भारतातील वृत्तपत्रांचा मार्ग आपल्याला 19व्या शतकात घेऊन जातो. वृत्तपत्रांनी सक्रिय सामाजिक आणि राजकीय भूमिका बजावण्यास सुरुवात केली. कारण त्यांनी जनआंदोलनाच्या आवाजाला आकार दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महान विचारवंत, लेखक, वक्ता, तत्त्वज्ञानी, विद्वान, न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, अस्पृश्य, स्त्रिया यांच्या हक्कांसाठी आवाज उठविणारे होते. ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, त्याचबरोबर उच्च दर्जाचे पत्रकार होते. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेच्या कार्याची माहिती समजून घेणे आवश्यक आहे.
समाजात प्रबोधनातून बदल घडवून आणता येऊ शकतो, यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ठाम विश्वास होता. त्या प्रबोधनासाठी त्यांनी पत्रकारितेचा मार्ग अवलंबिला. त्यासाठी त्यांनी वृत्तपत्रीय कार्य सुरू केले. त्यांची पत्रकारिता ही न्यायाची पाठराखण करणारी होती; आजच्यासारखी न्यायाधीशाच्या भूमिकेत जाऊन सनसनाटी निर्माण करणारी नव्हती. राष्ट्र, समाज यांच्या उन्नतीची आणि हिताची बाजू घेऊन त्यांनी पत्रकारिता केली.
त्यासंदर्भात बाबासाहेबांची पत्रकारिता’ हे पुस्तकशिल्प लेखक विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी साकारले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पत्रकारितेतील योगदानाचा विचार करून त्यावर लेखकाने त्यांचा प्रवास अत्यंत नेमकेपणाने शब्दबद्ध केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता आणि त्यांची चळवळ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्याचप्रमाणे त्या एकमेकांना पूरक देखील आहेत. या दोन्हींही गोष्टींना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कशा पद्धतीने न्याय दिला या संदर्भातील विषयांचा ऊहापोह लेखकाने या पुस्तकात केला आहे.
बाबासाहेब यांचे प्रत्येक घटनेशी संबंधित निरीक्षण आजही आपल्या समाजाला लागू आहे. सामाजिक आणि राजकीय सुधारणांसंबंधीची सरकारी धोरणे आणि राजकीय पक्षांच्या भूमिका या संदर्भात त्यांची जोरकस भाष्य या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यांच्या विचारांचा मुक्त प्रवाह पाहण्याची संधी त्यांच्या पत्रकारी लेखनातून आपल्याला पाहायला मिळते. ते अतिशय सखोल निबंधकार आणि तात्त्विकदृष्ट्या सक्षम विचारवंत होते. त्यांनी काढलेल्या नियतकालिकांच्या आवरणावर दलितांच्या स्वातंत्र्याची आणि त्यांच्या जीवनानुभवांची छायाचित्र छापलेली असत. केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर प्रत्येक पत्रकाराने अत्यंत अभ्यासपूर्वक बाबासाहेबांचे पत्रकारितेतील विचार, वर्तन आणि व्यवहार समजून घ्यावे.
या पुस्तकात अनेक विषयांना संदर्भासहित स्पर्श केला आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ, रचना, आतील पानांची मांडणी, एकूणच सजावट तसेच छपाई अतिशय विलोभनीय झाली आहे. मर्यादित पृष्ठसंख्येत सचित्र मजकूर असल्यामुळे पुस्तक अधिकच आकर्षक झाले आहे.