नाटकांत सामाजिक बदलाचे दर्शन घडावे
नवी दिल्ली, दि. 4 – भारतीय नाटकांमध्ये देशात घडणाऱ्या सामाजिक, आर्थिक बदलाचे दर्शन घडण्याची जरूरी आहे, यावर परराष्ट्रमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी भर दिला. येथे 57व्या मराठी नाट्यसंमेलनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. आपण भूतकाळाविषयी फार विचार करू नये; तर वर्तमानकाळ व भविष्यकाळ याविषयी विचार करावा.
भारतीय रंगभूमी जगातील इतर देशातील रंगभूमीइतकीच विकसित झालेली आहे. तथापि तांत्रिक प्रगती व साधनसंपत्ती याचीच उणीव आहे. तथापि इतर देशातील सामाजिक जीवनापेक्षा आपल्या देशातील जीवन वेगळे आहे. याचा आपण विसर पडू देता कामा नये, असेही त्यांनी म्हटले.
…तरच रंगभूमीला तेजस्विता येईल
नवी दिल्ली – संसारातल्या निर्घृण वास्तवतेचे नग्न, क्रूर दर्शन घडविणाऱ्या किंवा केवळ हटाकृष्ट स्वरूपाच्या समस्यांचे चित्रण करणाऱ्या, अथवा रंजनात्मक थिल्लरपणा असणाऱ्या नाटकांनी मराठी रंगभूमीला तेजस्विता, संपन्नता, महात्मता खऱ्या अर्थाने प्राप्त होणार नाही, असा इशारा 57व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष दाजी भाटवडेकर यांनी दिला.
मराठी रंगभूमीला आशय आणि आविष्कार यांचा विवेकपूर्ण लग्नबंध साधणाऱ्या थोर नाटकांचीच सतत गरज भासणार आहे. केवळ चुटकदार संवाद, सुबक उत्तेजक वेषभूषा, प्रसाधना नेत्रदीपक चमत्कृतीपूर्ण घटना यामुळे रंगभूमीला प्रचंड आंतरिक प्रेरक शक्तीला मोकळा वाव मिळणार नाही.