– हिमांशू
आपला समाज कीर्तनाने कधी सुधारला नाही आणि तमाशाने कधी बिघडला नाही, असं म्हणतात. ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे. शहाणपण देणारी व्यवस्था आपल्या समाजात लोणच्यासारखी मुरलीय.
अगदी कौटुंबिक स्तरावरसुद्धा लहानपणापासून आपल्याला अनेक चांगल्या सवयी कधी नकळत तर कधी ठोकून-ठाकून लावल्या जातात. त्याला आपण “वळण लावणे’ म्हणतो. अर्थात, हा वर्तमानकाळ मानावा की भूतकाळ हा वादाचा मुद्दा आहेच; पण कुटुंबाप्रमाणंच समाजातसुद्धा खस्ता खाऊन प्रबोधनाच्या चळवळी चालवणारी माणसं प्रत्येक पिढीत जन्मली आहेत.
प्रश्न एवढाच, की समाज त्यांचं म्हणणं किती मनावर घेतो? आता हेच पाहा ना, मास्क वापरल्यामुळे करोनाचा धोका टळतो ही माहिती ज्यांच्यापर्यंत पोहोचलीच नाही, अशी किती माणसं असतील? गर्दी करून धोक्याला आमंत्रण देण्यापेक्षा काही दिवस एकमेकांपासून दूर राहणं हितावह आहे हे ज्यांना माहीतच नाही, अशी किती माणसं असतील? एखाद्या व्यक्तीला सध्याच्या जागतिक साथरोगाची जराही माहिती नाही, असं असूच शकत नाही. कारण एकतर हा जीवघेणा विषाणू आपल्या समाजात शिरून सव्वा वर्ष उलटून गेलंय आणि दुसरं म्हणजे, साथरोगाचे चटके बहुसंख्यांच्या थेट पोटापर्यंत पोहोचलेत. “कुटुंब जगवायचं असेल तर बाहेर पडायलाच हवं,’ या वास्तवाप्रमाणंच “जिवंत घरी यायचं असेल तर मास्क वापरायलाच हवा,’ हेही वास्तव कळायला हरकत नसावी.
दुसरी लाट ओसरली असली, तरी तिसऱ्या लाटेचा आणि मुख्यत्वे डेल्टा प्लस विषाणूचा मुकाबला आपल्याला करायचा आहे आणि निर्बंध शिथिल झाले असले तरी नियम पाळावेच लागणार आहेत. परंतु लाट अत्युच्च बिंदूवर असताना रुग्णालयातल्या खाटा, औषधं आणि ऑक्सिजन मिळवण्यासाठी झालेली धावपळ लाट ओसरताच विस्मृतीत जाते आणि आपण बेफिकीर होतो, असाच अनुभव आहे. या पार्श्वभूमीवर, उद्योगपती हर्ष गोएंका यांनी शेअर केलेला व्हिडिओ आणि त्याहूनही अधिक त्यावर आलेल्या कमेन्ट्स महत्त्वाच्या ठरतात. बहुधा जपानमध्ये चित्रित झालेल्या या व्हिडिओत रोबोटिक्स तंत्रज्ञानावर आधारित एक मशीन दिसून येतं.
रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या या मशीनच्या शीर्षभागी एक फिरतं चक्र दिसतंय. येणाऱ्या-जाणाऱ्याकडे हे मशीन मान वळवून पाहतंय. त्याच्यासमोरून जाणाऱ्या व्यक्तीने मास्क परिधान केलेला असेल तर ते मशीन त्याला जाऊ देतं. परंतु मास्क न घालता कुणी मशीनच्या समोरून गेला, तर त्याच्या डोक्यात या मशीनचा दणका बसतो. अशा मशीन भारतात जागोजागी बसवल्या पाहिजेत, असं मत गोएंका यांनी मांडलंय. परंतु आपल्याकडे असं मशीन बसवलं तर तेही कंटाळेल किंवा बंद पडेल; पण दणके खाऊनसुद्धा लोक मास्क वापरणार नाहीत, अशाच कमेन्ट्स जास्त आल्यात.
एका पठ्ठ्यानं तर हे मशीन सर्वप्रथम संसदेच्या प्रवेशद्वाराशी बसवावं अशीही खवचट कमेन्ट टाकलीय. काहीजणांना ही शिक्षा जरा जास्तच “कठोर’ वाटतेय. परंतु सध्या तरी आपल्याकडे विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जातेय आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर उत्पन्न घटलेल्या लोकांना आर्थिक झटका इतर कोणत्याही शिक्षेपेक्षा अधिक “कठोर’ वाटत असेल, हेच अपेक्षित आहे. मात्र, तरीही लोक मोठ्या संख्येने विनामास्क वावरत असतील, तर काही चौकांमधून अशी “दणका मशीन्स’ बसवलेलीच बरी!