइम थ्रीलर नसणार याचीही त्यांना जाणीव असणार. तरीही हे कृत्य करायला ते धजावले. त्याला दोनच कारणे असू शकतात.
एक म्हणजे आपण करणार आहोत त्यात आपण तज्ज्ञ आहोत व करून नामानिराळे राहता येईल हा ओव्हर कॉन्फीडन्स. किंवा दुसरे कारण म्हणजे त्यांची स्वप्ने, आशा, आकांक्षा व त्या पूर्ण करण्याची कुवत नसल्यामुळे कोणत्याही मार्गाने का होईना ती कुवत प्राप्त करायचीच आणि आपल्याला हवे ते साध्य करायचेच हा जो नव्या पिढीचा मंत्र झाला आहे ज्याला ते लाइफ स्टाइल म्हणतात त्या लाइफ स्टाइलच्या आकांक्षांचे ते कैदी झालेले असणार. खरेतर धोक्याची घंटा हीच आहे. त्यावर उपाय म्हणजे जसे आता चोरी रोखण्यात यश आले तसे यापुढे कोणी पुन्हा अशा चोरीचा विचारही करू नये, तो विचारच रोखण्यात यश मिळवण्याची नितांत गरज आता निर्माण झाली आहे. हे काम अर्थातच चर्चा, गोंधळ, कायदे करून होणार नाही. तर ज्या टप्प्यावर ही गुन्हेगारीची मानसिकता तयार होण्यास सुरुवात होते, स्वप्ने पूर्ण करणे आणि त्यासाठी वाटेल ते रिस्क घेण्याची इच्छा प्रबळ होऊ लागते त्या पायरीवर जाऊन तेथेच ब्रेन वॉश करून सन्मार्गावर राहण्याचा नैतिक धाक निर्माण करणारे वातावरण पुन्हा एकदा विकसित करावे लागणार आहे.
मघाशी उल्लेख केल्याप्रमाणे संबंधित बॅंकेतून मोठी रक्कम गायब झाल्यावर पुढे काय झाले त्याचा माग या लोकांनी काढला असू शकतो. ती शक्यता नाकारता येत नाही. “कानून के हाथ लंबे होते है’ हा सुविचारही त्यांनी ऐकला असणार आहे. मात्र लंबे म्हणजे किती लंबे याचाही अभ्यास या मंडळींनी केला असावा. शिवाय इंटरनेटच्या युगात कशाची माहिती मिळत नाही ते विचारा. सगळेच साहित्य प्रात्यक्षिकासह उपलब्ध असते. ते ऑपरेट फक्त तेवढे करता आले पाहिजे. आताच्या प्रकरणात जे लोक पकडले गेले आहेत अर्थात, जे संशयित आहेत त्यांना या माध्यमाची, त्याच्या ताकदीची आणि त्याच्यातल्या लपण्याच्या स्थळांचीही त्यांना पूर्ण कल्पना होती हे त्यांचे शैक्षणिक रेकॉर्डच सांगते. दोन ते तीन राज्ये आणि पाच-सहा महानगरांपर्यंत या टळलेल्या चोरीची किंबहुना दरोड्याची व्याप्ती होती. खासगी तसेच इतर बॅंकातील खात्यांची माहिती त्यांनी मिळवली होती. यातील काही खाती निष्क्रिय तर काही सक्रिय होती. ही माहिती चोरल्यानंतर त्यातील रक्कम इतर खात्यांवर वळवण्याचा त्यांचा कट होता. रक्कम तरी किती, तर तब्बल अडीचशे कोटींच्या घरात. यातील बहुतेक खाती ही कॉर्पोरेट कंपन्यांची होती.
बॅंक खात्यांची गोपनीय माहिती स्टोअर करण्याचे काम ज्या कंपनीकडे होते, त्या कंपनीतील दोघांनाही या कटात सहभागी करून घेण्यात आले होते. याचाच अर्थ अत्यंत अभ्यासपूर्वक हा कट आखण्यात आला होता. तो तडीस नेण्यासाठी कोणाकोणाची गरज आहे, त्याची तयारीही केली गेली असणार आणि नंतर कोणाला काय विकायचे आहे त्यांनाही हेरून ठेवले होते. अत्यंत नियोजनबद्धपणे हे काम पुण्यात झाले. ते तडीस गेले नाही. आगामी काळात धोका असणार आहे, तो अशाच बुद्धिवंतांचा. यातील एका तरूणीला शेअर मार्केटमध्ये झालेल्या नुकसानीची देणी चुकवायची होती, तर एकाला वेबसीरिजची निर्मिती करायची होती, असे सांगितले जाते आहे. पण या लोकांनी सरळ मार्गाने न जाता व तोपर्यंत वाट न पाहता शॉर्टकटने जाणे पसंत केले. हा शॉर्टकट त्यांना चुकीच्या आणि कायमचा कलंक घेऊन मिरवाव्या लागणाऱ्या ठिकाणी घेऊन गेला आहे अन् त्यांच्या पालकांनाही आता तोच कलंक माथी घेऊन व त्याच्या वेदना झेलत कदाचित उर्वरित पूर्ण आयुष्य काढावे लागणार आहे.
खूप पूर्वी एक चांगला चित्रपट आला होता. त्यातील पोलीस नायक एका मुलावर गोळी चालवतो. त्या मुलाचा दोष काय असतो तर त्याने चोरी केली असते. त्या मुलाने काय चोरी केली आहे ते पाहण्यासाठी नायक त्याच्याजवळ जातो तेव्हा चोरलेला पाव की पोळी पाहून नायकाला गलबलून येते. गरिबी आणि भूक सगळ्यांनाच जेरीस आणते. म्हणून काय प्रत्येकाने चोरीच करायची का, हे त्या चोर मुलाच्या वृद्ध पित्याचे विधान टाळ्या मिळवणारे आणि नैतिकतेचे अधिष्ठान स्थापित करणारे. निवृत्त शिक्षकाच्या भूमिकेतील या पित्याने चित्रपटाच्या माध्यमातून समाजाला दिलेला तो विचार मोलाचा होता. चोरीच्या घटना तेव्हाही घडत होत्या, आताही घडत आहेत.
आताच्या काळात चोरीचे स्वरूप फक्त बदलले आहे. चोरांची शैक्षणिक पात्रता बदलली आहे. पूर्वी हिसका मारून अथवा धाक दाखवून चोऱ्या व्हायच्या आता डोक्याने मात देऊन बॅंक खाती रिकामी केली जात आहेत. मूलभूत प्रेरणा तीच आहे, शॉर्टकट. एक गुन्हा थोपवला असला तरी गुन्हेगार संपणार नाहीत. उलट भविष्यात कदाचित अशा अनेक बुद्धिमान चोरांशी सामना करावा लागणार आहे. पोलिसांना प्रत्येक वेळी यश मिळेलच असेही नाही. पण पोलिसांच्या मदतीसाठी प्रत्येक पित्याला त्या निवृत्त पित्याच्या भूमिकेत शिरावे लागणार.