जागतिक मंदीचे चटके आता हळूहळू का होईना; पण जाणवायला लागले आहे. याचा प्रभाव भारतावरही दिसून येईल. त्यामुळे अगोदरच सरकार स्तरावर आणि वैयक्तिक स्तरावर देखील आर्थिक उपाययोजना करणे आवश्यक ठरतात.
मराठीमध्ये कधी कधी म्हणतात की, “माझ्यावर संक्रांत आली, संक्रांत बसली’ म्हणजेच मनुष्यावर अडचण आली किंवा संकट आलं. या गोष्टीला संक्रांत येणे असेही म्हणतात. त्या अनुषंगाने आजही जागतिक आर्थिक घोडदौडीवर मंदीची संक्रांत येऊन बसलेली आहे.
जगभरात सर्वत्र मंदीची लाट येण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केलेली आहे. डॉ. नौरेल रुबीनी यांनी 2023 हे मंदीचे वर्ष राहील, असे भाकीत केले आहे. या अगोदर 2008 मध्ये त्यांचे मंदीचे भाकीत अचूक व खरे ठरले होते, हे विशेष. 2023 मध्ये आर्थिक, वित्तीय त्याचबरोबर कर्ज या तिहेरी संकटात जग सापडणार आहे, असे वाटते. खरे तर या मंदीचे मुख्य कारण म्हणजे अंगापेक्षा बोंगा जास्त, याप्रमाणे सार्वजनिक व खासगी क्षेत्रात मुबलकपणे वित्तीय संस्थेने केलेले कर्ज वाटप हे सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्यस्त प्रमाणात केले गेले आहे.
मराठीत म्हणतात ना, व्याजाला झोप नसते त्याप्रमाणे हा कर्जाचा डोंगर वाढत चालला आणि या कर्जाचा उपयोग निर्वादपणे उत्पादन व त्याचबरोबर व्यवसायातील वाढ यामध्ये करण्यात येत नाही. पण ग्राहकांच्या गरजा, आवश्यकता व किमतीचे मूल्यमापन न करता सुमारपणे जगामध्ये उत्पन्न, तंत्रज्ञान व सुविधा वाढतच गेल्या. पण आज जागतिक स्तरावर वेगवेगळ्या कारणांनी नागरिकांची क्रयशक्ती घटत गेली. पर्यायाने अलगदपणे आज जग मंदीच्या कचाट्यात सापडत आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेसुद्धा जगभरात मंदीचे संकट गडद होण्याची शक्यता वर्तवली आहे. सलग दोन ते तीन तिमाहीमध्ये विकासदर कमी होणे, उत्पादन क्षमता कमी होऊन वस्तूला मागणी न राहणे, समग्र उत्पादन, रोजगार दर यामध्येसुद्धा विकास खुंटला जातो. अर्थचक्रानुसार दर आठ-दहा वर्षांनी मंदी अपेक्षितच आहे; पण ह्यावर्षी येणारी मंदी ही काहीतरी वेगळे दृश्यमानता; आर्थिक भविष्य वर्तवते. कारण अनेक देशाला अन्न, ऊर्जा यांचे मोठे संकट भासणार आहे. त्याचबरोबर कर्जाचा वाढता डोंगर याची परतफेड करताना अनेक वित्तीय संस्था देशोधडीला लागतील, हे मात्र निश्चितच आहे. या काळामध्ये बेकारीमुळे लोकांची क्रयशक्ती कमी होत जाऊन अनेक राष्ट्रे आपत्तीमध्ये ओढली जात आहेत. अमेरिकेसारख्या अनेक देशांमध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये ग्राहकांअभावी प्रचंड गुंतवणूक पडून आहे.
जगातील बहुसंख्य देश संकटात असताना भारताला मंदीचा प्रादुर्भाव कमी बसत आहे. कारण मध्यमवर्गीयांची क्रयशक्ती चांगली आहे. मध्यमवर्गीय ग्राहकांची मागणी वाढत आहे. त्याचबरोबर भारतीय नागरिकांची क्रयशक्ती जागतिक तिसऱ्या क्रमांकावर आहे, हे विशेष. संशोधन व तंत्रज्ञानाद्वारे फक्त भांडवली चैनीच्या व उपभोग्य सुखद गोष्टींचा चंगळवाद जगभर फोफावला आहे. मुक्त व्यापारामुळे सरकारी उद्योग दिवाळखोरीत निघाले. त्यातच खासगीकरणाचा रेटा जास्त झाल्यामुळे गळे कापू स्पर्धा व्यावसायिकांमध्ये निर्माण झाली. त्याचे रूपांतर थकीत कर्जामध्ये झाले. याचे सर्व परिणाम म्हणजे सूक्ष्म, लघु व कुटिरोद्योग हे देशोधडीला लागले.
आयात-निर्यात, जलद दळणवळण यामुळे जागतिक बाजारपेठ एकमेकांच्या देशावर अवलंबून आहे. म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका हा देश जर मंदीच्या चपाट्यात आला, तर त्याचा प्रादुर्भाव जगभर जाणवतो. अशा परिस्थितीमध्ये तो प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरकारने खर्चावर अंकुश लावून आवश्यक त्या योजना राबवणे गरजेचे ठरते.सामान्याच्या मूलभूत सेवा सुविधांकडे लक्ष द्यावे. मंदीची झळ आपल्यापर्यंत निश्चितच येईल. आपणही आपले आर्थिक नियोजन, आर्थिक आराखडा हा तयार ठेवणे गरजेचे आहे. आपल्याला जरूर कशाची आहे, याचे भान ठेवावे आणि आगामी आयुष्यातील एका वळणावर आलेल्या मोठ मोठ्या खर्चास सध्या तरी फाटा देणे आवश्यक वाटते. गरजा व खर्च याचे मूल्यमापन करून; आखणी करूनच सावधपणे आपण आपला खर्च करावा. पुढील काळामध्ये ही आर्थिक अनिश्चितता जगभरात राहील यामध्ये शंका नाही.
पैसा सगळ्या अडचणी व संकटे दूर करू शकत नाही; पण एवढे निश्चित आहे, तुमच्या पैशासंबंधीच्या अडचणी आणि पैशामुळे येणारी संकटे निश्चित दूर करू शकतो. याचे भान ठेवूनच आपण अर्थज्ञानाने मंदीचा सामना करावा.