घटनेच्या मूलभूत रचनेचे उल्लंघन
नवी दिल्ली, दि. 28 – पंतप्रधान व लोकसभेचे सभापती यांच्या निवडणुकांना न्यायालयात आव्हान न देण्याची तरतूद असलेली 39 वी घटनादुरुस्ती म्हणजे घटनेच्या मूलभूत रचनेचे उल्लंघन आहे. न्यायसंस्थेचा अधिकार हिरावून विधिमंडळाने आपल्या सत्तेचा एकतर्फी वापर केला आहे, असे प्रतिपादन शांतिभूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात केले.
केशवानंद भारती खटल्यात बहुमताने देण्यात आलेल्या निकालात म्हटले आहे की, 368 व्या कलमानुसार संसदेला घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार असला, तरी घटनेची मूलभूत अंगे बदलतील अशी ती दुरुस्ती असता कामा नये. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांच्याकडील अधिकार संसदेला रद्द करता येणार नाही व तो अधिकार स्वतःकडे घेता येणार नाही.
ग्वाल्हेरच्या राजवाड्यात अगणित संपत्ती
नवी दिल्ली – ग्वाल्हेर येथे माजी संस्थानिक विजयाराजे शिंदे यांच्या राजवाड्यात प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी घातलेल्या धाडीत चांदी व चांदीच्या वस्तू 53 क्विंटल वजनाच्या सापडल्या. त्यांची किंमत अंदाजे 53 लाख रुपये आहे. तेथे सापडलेल्या जवाहिरांपैकी 40 टक्के जवाहिरांची किंमत 35 लाख रुपये असल्याचे दिसून आले.