पिकतं तिथे विकत नाही, ही म्हण सर्वांनाच माहीत आहे; पण पिकतं तिथे का विकत नाही? या प्रश्नाला ठराविक असं एकच उत्तर नाही. एकतर ज्या ठिकाणी जे पिकतं, तिथं त्याची किंमत होणं शक्यच नसतं. परंतु विपुलता, प्रचूरता या एकाच कारणामुळे ही परिस्थिती उद्भवते असं नाही. काही ठिकाणी जिथं पिकतं, तिथंच ते घातक असल्याची जाणीवसुद्धा पिकते. ही जाणीव पिकवणाऱ्यालाच सर्वांत तीव्रतेनं होत असते.
आजच्या बाजाराभिमुख जगात बाजारातल्या गरजेप्रमाणं वस्तूंची आणि सेवांची निर्मिती होणं थांबलंय. त्याऐवजी जी वस्तू किंवा सेवा आपल्याकडे उपलब्ध आहे तीच संपूर्ण जगाला कशी आवश्यक आहे, हे ठसवून देण्याचा प्रयत्न सातत्यानं होत असतो. वस्तू आणि सेवांवर मिळणारा नफाही उत्पादनखर्चाच्या कित्येक पटींनी अधिक असतो आणि ही “वरकड’ वापरून प्रचंड जाहिरातबाजी केली जाते. कालांतरानं हीच एकमेव वस्तू किंवा सेवा आपली नाव किनाऱ्याला लावू शकते, इतपत आभास ग्राहकांच्या मनात निर्माण करण्यात महाकाय कंपन्या यशस्वी होतात.
नवतंत्रज्ञान विशेषतः कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ही अशीच जगाच्या “गळ्यात मारलेली’ सेवा ठरलीय. महाकाय टेक कंपन्यांनी सोशल मीडियाचे आपापले मंच उभारून या मंचांशिवाय तरणोपाय नाही, अशी हाकाटी पिटण्यात यशस्वी ठरल्या. या मंचांपासून दूर राहिला तो जणू “जिवंत असून मेलेला’… अशी मानसिकता समाजात वाढतच गेली.
याचं अगदी स्पष्ट प्रतिबिंब आपल्याला मनोरंजन क्षेत्रात उमटलेलं दिसून येतं. एखाद्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला काम देताना त्याचं सोशल मीडियावरचं फॅन फॉलोइंग किती आहे, याचा विचार त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक होतो, अशा तक्रारी खुद्द कलावंतांनीच केल्यात. केवळ याच एका क्षेत्रात नव्हे तर अनेक ठिकाणी वास्तवातल्या वाटचालीपेक्षा ही आभासी वाटचाल महत्त्वाची ठरू लागली. पण… खुद्द हे आभासी विश्व “पिकवणाऱ्या’ मंडळींच्या घरातच हा विचार “विकत’ नाही, हे दिसून आलंय.
मेटावर्स अर्थात फेसबुक या सर्वांत विस्तृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे मालक मार्क झुकेरबर्ग यांच्या बहिणीनं अर्थात रॅंडी झुकेरबर्गनं “मुलांना आभासी विश्वापासून दूर ठेवा,’ असा सल्ला दिलाय. तिच्या मते, मुलांचं संगोपन वास्तव जगात व्हायला पाहिजे; आभासी जगात नव्हे. त्यामुळे त्यांना मोबाइल आणि लॅपटॉपपासून शक्य तितकं दूर ठेवा.
रॅंडी यांना एक मुलगा आणि दोन मुली अशी तीन अपत्यं आहेत. आपली मुलं जास्त वेळ स्क्रीनसमोर असणार नाहीत, याची त्या विशेषत्वानं काळजी घेतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, तंत्रज्ञान क्षेत्रातले व्यावसायिकसुद्धा मुलांना टेक गॅजेट्सपासून दूर ठेवावं, याच मताचे आहेत. थोडक्यात, तंत्रज्ञान विकणारे स्वतःच्या पोरांना मात्र त्यापासून चार हात दूरच ठेवतायत.
हा एक स्पष्ट संदेश आहे. आमचा एक वाइन शॉपवाला मित्र अनेक वर्षांपूर्वी आम्हाला सांगायचा, “विकणाऱ्यानं पिता कामा नये.’ हीच गोष्ट आज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या जगात जशीच्या तशी लागू होताना दिसतेय. उत्तमोत्तम गॅजेट्स वापरणं (आणि मुख्य म्हणजे ठराविक काळानंतर ती बदलणं) हा स्टेटस सिम्बल मानणाऱ्यांना रॅंडी झुकेरबर्ग जे सांगतायत ते कळणं जरा अवघडच आहे; परंतु भविष्यात वास्तव विश्वाचं सर्वाधिक वाटोळं आभासी जगाकडूनच होणारंय.