“जनसेवा हीच ईश्वरसेवा’ मानणारे संत गाडगेबाबा महाराज यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.
संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जाणोरकर असून त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील “शेणगाव’ या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव सखुबाई. पत्नी कुंताबाई, तर अलोका, मुदगल व कलावती ही त्यांच्या अपत्यांची नावे. गाडगेबाबांच्या लहानपणीच त्यांच्या वडिलांचे व्यसनाधीनतेमुळे निधन झाले होते. त्यामुळे गाडगेबाबांचे बालपण हे त्यांच्या मामांच्या घरी गेले होते. तेथेच ते शेतातील कामे करणे, अंगण स्वच्छ करणे, गोठा स्वच्छ करणे अशी कामे करत-करतच लहानाचे मोठे झाले. यातूनच त्यांना स्वच्छतेचे महत्त्व बालवयातच समजू लागलेले होते. पुढे 16व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. संसारात ते रममाण झाले. पण पुढे काही दिवसांतच आपल्या या देहातील कुडी जाण्याअगोदरच आपण काहीतरी चांगले काम करावे असे त्यांच्या मनाने ठरवले व त्यांनी घरदार सोडून भ्रमंतीला सुरुवात केली.
प्रवासाची त्यांना विलक्षण आवड होती. या भ्रमंतीत त्यांना विविध प्रकारचे लोक दिसू लागले. त्यामध्ये उपाशी, रोगी, गरीब, अडाणी, शिकलेले, व्यसनाच्या आहारी गेलेले, दुष्काळग्रस्त, मजूर, शेतकरी, नवस करणारे, शकून-अपशकून मानणारे, अज्ञानी, अंधश्रद्धाळू, देवभोळे असे विविध प्रकारचे लोक होते. तसेच सुशिक्षितांकडून अशिक्षितांचे होणारे शोषण, मानवाच्या मनातील श्रेष्ठ-कनिष्ठताही त्यांनी या भ्रमंतीदरम्यान जवळून पाहिली. या सगळ्यांमुळे डेबुजी मनातून दुखावले गेले. यातूनच या अशा दबलेल्या, पिचलेल्या, दीनदुबळ्या लोकांसाठी त्यांनी आपल्या समाजसेवेच्या कार्याला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी “कीर्तन’ हे प्रमुख माध्यम निवडले. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती करावयास प्रारंभ केला. यातून त्यांनी समाजातील ज्या अनिष्ट प्रथा-रुढी-परंपरा आहेत त्यांच्यावर प्रहार केले. लोकांच्या मनात असलेली अज्ञान, अस्वच्छतेची जळमटे त्यांनी या माध्यमातून स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कीर्तनातून माणुसकीची शिकवण दिली.
गाडगेबाबांची कीर्तन सांगण्याची पद्धतही वेगळी होती. ते उपस्थित श्रोत्यांनाही कीर्तन चालू असताना “गोपाला! गोपाला! देवकीनंदन गोपाला’ असे भजन म्हणावयास लावत. त्यामुळे श्रोते मंत्रमुग्ध होऊन जात असत. बाबांच्या कीर्तनाचा आस्वाद घेण्यासाठी लोक लांब-लांबून येत असत. या दूरवरून येणाऱ्या लोकांसाठी गाडगेबाबांच्या कीर्तनाची आताच्यासारखी कोणतीही जाहिरात किंवा प्रचार होत नसे तर गाडगेबाबांच्या कीर्तनाची गोडीच इतकी अविट होती की लोक ते ऐकण्यासाठी दूर-दूरवरून येत असत. यामध्ये महिला, पुरुष, शिकलेले, अडाणी अशा सर्व लोकसमूहाचा समावेश असे. “सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात तसे गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात,’ असे गाडगेबाबांच्या कीर्तनाविषयी ज्येष्ठ साहित्यिक प्र. के. अत्रे आपल्याला सांगतात. विविध देवदेवतांच्या नावाखाली पशुहत्या करू नका, दगड-धोंड्यांची पूजा-अर्चा करण्यात वेळ घालवू नका, नशापाणी करू नका, कुणीही हुंडा देऊ अथवा घेऊ नका, सण-समारंभांवर खर्च करण्यापेक्षा मुलांच्या शिक्षणावर तो खर्च करा, अशाप्रकारे ते कीर्तनातून लोकांना समजेल अशा भाषेत उपदेश करीत असत. त्यामुळे त्यांच्या कीर्तनाला अधिकाधिक लोक येत असत.
समाजातील अंधश्रद्धेविषयी गाडगेबाबांना प्रचंड चीड होती. भ्रमंतीदरम्यान ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आली होती. या अंधश्रद्धेची पाळेमुळे समूळ नष्ट करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचलेले दिसते. आजही एकविसाव्या शतकातील समाज अंधश्रद्धेची कास सोडायला तयार नाही. यात अशिक्षितांबरोबरच मूठभर लोक सोडले तर सुशिक्षित लोकसुद्धा याच रांगेत अजूनही उभे असल्याचे निदर्शनास येते ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.
गाडगे महाराजांच्या या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याविषयी रा. तु. भगत असे म्हणतात की, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रात बाबांनी डोंगराएवढे कार्य केले. खरे तर गाडगेबाबा म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाचे एक चालते-बोलते-फिरते विद्यापीठच होते. या विद्यापीठाला अनुदान नव्हते, सुट्टी नव्हती, रजा नव्हती, पगार नव्हता. आकाशाच्या छताखाली देशभर पसरलेले हे विद्यापीठ! “निष्काम सेवा’ हा या विद्यापीठाचा धर्म होता. “जनी जनार्दन’ हे या विद्यापीठाचे बोधवाक्य होते. माणुसकीच्या भावनेने ओथंबलेले गाडगेबाबा हेच या विद्यापीठाचे कुलगुरू होते. एकूणच अंधश्रद्धेला फाटा देऊन समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करणे हाच संत गाडगेबाबांच्या कार्याचा खरा उद्देश होता.
गरिबांच्या उद्धारासाठीही गाडगेबाबांनी आपले आयुष्य वेचले. गरिबांच्या हितासाठी त्यांनी वर्गणी गोळा करून ती सत्कारणी लावली. धर्मशाळा, सदावर्ते, घाट, विद्यार्थ्यांकरिता, आदिवासींकरिता, मागासवर्गीयांसाठी, शाळा-वसतिगृहे यांसाठी ती खर्च केली. स्वतःसाठी त्यांनी एक पैसाही खर्च केला नाही. गाडगेबाबांना “बाबा, तुम्ही इतके रुपये जमविले. तुमची इस्टेट किती?’ असा प्रश्न विचारला असता त्यांच्या या प्रश्नावर गाडगेबाबा आपल्या हातातील काठी व गाडगे दाखवून “हीच माझी संपत्ती’ असे म्हणतात. गाडगेबाबांचे गरिबांविषयीचे कार्य पाहून त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “गरिबांचा कैवारी’ असे संबोधले आहे. अशाप्रकारे काम कोणतेही असो ते मनापासून करणारे, शिस्त, संयम, नम्रता असे विविध गुण अंगी बाळगणारे थोर संत गाडगे महाराज यांना आजच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.