राष्ट्रीय कॉंग्रेसचे एक संस्थापक, वकील, प्रशासक, फिरोझशहा मेहता यांचा आज स्मृतिदिन. (जन्म 4 ऑगस्ट 1845 – निधन 5 नोव्हेंबर 1915). फिरोझशहांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे वडील कलकत्त्याला (आताचे कोलकाता) व्यापार करायचे. त्यासाठी ते मुंबईत अधूनमधून राहात असत. त्यांचे सर्व शिक्षण मुंबई येथे झाले.
एल्फिन्स्टन कॉलेजमधून एमए पदवी प्राप्त करून ते इंग्लंडला बॅरिस्टर होण्यासाठी गेले. तेथे चार वर्षांच्या वास्तव्यात ते दादाभाई नौरोजींच्या संपर्कात आले, त्यांच्या विचारांचा फिरोझशहांवर प्रभाव पडला. बॅरिस्टर झाल्यावर ते 1868 मध्ये भारतात आले आणि मुंबई येथे त्यांनी वकिली सुरू केली. त्यांनी वर्ष 1869 मध्ये दादाभाईंच्या “ईस्ट इंडिया असोसिएशन’ची शाखा म्हणून “बॉम्बे असोसिएशन’ या नावाने मुंबईत सुरू केली. ब्रिटिश लोकांच्या सर्व क्षेत्रातील मक्तेदारीविरुद्ध त्यांनी प्रभावी प्रचार केला. त्यावेळी सुरतच्या आंदोलनातून झालेल्या दंगल केसमध्ये आरोपींच्या बाजूने वकीलपत्र घेऊन आपले कर्तृत्व सिद्ध केले व कीर्ती मिळविली. असे अनेक प्रश्न हाती घेऊन त्यांनी वकिलीबरोबर राष्ट्रीय जागृतीचेही कार्य केले.
वर्ष 1872 च्या मुंबई नागरी कायद्यावर फिरोझशहांच्या सूचनांचा प्रभाव होता, त्यामुळे त्यांना मुंबईतील “नागरी शासनाचे जनक’ असे सार्थ नाव मिळाले. त्यामुळे त्यांना वर्ष 1873 मध्ये आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले. 1878 ते 1880 या वर्षांत वृत्तपत्रांची गळचेपी करणारा “व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट’ आणि ब्रिटिश कापडाला हुकमी बाजारपेठ चालू राहावी, यासाठी आयातकरातून देण्यात आलेली सूट, या दोन प्रमुख प्रश्नांवर त्यांनी सनदशीर मार्गांनी प्रयत्न केले. इल्बर्ट बिलाला पाठिंबा देण्यासाठी फिरोझशहा आदी राष्ट्रवाद्यांनी गोऱ्यांविरुद्ध आंदोलन उभारले. वर्ष 1884 मध्ये फिरोझशहांची मुंबई महानगरपालिकेच्या अध्यक्षपदी निवड झाली, या पदावर 1905 मध्ये त्यांची फेरनिवड झाली.
दरम्यान वर्ष 1885 मध्ये “बॉम्बे असोसिएशन’चे “बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन’मध्ये रूपांतर झाले, त्यावेळी तिचे फिरोझशहा, न्यायमूर्ती तेलंग आणि दिनशा वाच्छा हे पहिले सरचिटणीस झाले. याच वर्षी मुंबईस भरलेल्या पहिल्या कॉंग्रेस अधिवेशनात फिरोझशहा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लक्षणीय काम केले. त्यांची राष्ट्रीय नेत्यांमध्ये गणना होऊ लागली.
वर्ष 1890 मध्ये कॉंग्रेसच्या सहाव्या अधिवेशनासाठी फिरोझशहा मेहतांची अध्यक्षपदी निवड झाली. वर्ष 1886 मध्ये मुंबईच्या कायदेमंडळाचे ते सदस्य झाले. त्यानंतर ते इंपीरियल काउन्सिलचे सदस्य म्हणून निवडले गेले. तेथे त्यांनी शेतकऱ्यांची सावकारी पाशातून मुक्तता करण्यासाठी अनेक उपाय सुचविले तसेच लष्करी व शासकीय खर्चात कपात करावी, यासाठी आग्रह धरला.
कर्झनच्या युनिव्हर्सिटी बिलाला त्यांनी कडाडून विरोध केला. विद्यापीठे स्वायत्त असावीत, त्यावर शासकीय दडपण असू नये, अशाही मागण्या केल्या.
वर्ष 1904 मध्ये ते पुन्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यावेळी कॉंग्रेसमधे जहाल-मवाळ संघर्ष उग्र बनत चालला होता. त्यातून अखेर वर्ष 1907 मध्ये सुरत अधिवेशनाच्या वेळी कॉंग्रेस दुभंगली आणि कॉंग्रेसवर मवाळांची पूर्ण पकड बसली.
स्वदेशीच्या प्रचारार्थ त्यांनी स्वदेशी कारखाना काढण्याचा उपक्रम केला. तसेच त्यांच्या प्रयत्नाने सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाची स्थापना झाली. वर्ष 1913 मध्ये बॉम्बे क्रॉनिकल हे इंग्रजी भाषेतील पहिले वृत्तपत्र त्यांनी मुंबईला सुरू केले. वर्ष 1915 मधे मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. 5 नोव्हेंबर 1915 रोजी त्यांचे निधन झाले.