भारतात दुष्काळ नाही फक्त “तीव्र अन्न टंचाई’ आहे!
व्हॅनकुव्हॅर, ता. 24 – पंतप्रधान इंदिरा गांधींनी येथे पत्रकार मुलाखतीत असा खुलासा केला की, भारतात दुष्काळ नाही तर तेथे तीव्र अन्नटंचाई आहे. यामुळे देशाला थोड्याशा कठीण परिस्थितीतून जावे लागत आहे. परदेशात भारतातील अन्नपरिस्थितीबाबत वारंवार अतिरंजित बातम्या प्रसृत केल्या जातात म्हणून हा खुलासा मी करीत आहे. इंदिरा गांधी पुढे म्हणाल्या, असे असूनही भारताने कमीतकमी धान्य आयात करून अन्न टंचाईची परिस्थिती बऱ्यापैकी हाताळली आहे.
साडेअकरा कोटी टन धान्योत्पादनाचे उद्दिष्ट
नवी दिल्ली – भारताच्या शेतकी खात्याने चालू सालासाठी साडेअकरा कोटी टन धान्याचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवले आहे.
पाकिस्तानच्या उत्तरावर सर्वकाही अवलंबून
नवी दिल्ली – भारताचे परराष्ट्रमंत्री सरदार स्वर्णसिंग यांनी असे सांगितले की, भारत पाकिस्तान बरोबर वाटाघाटी करण्यास उत्सुक आहे परंतु पाकिस्तानकडून येणाऱ्या उत्तराची भारत वाट पाहात आहे. मगच या बैठकीसंबंधी काही निश्चित सांगणे शक्य होईल. पाकिस्तानची भूमिका काय आहे ते त्यांच्या उत्तरावरून आम्ही अजमावू. भारत-पाकिस्तान वाटाघाटीमुळे भारत बांगला देश संयुक्त प्रस्तावातील योजना अमलात आणण्यास साहाय्य होईल.
इटालियन सुंदरीची “मिस युरोप’ म्हणून निवड
बार्सिलोना – युरोप देशातील सुंदरीची निवड स्पर्धा “युरोप सुंदरी’साठी येथे घेण्यात आली. तेव्हा इटलीची डायना स्कापोलान हिची निवड करण्यात आली. ही सुंदरी 18 वर्षांची असून ती इटलीमधील टेलिव्हिजन केंद्रावर काम करते. ती अतिशय लोकप्रिय आहे.