“बचेंगे तो और भी लढेंगे’ या उद्गारामुळे प्रसिद्ध झालेले सेनापती दत्ताजी शिंदे यांचे आज पुण्यस्मरण. शिंदे घराणे मूळचे सातारा जिल्ह्यातील कन्हेरखेडचे पाटील. शिंदे घराण्याने उत्तर हिंदुस्थानात जम बसविणारे राणोजी, दत्ताजी, जनकोजी, जयाप्पा यांसारखे वीरपुरुष मराठा साम्राज्याला दिले.
दत्ताजी शिंदे हे राणोजी शिंदेंचे दुसरे पुत्र तसेच महादजी शिंदे यांचे सावत्र बंधू, तर जयाप्पा शिंदे त्यांचे सख्खे थोरले बंधू होत. जयाप्पा यांचे निधन झाल्यावर शिंदे घराण्याची सरदारकी जयाप्पाचा पुत्र जनकोजी यांना मिळाली. परंतु जनकोजी लहान होते म्हणून दत्ताजीच कारभार पाहात असत. या सर्वांनी उत्तर हिंदुस्थानातील पुष्कळ प्रांत मराठा साम्राज्यात समाविष्ट केले. वर्ष 1751 मधे निजामाबरोबरच्या कुकडीच्या लढाईत ज्या अकरा मराठी शूरवीरांनी निजामाच्या हत्तीवर चाल करून त्याची अंबारी खाली पाडली त्यामध्ये दत्ताजी शिंदे होते. नंतर पुन्हा वर्ष 1757 मध्ये निजामाने डिवचल्यामुळे पेशव्यांनी दत्ताजीस मुख्य सेनापती म्हणून निजामावर पाठविले. या लढाईत त्यांनी शिंदखेड येथे निजामाला गाठून त्याचा पूर्ण मोड केला व पंचवीस लक्षांचा प्रांत व नळदुर्ग किल्ला मिळविला.
माळव्यात आल्यावर दत्ताजींनी अनेक राजपूत दिल्लीच्या आसपासच्या संस्थानिकांना अंकित केले व मराठा साम्राज्यास जोडले तसेच मराठी साम्राज्याची अनेक कर्जेही फेडली. दत्ताजींनी उज्जैन येथे सैन्याची जमवाजमव करून हरगडचा मोगल शासक गुमानसिंग याचा पराभव केला. वर्ष 1755 मध्ये जयाप्पा यांचे सोबत दत्ताजी जोधपूरचा परागंदा राजपुत्र रामसिंग याला मदत करण्यासाठी गेले असता बिजयसिंग यांच्याबरोबर झालेल्या लढाईत शिंद्यांनी बिजयसिंगाला घेरले त्याचे साथीदार राजपूतराजे पळून गेले.
बिजयसिंगाने एकीकडे तहाचा प्रस्ताव ठेवत कपटाने जयाप्पाचा खून केला. बिजयसिंगाचा सूड घेण्यासाठी दत्ताजींनी मोहीम आखली व त्यासाठी दिल्लीतील अटक, फतेलष्कर व किल्ला कुशाद अशा तीन नामांकित तोफा दत्ताजींनी मुघल सेनापती गाजीउद्दीन खानाकडे मागितल्या. या तोफा दिल्लीतून नेऊ नयेत, अशी गाजीउद्दीनची इच्छा होती. बिजयसिंगाचा पाडाव करण्यासाठी दत्ताजी एकच मोठी तोफ सोबत घेऊन मार्च 1759 मध्ये गेले. तोफ उज्जैनला पाठवत असताना चंबळ नदीत अडकून पडली व मोहीम अर्धवट राहिली.
त्यानंतर दत्ताजी लाहोर प्रांताची व्यवस्था लावण्यासाठी गेले आणि व्यवस्था करून यमुनातीरी आले. त्यांनी यमुनेच्या काठावर मजनूचा टिळा येथे मुक्काम ठोकला; परंतु उत्तरेतील मराठ्यांचे वर्चस्व न मानून नजीबखान रोहिला दुटप्पी राजकारण करत होता. त्याने अफगाण शासक अब्दाली यास पत्र पाठवून हिंदुस्थानावर मराठ्यांच्या समाचारासाठी बोलवले. दुसरीकडे दत्ताजी यांना गंगेवर भूलथापा देऊन शुक्रताल परिसरात गुंतवून ठेवले. मात्र, नजीबाचे कपट लक्षात येताच दत्ताजी नजीबावर चालून गेले. यावेळी झालेल्या लढाईमध्ये हणमंतराव शिंदे व त्यांचे पुत्र मृत्युमुखी पडले.
याच वेळी दत्ताजींना अब्दाली कुरुक्षेत्रावर आल्याची बातमी मिळाली. ते स्वत: फौज घेऊन अब्दालीच्या रोखाने निघाले. पण त्यापूर्वीच नजीबखान अब्दालीस यमुनापार येऊन मिळाला. तेव्हा दत्ताजींनी दिल्लीजवळ यमुनेच्या आठ मैलापर्यंतचे सर्व उतार अडवून धरले. तरीही 10 जानेवारी 1760 रोजी अब्दालीच्या सैन्याने चार ठिकाणी यमुना ओलांडली. यमुना नदीच्या काठावर बुराडी घाटात साबाजी शिंदे व नजीबखानात लढाई झाली. दत्ताजी शिंदे यांना ही वार्ता कळताच ते सहाय्याला धावून आले.
दत्ताजींनी नजीबच्या सैन्याला बेटापलीकडे रेटत नेले. यावेळी जानराव वाबळे व बायाजी शिंदे बुराडी घाटावर धावले. मात्र, एक गोळी लागून बायाजी पडले. यावेळी नदीतील शेरणीच्या बेटातून शत्रूसैन्याने गोळीबार केला. हे वृत्त कळताच दत्ताजी घोड्यावर बसून बुरांडी घाटावर निघाले. तेवढ्यात घाटावर झाडीत दडून बसलेल्या अफगाण सैन्याने तोफा, बंदुकांचा मारा सुरू केला.
दत्ताजी घोड्यावर बसून लढत असताना एक गोळी लागून ते खाली पडले. रोहिल्यांच्या सेनेतील कुतुबशहाने विचारले की, “क्यो, लढोगे क्या?’ त्यावर दत्ताजी उद्गारले, “बचेंगे तो और भी लढेंगें.’ प्रखर झुंज देऊन 17 जानेवारी 1760 रोजी मराठ्यांचा पालखीचा गोंडा (सेनानायक) धारातीर्थी पडला.