पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागले आहेत. कारण हिमाचल आणि दिल्लीचा पराभव जिव्हारी लागला आहे. यामुळे कुणाचे पंख छाटले जातील तर कुणाला संधी मिळेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करणार असल्याची कुजबूज ऐकू येऊ लागली आहे. यामुळे, गुजरातच्या यशाची बक्षिसी म्हणून गुजरातचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. परंतु, दिल्लीच्या थंडीतही वातावरणाचा उच्चांक ज्या चर्चेने वाढविला आहे ती पाटील यांच्याशी संबंधित नसून भाजपाध्यक्ष जगतप्रकाश नड्डा आणि दिल्लीतील सातही खासदारांशी संबंधित आहे.
सध्या, नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या खासदार मिनाक्षी लेखी केंद्रीय मंत्रिमंडळात परराष्ट्र राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. पंतप्रधानांनी आपला तिसरा डोळा उघडला तर लेखी यांचं मंत्रिपद जाऊ शकते, अशी चर्चा रंगली आहे. तसं बघितलं तर, पंतप्रधान कार्यालयाकडून प्रदर्शनाच्या आधारावर मंत्र्यांचा रिपोर्ट कार्ड बनविले जात आहे. या विस्तारात अनेक मंत्र्यांची विकेट जाऊ शकते अशी चर्चा आहे. दिल्ली निवडणुकीचा निकाल बघितला तर उत्तर पूर्व दिल्लीचे खासदार आणि भोजपुरी चित्रपटातील हिरो मनोज तिवारी यांना मंत्रिपदाची बक्षिसी मिळू शकते. खरं सांगायचं म्हणजे, दिल्ली महानगर पालिकेत पंधरा वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. दिल्लीतील सर्व सात खासदार भाजपचेच आहेत. यानंतरही दिल्ली मनपा हातून जाणे हायकमांडला खटकलं आहे. भाजपच्या खासदारांना “आप’ला सत्तेत येण्यापासून रोखता आले नाही.
माजी केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या मतदारसंघात भाजपचे परफॉर्मन्स थोडे चांगले राहिले. यानंतर दुसरा नंबर लागतो तो मनोज तिवारी यांचा. मिनाक्षी लेखी यांच्या लोकसभा मतदारसंघात 25 जागा होत्या. यातील भाजपला फक्त पाच जागा मिळाल्या. यामुळे मनोज तिवारी यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात काय सुरू आहे? हे तर कुणालाही सांगता येणार नाही. परंतु, एखादं वाक्य ते असं बोलून जातात की त्यावरून राजकारणाचे वारे कोणत्या दिशेने वाहणार आहेत याचा एक अंदाज बांधला जाऊ शकतो. अलीकडेच, संसदेच्या एनेक्सीमध्ये भाजप खासदारांची बैठक बोलाविण्यात आली होती.
गुजरातच्या यशामुळे खासदारांनी सभागृह खचाखच भरला होता. संसदेच्या एनेक्सीमध्ये बैठक बोलाविली जाते तेव्हा बहुतांशवेळा पंतप्रधान समोरच्या दारातून प्रवेश करतात. ही बाब माहीत असल्यामुळे भाजपाध्यक्ष नड्डा पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी प्रवेश दारावर पुष्पहार घेऊन उभे होते. परंतु, नड्डा यांना अचानक सांगण्यात आलं की पंतप्रधान मागच्या दारातून प्रवेश करणार आहेत. नड्डा यांना समोरचं दार सोडून मागच्या दाराकडे धावत धावत जावं लागलं. पंतप्रधान आले. भाजपाध्यक्षांनी स्वागत केलं. गळ्यात पुष्पहार घातला. तर नड्डा यांच्याकडे बघून पंतप्रधान म्हणाले, “यह हिमाचल का हार पहना रहे हैं?’ नड्डा यांना सुचेनासं झालं. थोडं गोंधळल्यासारखे झालं. काही बोलतील एवढ्यातच पंतप्रधान पुढं निघून गेले. बैठक सुरू झाली. पंतप्रधानांनी या बैठकीत गुजरातचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांचं खूप कौतुक केलं. गुजरातच्या यशामुळे पंतप्रधान आणि गृहमंत्री गदगद झाले असले तरी काही गोष्टी त्यांना खटकल्या असल्याचीही चर्चा आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिल्लीला बोलाविण्यात आलं होतं. भाजपाध्यक्ष नड्डा यांच्या निवासस्थानी बैठक बोलाविण्यात आली होती. गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष आवर्जुन उपस्थित होते.
या बैठकीत नड्डा फार कमी बोललेत आणि राजनाथ सिंगसुद्धा गप्पच होते. बैठकीला सुरुवात झाली तर हायकमांडनं बोलता बोलता योगी आदित्यनाथ यांच्यावर आपली नाराजी व्यक्त करून टाकली. “भाजप नेहमीच संपूर्ण देशासमोर गुजरात मॉडलची चर्चा करीत आली आहे हे माहीत असताना तुम्हाला गुजरात निवडणुकीच्या प्रचारात यूपी मॉडलची चर्चा करण्याची काय गरज होती?’
उत्तरप्रदेशात अलीकडेच पोटनिवडणुका झाल्यात. दोन विधानसभा आणि एक लोकसभेसाठी. समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंग यादव यांच्या निधनामुळे मैनपुरी मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. मुख्यमंत्री योगी यांनी हायकमांडला शब्द दिला होता की, मैनपुरीमध्ये हार-जीतचे अंतर खूप कमी राहणार आहे. परंतु, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव या 2 लाख 88 हजार मतांनी निवडून आल्या. खतौली आणि रामपूरमधून भाजप जिंकत आहे, असेही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले होते. यातील रामपूरमध्ये भाजप जिंकली. पण खतौलीची जागा जयंत चौधरी यांच्या पक्षाने जिंकली. यामुळे भाजप हायकमांड योगी आदित्यनाथ यांच्यावर खूप नाराज असल्याचे यावेळी त्यांच्या निदर्शनात आणून देण्यात आले.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, भाजप हायकमांडनं योगी आदित्यनाथ यांना इशाराइशाऱ्यात याची जाणीव करून दिली की, उत्तरप्रदेशात भाजपला मिळालेला विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळाला आहे. शिवाय, योगी आदित्यनाथ यांना दिल्लीत कधीही बोलाविले जाऊ शकते. हायकमांड एवढ्यावरच थांबलेलं नाही तर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा परराष्ट्र दौरासुद्धा मध्यंतरी अडकून पडला आहे. शिकागो, लंडन आणि न्यूयॉर्क या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना जायचं होतं. मोठमोठ्या कंपन्यांनी यूपीत गुंतवणूक करावी यासाठी हा दौरा केला जात होता. मागील कितीतरी दिवसांपासून योगी यांचे सरकार या दौऱ्याची तयारी करीत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात जातात तेव्हा ज्याप्रकारे ते भारतीय समुदायाच्या लोकांची रॅली काढून त्यांना संबोधित करतात अगदी तसेच योगी हेही करणार होते. या बैठकीला जवळपास चार-पाच हजार अप्रवासी भारतीय उपस्थित राहतील अशी योजना आखली जात होती. परंतु, आता ऐकिवात येत आहे की, गृह मंत्रालयाने योगी यांच्या या परराष्ट्र दौऱ्याला परवानगी नाकारली आहे. शिवाय, पुढे-पुढे न करता पडद्यामागे राहून काम करायला शिकावं, असा सल्लाही देण्यात आला असल्याचे समजते.
दुसरीकडे, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर ज्या काही हिंसक घटना घडल्या त्यास आवर घालावा, असा स्पष्ट संदेश गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बसवराज बोम्मई यांना दिला असल्याचे समजते. कर्नाटकमध्ये पुढच्या वर्षी निवडणूक होणे आहे. यामुळे भाजपकडून डॅमेज कंटोल केले जात आहे. हिमाचलच्या निवडणुकीत भाजपला जबरदस्त फटका बसला आहे. आता भाजप ताक सुद्धा फुंकून फुंकून पित आहे. येथे लिंगायत समजाचे प्रमुख नेते बी. एस. येडियुरप्पा यांच्याशी भाजपचा पंगा सुरू आहे. हिमाचलसारख्या नाराजीची पुनरावृत्ती कर्नाटकमध्ये होऊ नये असे भाजपला वाटत आहे. माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी कोप्पल क्षेत्रातील एका निवडणूक सभेला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. नड्डा यांची ही सभा होती. मात्र, येडियुरप्पा यांनी उपस्थित राहण्यास स्पष्ट नकार दिला.
भाजपच्या एका मोठ्या नेत्याला त्यांची नाराजी दूर करण्याच्या कामाला लावले. त्यांनी खूप प्रयत्न सुद्धा केले. भेटीगाठी सुरू असतानाच कर्नाटकचे प्रभारी अरूण सिंग यांनी येडियुरप्पा यांची भेट घेतली. यानंतर बोम्मई दिल्लीला आले आणि एका मोठ्या नेत्याची भेट घेतली. यानंतर याच नेत्याने येडियुरप्पा यांची भेट घेतली. या भेटीत असं काही घडलं की येडियुरप्पा यांनी कोप्पलमधील सभेला हजर राहण्यास होकार दिला.